येत्या ३० ऑगस्टपासून आशिया कप (Asia Cup 2023) क्रिकेट स्पर्धेला प्रारंभ होत आहे. भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, अफगाणिस्तान आणि नेपाळ अशा सहा संघांमध्ये ही स्पर्धा रंगेल. स्पर्धेसाठी भारतीय संघाची संघबांधणी अन तयारी जोरात सुरु आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने नुकतेच आशिया कप स्पर्धेसाठी भारतीय संघाच्या जर्सीचे अनावरण केले आहे. विराट कोहली, रोहित शर्मा यांसारख्या वरिष्ठ खेळाडूंचे जर्सीतील फोटो सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात वायरल होत आहेत. विशेष बाब म्हणजे भारतीय संघाच्या जर्सीवर चक्क पाकिस्तानचे नाव असणार आहे.
तुम्ही म्हणाल आता हे कसं काय शक्य आहे ? तर त्याचं असं आहे की, या आशिया कप स्पर्धेचे यजमानपद पाकिस्तान आणि श्रीलंकेकडे आहे. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक संघाच्या जर्सीवर यजमानपद भूषवणाऱ्या देशाचे नाव असते. त्यामुळे भारतीय संघाच्या जर्सीवरदेखील पाकिस्तान संघाचे नाव असणार आहे. भारताच्या जर्सीवरील पाकिस्तान संघाच्या या नावाची चाहत्यांकडून मोठ्या प्रमाणात चर्चा होतांना बघायला मिळत आहे. परंतु भारत-पाकमधील असलेल्या देशांतर्गत तणावामुळे भारत पाकिस्तानमध्ये एकही सामना खेळणार नाही. भारताचे सर्व सामने पाकिस्तानबाहेरच खेळवले जाणार आहेत. (Asia Cup 2023)
आशिया कप (Asia Cup 2023) क्रिकेट स्पर्धेच्या शुभारंभाचा सामना ३० ऑगस्ट रोजी पाकिस्तान आणि नेपाळ यांच्यादरम्यान खेळवला जाणार आहे. स्पर्धेतील भारताचा पहिला सामना २ सप्टेंबर रोजी पाकिस्तान विरुद्ध खेळवला जाणार आहे. स्पर्धेच्या साखळी फेरीत भारत आणि पाकिस्तान दोन वेळा आमनेसामने येणार आहेत. दोन्ही संघांनी जर अंतिम सामन्यात धडक मारली तर क्रिकेट रसिकांना स्पर्धेत तिसऱ्यांदा या हाय व्होल्टेज सामन्याचा थरार अनुभवायला मिळण्याची शक्यता आहे.
===========
हे देखील वाचा : खेळाडूसोबत त्यांची जर्सी का रिटायर केली जाते?
===========
रोहित शर्माच्या नेतृत्वात खेळणाऱ्या भारतीय संघासाठी आशिया कप स्पर्धा वर्ल्डकप तयारीच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची ठरणार आहे. संघाच्या जमेच्या बाजू, संघाच्या कमकुवत बाजू, खेळाडूंना देण्यात आलेल्या जबाबदाऱ्या ते कितपत पेलू शकतात या सगळ्यांची रंगीत तालीम भारतीय संघाला आशिया चषक स्पर्धेत करायला मिळणार आहे. आशिया कपनंतर (Asia Cup 2023) भारतीय संघ लगेचच वर्ल्डकपला सामोरे जाणार आहे म्हणून संघाच्या कामगिरीकडे सर्वांच्या नजरा लागून राहिल्या आहेत.