नववर्षात अयोध्येत भव्य मंदिरात प्रभू श्रीरामांच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे. 22 जानेवारी 2024 रोजी होणा-या या अभुतपूर्व सोहळ्यासाठी फक्त अयोध्या नगरी नव्हे तर संपूर्ण देशभरात कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. अयोध्या नगरी तर एखाद्या नवरीसारखी सजली आहे. या सर्व सोहळ्यात नेमकं काय होणार, सर्व सोहळा कसा होणार याचा सर्व तपशील अजून उपलब्ध नाही. मात्र या सर्वात प्रभू श्री रामांच्या आधी कोणाची पूजा होणार हे स्पष्ट झाले आहे. (Narendra Modi)
प्रभू श्रीरामांच्या आधी पक्षीराज म्हणून ज्यांचा गौरव करण्यात येतो, त्या जटायुराजांची पहिली पूजा पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार आहेत. रामायणात जटायुराजांची भूमिका महत्त्वाची आहे. रावणानं माता सीतेचं अपहरण केल्यावर त्याला अडवण्याचा पहिला प्रयत्न जटायुराजांनी केला होता. रावणाबरोबर झालेल्या युद्धात त्यांचा मृत्यू झाला. पण मरणापूर्वी त्यांनी प्रभू श्रीरामांना माता सीतेचा पत्ता सांगितला, त्यामुळे माता सीता यांचा शोध घेणे सुकर झाले होते. याच जटायुराजांची पहिली पुजा करुन मग अयोध्येतील सर्व सोहळा सुरु होणार आहे.
अयोध्येतील राम मंदिरात रामललाच्या प्राणप्रतिष्ठा करण्याची तयारी जोरात सुरू आहे. या भव्य मंदिराच्या गर्भगृहात 22 जानेवारी 2024 रोजी दुपारी 84 सेकंदाच्या सर्वात शुभ वेळेत प्रभू श्रीरामांची मुर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे. या शानदार सोहळ्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी जटायु राज आणि भगवान कुबेरेश्वर महादेव यांची पूजा करणार आहेत. अयोध्येतील कुबेर नवरत्न टिळ्यावर उभारण्यात आलेल्या भव्य जटायु राजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन त्याची पूजा करण्यात येणार आहे. याशिवाय पंतप्रधान मोदी शिवालयात कुबेरेश्वर महादेवाचा अभिषेक आणि पूजा करणार आहेत. प्रभू रामांची पूजा करण्यापूर्वी या जटायुराज आणि कुबेरेश्वर महादेवाची पूजा करणे गरजेचे असल्याचे या सर्व सोहळ्याचे नियोजन करणा-या समितीनं स्पष्ट केलं आहे. याचा संबंध रामायण कालखंड आणि भगवान राम यांच्याशी असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. (Narendra Modi)
जटायुराज नेमके कोण होते, हे जाणण्यासाठी एक कथा सांगितली जाते. प्रजापती कश्यपची पत्नी विनता हिला ‘गरुड’ आणि ‘अरुण’ असे दोन पुत्र होते. अरुण सूर्याचा सारथी झाला. संपती आणि जटायू हे या अरुणाचे पुत्र होते. बालपणात संपत्ती आणि जटायुने सूर्यमालेला स्पर्श करण्याच्या उद्देशाने लांब उड्डाण केले. सूर्याच्या असह्य उष्णतेने त्रस्त होऊन जटायु अर्ध्यावाटेतून मागे फिरला. पण संपती उडतच राहिला. संपती जेव्हा सूर्याजवळ पोहोचला तेव्हा सूर्याच्या तीव्र उष्णतेमुळे त्याचे पंख जळून गेले आणि तो समुद्रकिनाऱ्यावर पडला. यात संपती बेशुद्ध झाला. पुढे सीतेचा शोध घेत असलेल्या वानरांना मदत करणा-या संपतीला पाहून चंद्रमा नावाच्या ऋषींना त्याची दया आली. त्यांनी संपतीवर उपचार केले आणि त्याला पंख परत मिळण्याचा आशीर्वाद दिला. (Narendra Modi)
वनवासात असतांना भगवान राम आणि जटायु यांचा परिचय झाला होता. पंचवटी येथे रहात असलेल्या प्रभू श्री राम, सीता आणि लक्ष्मण यांची जटायुबरोबर आदराचे नाते तयार झाले होते. भगवान श्रीराम त्यांना आपल्या वडिलांइतकाच मान देत असत.
लंकेचा राजा रावणाने माता सीतेचे अपहरण केले. तेव्हा जटायुने त्याला रोखण्याचा प्रयत्न केला. या युद्धात रावणानं जटायुचे पंख कापले. सीतेच्या शोधात भटकत असलेल्या रामाला जटायु मरणासन्न अवस्थेत दिसले. त्यांनी रावणाने सीतेला कोठे नेले हे सांगितले आणि प्राण सोडला. त्यांचा अंत्यसंस्कार स्वतः भगवान श्रीरामांनी केला. त्यामुळेच 22 जानेवारी रोजी अयोध्येत होणा-या सोहळ्यात आधी जटायुराजांना मान देण्यात येणार आहे, आणि त्यांची पूजा करण्यात येणार आहे. (Narendra Modi)
प्रभू रामांचे पूजनीय देवता भगवान शिव होते. लंकेवर हल्ला करून राम सेतू बांधण्यापूर्वी प्रभू रामांनी शिवलिंग बनवून शिवाची पूजा केली आणि आशीर्वाद घेतला होता. त्यामुळे राम मंदिर परिसरातील शिवमंदिराचा जिर्णोद्धार करण्यात येत आहे. हे मंदिर कुबेर रत्नाच्या डोंगरावर बांधले आहे. त्यामुळे त्याचे नाव कुबेरेश्वराला महादेव पडले आहे. येथेच येथे जटायु राजांचा मोठा पुतळाही बसवण्यात आला आहे. अयोध्येतील हा कुबेर टिळा ऐतिहासिक आहे. येथे जटायुची कांस्य मूर्ती बसवण्यात आली आहे.
==========
हे देखील वाचा : पाकिस्तानात आहे पाच हजार वर्षाचा इतिहास सांगणारे हिंदू मंदिर
=========
अयोध्येतील रामजन्मभूमी संकुलात असलेला ‘कुबेर टिळा’ हा पर्वत देशाच्या स्वातंत्र्य चळवळीचा मूक साक्षीदार आहे. 1857 चे बंड दडपल्यानंतर 18 मार्च 1858 रोजी अयोध्येच्या हनुमानगढ़ी मंदिराचे महंत बाबा रामशरण दास आणि फैजाबादचे मौलवी अमीर अली यांना इंग्रजांनी कुबेर टिळा येथील चिंचेच्या झाडाला एकाच दोरीने फासावर लटकवले. या दोन शहीदांचेही येथे स्मरण करण्यात येणार आहे.
सई बने