आज डिजिटल युग आणि ओटीटीच्या जमान्यात सगळ्याच गोष्टी आपल्यासाठी अत्यंत सोप्या आणि एका क्लिकवर उपलब्ध झाल्या आहेत. तुम्ही जे म्हणाला ते तुम्हाला तुमच्या वेळेनुसार पाहण्याची सोय या इंटरनेटमुळे निर्माण झाली. परंतु याआधी आपण सगळेच टेलिव्हिजन अगदी नित्यनेमाने पाहायचो. काही वर्षांपूर्वी टेलिव्हिजन चॅनल्सचा चांगलाच सुळसुळाट झाला होता, शिवाय कित्येक डी२एच कंपन्यांनी बरंचसं मार्केट खाल्लं होतं. पण टेलिव्हिजन क्षेत्रात झालेल्या या क्रांतिआधी एका चॅनलने साऱ्या देशवासीयांच्या मनात आपलं वेगळं स्थान निर्माण केलं होतं. ते चॅनल म्हणजे दूरदर्शन अर्थात डीडी न्यूज. (DD News)
जेव्हा टेलिव्हिजन भारतात आला तेव्हा फक्त दूरदर्शन हेच चॅनल उपलब्ध होतं आणि तेदेखील काही तासांसाठीच पाहायला मिळायचं. महत्त्वाच्या बातम्या, दर रविवारी चित्रपट आणि गाणी आणि काही मोजक्या मालिका यांच्या जोरावरच डीडी (DD television) टेलिव्हिजनने आपल्या देशातील कित्येक पिढ्या घडवल्या असं म्हटलं तरी ती अतिशयोक्ति ठरणार नाही. याच चॅनलने ‘रामायण’सारखी अजरामर मालिका दिली, याच चॅनलमधून शाहरुख खान, इरफान, रेणुका शहाणेसारखे कित्येक नावाजलेले कलाकार पुढे आले.
===
हेदेखील वाचा : विरोधक नारायण राणेंना ‘कोंबडी चोर’ म्हणत का टीका करतात?
===
पण आजच्या या डिजिटल युगात दूरदर्शनची चर्चा कशासाठी? त्यामागील कारणही तितकंच इंट्रेस्टिंग आहे. दूरदर्शनच्या अखत्यारीत येणारे डीडी न्यूज (DD News new saffron logo) हे चॅनल सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. नुकतंच डीडी न्यूजने त्यांच्या नवीन लोगोचे अनावरण केले आहे ज्यामुळे विरोधी पक्षांनी त्यांच्यावर चांगलीच टीका करायला सुरुवात केली आहे. डीडी न्यूजच्या लोगोचा रंग लाल होता आणि आता तो भगव्या रंगात सादर करण्यात आला आहे. एका सरकारी चॅनलच्या लोगोचे भगवेकरण बऱ्याच लोकांना पटलेले नसून त्यांनी याबद्दल टीका केली आहे.
चॅनलच्या ब्रॉडकास्टरकडून यामागे केवळ व्हीज्यूअल एक्सपिरियंस हेच कारण असल्याचं स्पष्ट केलं आहे. विरोधी पक्षाच्या नेत्यांनी मात्र याचा संबंध नुकत्याच सुरू झालेल्या लोकसभा निवडणुकांशी लावला आहे. निवडणुकांच्या आधीच हा लोगो बदलल्याने विरोधकांना ही बाब चांगलीच खटकली आहे. मंगळवारी संध्याकाळी एक्स या प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत दूरदर्शनकडून डीडी न्यूजच्या (DD News new saffron logo) नवीन लोगोबाबत माहीती देण्यात आली होती.
यानंतर लगेच २०१२ ते २०१४ दरम्यान प्रसार भारतीचे सीईओ पद भूषवणारे आणि राज्यसभेचे सदस्य जवाहर सरकार यांनी यावर त्यांची प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, “राष्ट्रीय प्रसारण संस्था दूरदर्शनने नुकतंच त्यांच्या बोधचिन्हाचा रंग बंदलून भगवा केला आहे. या संस्थेचा पूर्व अधिकारी या नात्याने मला हे भगवेकरण अत्यंत धोकादायक, चिंताजनक वाटत आहे. प्रसारभारती आता ‘प्रचारभारती’ झाली आहे.” अशा कठोर शब्दांत जवाहर यांनी डीडी न्यूजच्या (DD News new saffron logo) नव्या लोगोवर टीका केली आहे.
‘द इंडियन एक्सप्रेस’शी संवाद साधतान जवाहर म्हणाले, “केवळ लोगोच नव्हे तर हा पक्षपात सगळीकडेच पाहायला मिळत आहे. सार्वजनिक प्रसारणाच्या बाबतीत सत्तेत असलेल्या पक्षाच्या कार्यक्रमांना अधिक महत्त्व किंवा प्राधान्य दिलं जात आहे, त्यामुळे विरोधी पक्षाला फारसं कुणी विचारेल असं वाटत नाही.”
एकीकडे लोकांनी या निर्णयाला विरोध केला आहे तर काहींच्या मते १९५९ मध्ये जेव्हा दूरदर्शन (DD News new saffron logo) सुरू झालं तेव्हासुद्धा त्याचा लोगो हा भगव्या रंगाचा असल्याचं समोर आलं आहे. नंतर या हे पिवळ्या, निळ्या आणि लाल रंगाचे लोगो बनवले गेले. आता नेमकं खरं काय आणि खोटं काय याबद्दल चर्चा करणं निरर्थक आहे. परंतु निवडणुकांच्या तोंडावर भाजपासारखा पक्ष सत्तेत असताना अचानक एका सरकारी न्यूज चॅनलच्या लोगोचा रंग बदलून भगवा करण्यामागे राजकीय हेतू असल्याचा आरोप बऱ्याच लोकांकडून केला जात आहे. ही सत्यपरिस्थिती आहे.