Home » वादग्रस्त माफीवीर सॅम पित्रोदा 

वादग्रस्त माफीवीर सॅम पित्रोदा 

by Team Gajawaja
0 comment
Sam Pitroda
Share

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर ओव्हरसीज काँग्रेसचे अध्यक्ष सॅम पित्रोदा यांनी वारसा कराबाबत मत व्यक्त केले आहे.  पित्रोदा यांनी देशात वारसा कर कायद्याची बाजू मांडून नव्या वादाला तोंड फोडले आहे. संपत्तीच्या पुनर्वितरणासाठी हा कायदा भारतात गरजेचा असल्याची जोडी या पित्रोदा महाशयांनी केली आहे. (Sam Pitroda)

ऐन निवडणुकीच्या मध्यावर सॅम पित्रोदा यांच्या या वादग्रस्त विधानानाने वादळ उठले नसते तरच नवल. भारताच्या लोकसभा निवडणुकीमध्ये सॅम पित्रोदा यांनी उठवलेला हा मुद्दा टर्निंग पॉईंट ठरणार असा कयास आता लावण्यात येत आहे.  या मुद्दावर सुरु झालेल्या वादांनी आणि त्याचा निवडणुकीवर काय परिणाम होईल, याचा अंदाज घेत, कॉंग्रेसनही सॅम यांच्या विधानापासून स्वतःला दूर केले आहे.  अर्थात काही दिवसांनी खुद्द सॅम पित्रोदाही या विधानापासून स्वतःला दूर करुन घेतील. 

कारण ज्या सॅम पित्रोदा यांचा देशातील संगणक क्रांतीचे जनक म्हणून गौरव करण्यात येतो, ते सॅम पित्रोदा हे खरे माफीवीर आहेत.  कारण त्यांनी आत्तापर्यंत एवढी वादग्रस्त विधानं केली आहेत की, त्यांची मोजदादही करता येणार नाही. फक्त वादग्रस्त विधानं करुन सॅम थांबले नाहीत, तर काही दिवसांनी माझे हिंदी बरोबर नाही, त्यामुळे माझ्या बोलण्याचा विपर्यास लावला गेला, असे सांगून त्यांनी माफीही मागितली आहे.  मात्र आता नेमक्या निवडणुकीत सॅम पित्रोदा यांनी भाजपाच्या हाती सुर्वणसंधी देत त्यांच्याच घरच्या पक्षाला म्हणजे, कॉंग्रेसला कोंडीत टाकले आहे.  (Sam Pitroda)

बालोकोट एअर स्ट्राईक असो की राममंदिराची उभारणी असो, कॉग्रेसचे नेते सॅम पित्रोदा यांनी या सर्वांवर टीका केली आहे. परदेशात बसून भारतातील प्रत्येक गोष्टींबाबात टीका करणे हा या पित्रोदांचा आवडता छंद आहे.  गुजराती कुटुंबात जन्म झालेल्या पित्रोदा यांच्याकडे 200 तंत्रज्ञान पेटंट असल्याची माहिती आहे.  त्यांना संगणक क्षेत्रातील दादा व्यक्तिमत्व म्हणूनही ओळखले जाते.  मात्र नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून ते एका टिकाकाराच्या भूमिकेत गेले आहेत.  या टिकेवर ब-याचवेळा माफी मागून त्यांनी माघारही घेतली आहे.  

सॅम पित्रोदा यांचे मूळ नाव सत्यनारायण गंगाराम पित्रोदा आहे. १७ नोव्हेंवर १९४२ रोजी सॅम पित्रोदा यांचा जन्म भारताच्या पूर्वेकडील ओडिशा राज्यातील टिटलागढ येथे एका गुजराती कुटुंबात झाला. ते राष्ट्रीय ज्ञान आयोगाचे अध्यक्ष राहिले आहेत.  अमेरिकेत स्थायिक असलेल्या सॅम यांना माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी भारतात परत आणले.  त्यांनी युनायटेड नेशन्सचे सल्लागार म्हणूनही काम केले आहे.  डॉ. मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळात ते पंतप्रधानांचे सल्लागार आणि संयुक्त राष्ट्रांचे सल्लागारही होते.  इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंगमध्ये पदव्युत्तर पदवी प्राप्त केलेल्या पित्रोदा यांना पहिल्यापासून परदेशाची मोहिनी होती.  १९८७ मध्ये भारतात परत आल्यावर त्यांनी तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांचे सल्लागार म्हणून काम पाहिले.  तेव्हा पित्रोदा यांनी दूरसंचार, पाणी, साक्षरता, लसीकरण, दुग्धव्यवसाय आणि तेलबियांशी संबंधित सहा तंत्रज्ञान मोहिमांचे नेतृत्व केले.  १९९० च्या दशकात पित्रोदा शिकागोला परतले आणि त्यांचे व्यावसायिक हितसंबंध पुन्हा सुरू केले. (Sam Pitroda)

