आचार्य प्रमोद कृष्णम हे नाव सध्या देशपातळीवर चर्चेत आलं आहे. कॉंग्रेसच्या या ज्येष्ठ नेत्याची सहा वर्षातून हकालपट्टी झाली आहे. या हकालपट्टीला कारण ठरलं आहे ते भगवान विष्णुचा दहावा अवतार असलेलं कल्की धाम.(Kalki Dham)
हिंदु पुराणानुसार भगवान विष्णुचा दहावा अवतार म्हणजे, भगवान कल्की यांचा जन्म संभळ या गावातून होणार आहे. उत्तरप्रदेशमधील याच संभळ गावामधून आचार्य प्रमोद कृष्णम यांचा राजकीय प्रवास सुरु झाला. त्यांनी दोनवेळा कॉंग्रेसपक्षाच्या चिन्हावर येथून लोकसभेची निवडणुकही लढली आहे. मात्र राजकीय नेता असलेल्या आचार्य प्रमोद कृष्णम यांची दुसरी ओळखही आहे. ते संभळ येथील श्री कल्की धामचे (Kalki Dham) पीठाधीश्वर आहेत.
याच संभळमध्ये आता त्यांनी भगवान कल्की यांचे भव्य मंदिर उभारण्याचा संकल्प केला आहे. या मंदिराची पायाभरणी 19 फेब्रुवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घेतलेली भेट, त्याच्याबद्दल केलेली स्तृती आणि अयोध्येतील राममंदिर सोहळ्याला लावलेली उपस्थिती यामुळे आचार्य प्रमोद कृष्णम यांना कॉंग्रेस पक्षानं दूर केलं आहे.
मात्र आचार्य कृष्णम यांनी या सर्वांपासून अलिप्त रहात 19 फेब्रुवारी रोजी होणा-या कल्की मंदिराच्या उभारणीसाठी तयारी सुरु केली आहे. उत्तरप्रदेशमधील संभळच्या इचौडा कंबोह गावात हे श्री कल्की धाम (Kalki Dham) आहे. इथे सध्या पाच दिवसीय कल्की महोत्सव सुरू आहे. यात हवन, भजन, यासह अनेक धार्मिक कार्यक्रम होत आहेत. भगवान विष्णुचा दहावा अवतार असलेल्या भगवान कल्की यांचे आमगन झाल्यावर ते कलीयुगाचा अंत करतील आणि माझ्या विरोधकांना त्यातूनच उत्तरे मिळतील, असे सूचक विधान त्यांनी केले आहे. त्यामुळे आचार्य प्रमोद कृष्णम आणि त्यांच्या कल्की धामबद्दल सध्या सर्वत्र उत्सुकता आहे.
अयोध्येमध्ये 22 जानेवारी रोजी भगवान राम त्यांच्या भव्य मंदिरात विराजमान झाले. भगवान श्रीरामांच्या मंदिराचा भव्य समारंभ झाल्यावर आचार्य प्रमोद कृष्णम यांनी संभळमध्ये भव्य कल्की मंदिर उभारण्याची घोषणा केली, आणि एकच खळबळ उडाली.
कल्की यांना भगवान विष्णुंचा दहावा अवतार मानण्यात आले आहे. पौराणिक ग्रंथानुसार कलियुगात भगवान विष्णू कल्किच्या रूपात अवतार घेणार आहेत. कलियुगात जेव्हा अन्यायाची मर्यादा ओलांडली जाईल, तेव्हा दुष्टांचा नाश करण्यासाठी कल्कि अवतार प्रकट होणार आहे. कल्की कुठे प्रकट होणार हेही धर्मग्रंथात सांगण्यात आले आहे.
संभळ गावात भगवान कल्की हे प्रकट होतील असा उल्लेख काही धर्मग्रंथात आहे. हे संभळ गांव नेमकं कुठे आहे, याबाबत अनेक वाद असले तरी उत्तरप्रदेशमधील संभळ हे गाव भगवान कल्की यांचे मानले जाते. येथील श्री कल्की धामचे पीठाधीश्वर म्हणून आचार्य प्रमोद कृष्णम आहेत. याच आचार्य प्रमोद कृष्णम यांनी संभलमध्ये भव्य कल्की मंदिर उभारण्यास सुरुवात केली आहे.(Kalki Dham)
आचार्य प्रमोद कृष्णम यांनी याबाबत सांगितले की प्रभू श्रीराम आता आले आहेत, त्यांच्यापाठोपाठ भगवान कल्कीही येणार आहेत. भगवान कल्की राक्षसांचा नाश करतील. तेव्हाच कलियुगाचा नाश होईल, असेही त्यांनी सांगितले आहे. संभळ येथील या कल्की मंदिराच्या पायाभरणी समारंभासाठी त्यांनी देशातील प्रमुख मठांचे महंत, संत, शंकराचार्य आणि रामानुजाचार्य यांना आमंत्रित केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हा सर्व सोहळा होणार असून यावेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री महंत योगी आदित्यनाथही उपस्थित असतील. अयोध्येतील प्रभू श्रीरामांच्या मंदिरातही या सोहळ्याची आमंत्रण पत्रिका देण्यात आली आहे.(Kalki Dham)
या सर्व सोहळ्यासाठी आचार्य कृष्णम स्वतः लक्ष ठेऊन आहेत. आचार्य कृष्णम हे गेली अनेक वर्ष या कल्कि धामच्या विकासासाठी काम करीत आहेत. संभळ ही त्यांची जन्मभूमी आहे. 4 जानेवारी 1965 रोजी संभळ येथील एन्कोडा कंबोह गावातील ब्राह्मण कुटुंबात त्यांचा जन्म झाला आहे.
=============
हे देखील वाचा : व्यंकटेश्वरच्या दर्शनाने होतात सर्व मनोकामना पूर्ण…
=============
प्रमोद कृष्णम यांनी काँग्रेसकडून दोनवेळा निवडणूक लढवली आहे. 2014 मध्ये ते संभळमधून आणि 2019 मध्ये दुसऱ्यांदा लखनौमधून कॉंग्रेसचे उमेदवार होते. आचार्य कृष्णम हे कॉंग्रेसचा प्रवक्ता म्हणून काम करत होते.टिव्हीवरील चर्चांमधून कॉग्रेसची भूमिका मांडणारे आचार्य कृष्णम सोशल मिडियामध्ये बरेच चर्चित आहेत. पण राममंदिर उभारणीनंतर त्यांनी राममंदिराला पाठिंबा व्यक्त केला. तेव्हापासून त्यांच्यात आणि कॉग्रेस पक्षात धुसपूस निर्माण झाली. पण त्यापासून दूर जात आचार्य कृष्णम सध्या कल्की मंदिराच्या उभारणीसाठी प्रयत्न करीत आहेत.
सई बने