भारतातील प्रत्येक प्राचीन मंदिराचा वेगळा इतिहास आहे. त्यामागे एक पौराणिक कथा आहे. अशीच कथा आहे, गुरजातमधील वालिनाथ (valinath temple) मंदिराची. भगवान शंकराचे हे मंदिर महाभारतकाळापासूनचे आहे. मात्र इथेच या मंदिराबाबतचे वैशिष्ट थांबत नाही, तर या मंदिरातील भगवान शंकाराच्या मुर्तीची स्थापना प्रत्यक्ष भगवान कृष्णाने केली आहे. तसेच वलिनाथ मंदिराचे गडपती म्हणजेच पुजारी जयरामगिरी बापू हे रबारी समाजातील आहेत. आता याच महाभारतकालीन मंदिराचे भव्य मंदिरात रुपांतर झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मेहसाणा वलिनाथ मंदिराचे भव्य स्वरुप भाविकांसाठी खुले केले आहे. गुजरातमध्ये सोमनाथ मंदिर अतिशय भव्य आहे, या मंदिरानंतर आणखी एक भव्य मंदिर या वलिनाथ मंदिराच्या रुपात मिळाले आहे. या वलिनाथ महादेव मंदिरात भगवान शंकराची मुर्ती आणि लिंगाच्या स्वरुपात पुजा होते.
गुजरातमधील वलिनाथ (valinath temple) महादेव मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अभिषेक करण्यात आला. गुरुपुष्य अमृत सिद्धी योगाच्या मुहूर्तावर झालेल्या या अभिषेकावेळी देशातील अनेक ऋषी-मुनी उपस्थित होते. अतिशय भव्य दिव्य असलेल्या या वलिनाथ मंदिराला नवे स्वरुप मिळाले आहे. देशात भगावन शंकाराची अनेक मंदिरे आहेत, मात्र महाभारतकालीन असलेल्या या मुळ मंदिराची स्थापना भगवान श्रीकृष्णानं केली होती. ही माहिती मिळाल्यामुळे वलिनाथ मंदिराबाबात अधिक माहिती घेण्यात येत आहे. महाभारत काळापासून असलेल्या या मंदिरात भगवान वलिनाथांची पूजा स्थानिक रबारी समाजाकडून केली जाते. याच रबारी समाजातील पुजारी येथे परंपरागतरित्या महादेवाची पुजा करतात.
या वलिनाथ (valinath temple) महादेव मंदिराची स्थापना प्रत्यक्ष भगवान कृष्णानं केल्याचीही माहिती आहे. भगवान श्री कृष्ण द्वारकेत रहात असतांना आता जिथे वलीनाथ मंदिर आहे, त्या परिसरात आले. घनदाट झाडींचा हा परिसर त्यांना खूप आवडला. त्यांनी गोपीकांसोबत भव्य रासलीला केली. ही रासलीला बघण्यास कोणालाही मनाई होती. पण भगवान महादेवाला ही रासलीला बघायची इच्छा झाली. त्यामुळे भगवान शिवानं गोपीचे रुप घेतले. पण रासलीलेमध्ये सामिल झालेल्या गोपिकेच्या रुपातील भगवान महादेवाला श्रीकृष्णानं ओळखलं. श्रीकृष्णांनी भगवान शंकाराला मुळ रुपात येण्याची विनंती केली. त्यावेळी भगवान शंकर मुळरुपात आले, पण त्यांनी घातलेली कर्णफुले त्यांच्या कानातच राहिली. यावर भगवान श्रीकृष्णाने त्यांना वलिनाथ असे संबोधले. यानंतर भगवान श्रीकृष्णाने स्वतः येथे महादेवाची मूर्ती बसवली आणि तेव्हापासून येथे वलिनाथ महादेवाची पूजा केली जाऊ लागली. मुख्य म्हणजे, भारतातील एकमेव मंदिर आहे, जेथे भगवान शंकराची मुर्ती आहे, आणि शिवलिंगही आहे.
=========
हे देखील पहा : भगवान विष्णुचा दहावा अवतार असलेलं कल्की धाम
=========
या वलिनाथ महादेवावर उत्तर गुजरातमधील रबारी श्रद्धा आहे. कारण भगवान श्रीकृष्णानंतर या मंदिराकडे दुर्लक्ष होऊ लागले. काही काळ हे मंदिर पूर्णपणे मातीत गडप झाले होते. 900 वर्षापूर्वी तरभोवन मोयदव नावाच्या रबारी व्यक्ती येथे आपली जनावरे चरण्यासाठी घेऊन येत असे. येथील एका झाडाखाली आराम करतांना त्यांना स्वप्न पडले, आणि मंदिराबाबत दृष्टांत झाला. तरभोवन मोयदव यांनी येथे उत्खनन केले असता पुरातन मंदिराचे अवशेष आणि वलिनाथ महादेवाची मूर्ती सापडली. या मंदिराची त्यांनी नव्यानं बांधणी केली. मंदिरात पुजा करण्यास सुरुवात केली. पुढे ते महंत वीरमगिरी बापू म्हणजेच, वलिनाथ गडाचे पहिले गडपती म्हणून ओळखले जाऊ लागले. या मंदिरात वलिनाथ महादेवाचे शिवलिंगही आहे. या शिवलिंगाच्या दर्शनाने 12 ज्योतिर्लिंगांचे दर्शन घेतल्याचे पुण्य लाभते असे सांगण्यात यते. आता याच वलिनाथ (valinath temple) मंदिराची भव्य अशी उभारणी करण्यात आली आहे. वलिनाथ महादेव मंदिर दगडांनी बांधण्यात आले आहे. हे मंदिर प्राचीन नगर शैलीत बांधलेले आहे. मंदिराची उंची 101 फूट, लांबी 265 फूट आणि रुंदी 165 फूट आहे. यावरून मंदिराच्या भव्यतेचा अंदाज लावता येतो. मंदिरात 68 खांब आहेच. या मंदिराच्या उभारणीसाठी 14 वर्षांचा काळ लागला. आता मंदिराच्या परिसरात अनेक विकासकामेही करण्यात आली आहेत. त्यामुळे येथे येणा-या भाविकांची संख्याही वाढली आहे.
सई बने