२००४ च्या सार्वत्रिक निवडणुकांनंतर तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी त्यांना भारताच्या राष्ट्रीय ज्ञान आयोगाचे प्रमुख म्हणून आमंत्रित केले.  २००९ मध्ये, पित्रोदा यांची भारताचे पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे कॅबिनेट मंत्री पदासह सार्वजनिक माहिती पायाभूत सुविधा आणि नाविन्यपूर्ण सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली.  २०१० मध्ये पित्रोदा यांची नॅशनल इनोव्हेशन कौन्सिलचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली.   २०१७  मध्ये, त्यांची अल्फा-एन कॉर्पोरेशन या लिथियम मेटल क्लीन तंत्रज्ञान कंपनीचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली.  पित्रोदा हे पाच मोठ्या NGO चे अध्यक्षही आहेत.  पित्रोदा यांच्या अमेरिकेत अनेक कंपन्या असल्याचीही माहिती आहे.  त्यांची पाच पुस्तके आणि असंख्य पेपर प्रकाशित केले आहेत.  

याच सॅम पित्रोदा आणि विवाद यांचे जुने नाते आहे. अयोध्येत राम मंदिर उभे रहात असतांना मंदिरांनी रोजगार मिळत नाही, असे सांगून त्यांनी राममंदिराच्या उभारणीवर टिका केली होती.  प्रत्यक्षात अयोध्येत राम मंदिराची उभारणी झाल्यावर हजारो तरुणांना रोजगार मिळाले.  या प्रश्नावर मग पित्रोदा यांनी उत्तर देणे टाळले आहे.  १९८४ मध्ये जे काही झाले, ते गेल्या पाच वर्षात काय झाले यावर बोला, असे विधान त्यांनी दिल्लीमधील दंगलीसंदर्भात केले होते. (Sam Pitroda)

एका पत्रकार परिषदेत केलेल्या या विधानामुळेही मोठा गोंधळ उडाला होता.  नंतर पित्रोदा यांनी आपले हिंदी खराब असून शब्दांचा विपर्यास झाल्याचे सांगून माफी मागितली आहे.  भारतीयांच्या फोन वापराबद्दलही असेच वादग्रस्त वक्तव्य पित्रोदा यांनी केले आहे. भारतीयांच्या मोबाइल फोनच्या वापरावर भाष्य करताना, पित्रोदा यांनी माकडाच्या हातात नवे खेळणेअसे वर्णन केले. या  त्यांच्या वक्तव्यामुळेही पित्रोदा यांच्यावर सोशल मीडियावर जोरदार टीका झाली.  आणि नंतर त्यांना माफी मागावी लागली. 

============

हे देखील वाचा : वासुकी नागाचे रहस्य उलगडले…

============

भारतानं बालाकोट येथे केलेल्या एअर स्ट्राईकवरही या सॅम पित्रोदा साहेबांनी वादग्रस्त विधान केलं.  अर्थात त्यानंतर माफीही व्यक्त केली आहे.   पित्रोदा यांनी बालाकोट कारवाईनंतर सांगितले की, 300 लोक मारले गेले असे म्हणाल तर वस्तुस्थिती जाणून घेणे आवश्यक आहे. आपल्या सर्वांना कळले पाहिजे, देशातील जनतेला कळले पाहिजे.(Sam Pitroda)

संपूर्ण जगाच्या मीडियाचा प्रश्न येतो की कोणीही सैनिका मारले गेले का नाहीत. एक भारतीय नागरिक असल्याने मला अशा प्रसंगी खूप वाईट वाटत असल्याचे त्यांनी सांगितले होते.  या विधानावरही टिकेची झोड उठवण्यात आली होती.  आत्ताही त्यांनी अमेरिकेतील फक्त सहा राज्यात असलेल्या वारसा कराला भारतात राबवण्याचे सांगून वाद ओढवून घेतला आहे.  त्यांचा आणि वादाचा इतिहास बघता, पुढच्या काही दिवसातच सॅम पित्रोदा, माझ्या विधानाचा विपर्यास केला म्हणून माफी मागणार हे नक्की.  

सई बने


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.