तोंडावर उद्धट बोलणारी लोकं, चित्रविचित्र सूचना लिहिलेल्या पाट्या, दुचाकीवर चेहेरा स्कार्फने झाकून फिरणाऱ्या मुली, सिग्नल न पाळणारी माणसं आणि प्रत्येकात ठासून भरलेला मराठी संस्कृतीप्रती अभिमान या गोष्टी तुम्ही आसपास अनुभवत असाल तर तुम्ही पुण्यात आहात हे लक्षात ठेवा.
पुणेरी माज, चितळ्यांची बाकरवडी, मस्तानी नामक फालूदा सदृश्य पेय, एफसी रोडवरची हिरवळ, परप्रांतियांची वाढती संख्या. मराठी संस्कृती आणि ऐतिहासिक वारसा जपणारी पर्यटन स्थळं अशा काही गोष्टींसाठी पुणे शहर प्रसिद्ध आहे. या शहराला फार प्राचीन सांस्कृतिक आणि ऐतिहास वारसा लाभलेला आहे आणि याबद्दल साऱ्या पुणेकरांना प्रचंड अभिमान आहे.
इथल्या पेठा, किल्ले, जुन्या इमारती, छोटी मंदीरं याबरोबरच पुण्याच्या पुलांचा इतिहासही तितकाच जुना आणि रंजक आहे. दारूवाला पूल, मनपा पूल, बालगंधर्व पूल, झेड ब्रिज हे पुण्यातील काही प्रसिद्ध पूल तुम्हाला ठाऊक असतीलच. या पुलांना पडलेल्या नावांचाही वेगळा असा इतिहास आहे.
आज आपण पुण्यातील अशाच एका ऐतिहासिक पूलाबद्दल जाणून घेणार आहोत. हा पूल एकेकाळी नानासाहेब पेशवे यांनी घाईघाईत बनवून घेतला होता, तो म्हणजे ‘लकडी पूल‘ (Lakdi pool). आज आपण याच पूलाबद्दल काही खास गोष्टी जाणून घेणार आहोत.
पुण्यातील विविध ठिकाणांना पडलेली नावं आणि त्यांचा इतिहास हा फारसा कुणालाच ठाऊक नाही. ही नावे पुणेकरांच्या बोलीभाषेत चांगलीच रूढ झाली आहेत. काळाच्या ओघात या नावांमागील भन्नाट कथा लोप पावू लागल्या. याच भन्नाट कथा आणि हा रंजक इतिहास जपण्यासाठी सुप्रसाद पुराणिक यांनी ‘नावामागे दडलंय काय’ हे पुस्तक लिहिलं आहे.
===
हेदेखील वाचा : डीडी न्यूजचा नवा भगवा लोगो पाहून विरोधक म्हणाले, “हे तर प्रचार भारती…”
===
या पुस्तकात पुण्यातील वेगवेगळ्या ठिकाणांना पडलेल्या नावामागचा इतिहास आणि कथा सांगितल्या आहेत. याच पुस्तकात नानासाहेब पेशवे यांनी बांधून घेतलेल्या ‘लकडी पूलामागचा (Lakdi pool) इतिहास आपल्याला वाचायला मिळेल.
लकडी पुलाचे सध्याचे नाव हे ‘छत्रपती संभाजी महाराज पूल आहे’ पण अजूनही पुणेकर किंवा बाहेरून येणारी कोणतीही व्यक्ति त्याला ‘लकडी पूल’ (Lakdi pool) म्हणूनच उल्लेख करतात. या पुलाच्या इतिहासाची पाळंमुळं पानिपत युद्धाच्या काळात आपल्याला सापडतील.
१७६१ चा तो काळ, पानिपतच्या युद्धाचा मराठा साम्राज्याला मोठा फटका बसला, मराठ्यांचा असा दारुण पराभव आजवर कधीच झालेला नव्हता. हा पराभव बाळाजी बाजीराव म्हणजेच नानासाहेब पेशवे यांच्या जिव्हारी लागला आणि काहीच दिवसांनी त्यांची तब्येतही बिघडू लागली. अशातच त्यांनी एक पूल तातडीने बनवण्याचे आदेश दिले होते. तोच हा लकडी पूल. (Lakdi pool)
त्यावेळी पुण्याचे प्रवेशद्वार म्हणजेच कुंभारवेशीपाशी फक्त एकच पूल होता आणि तिथूनच बहुतेक फौजा आणि इतरांचे आवागमन होत असे. पानिपतच्या युद्धात पराभव झाल्यानंतर उर्वरित सैन्याला या मुख्य प्रवेशद्वारातून न् आणता दुसऱ्या मार्गाने आणावे असा प्रस्ताव तेव्हा ठेवण्यात आला आणि यासाठीच घाईगडबडीत या पूलाची (Lakdi pool) निर्मिती करण्यात आली होती असं सांगितलं जातं. अर्थात याबद्दल कोणताही सबळ आणि ठोस असा पुरावा उपलब्ध नाही.
खुद्द नानासाहेब त्यावेळी या पुलाच्या बांधणीमध्ये लक्ष घालून काम करवून घेत होते. पूल पूर्ण होताच २३ जून १७६१ रोजी नानासाहेब यांचे निधन झाले आणि इतक्या घाई घाईने लाकडी पूल बनवण्यामागील नेमका उद्देश काय होता याचे उत्तरही त्यांच्याबरोबर गेले.
दगडी पूल (Lakdi pool) बांधण्यासाठी बरेच पैसे आणि वेळ खर्ची गेला असता आणि म्हणूनच लाकडी बांधकामाच्या सहाय्याने या पूलाची निर्मिती करण्यात आली आणि म्हणूनच याला लकडी पूल (Lakdi pool) हे नाव पडले.
जेव्हा तो बांधून पूर्ण झाला तेव्हा त्याची रुंदी फारच कमी होती. १८४० मध्ये नानासाहेबांनी बांधलेला हा पूल पडला आणि त्याची पुनर्बांधणी करण्यात आली पण तरी या पुलाचे नाव काही बदलले नाही. १९५० नंतर या पुलाचे बांधकाम पुन्हा करण्यात आले आणि एक मोठा ७६ फुटांचा रुंद पूल बांधण्यात आला.
अडीचशे वर्षं लोटली तरी पेशवेकालीन इतिहासाची साक्ष देणारा, तूफान, पाऊस, प्रलय यांचा सामना करत हा ‘लकडी पूल’ (Lakdi pool) आजही तसाच उभा आहे.