घराला घरपण देणारी माणसं जेवढी महत्वाची असतात तेवढीच आपल्या घरात सुख, शांती, वैभव टिकवून ठेवणे सुद्धा तितकेच गरजेचे आहे. कारण तुम्ही राहत असलेल्या वास्तू मध्ये नेहमीच कलह, भांडण, शिव्या देऊन बोलणे अशा गोष्टी होत असतील तर तेथे तुम्हाला कधीच आनंदी वातावरण दिसून येणार नाही. या उलट ज्या घरात एकमेकांना सांभाळून घेत पुढे प्रगती करण्याचा प्रयत्न करतील त्याचा सकारात्मक परिणाम तुमच्या दैनंदिन आयुष्यासह वास्तूवर ही होतो. आता तुम्ही म्हणाल वास्तू आणि आपल्या दैनंदिन जीवनाचा काय संबंध? तर संबंध आहे आहे आणि हेच वास्तूशास्रात आपल्याला सांगितले जाते.(Vastu tips)
भारतातील कित्येक मंदिरे, महाल यांच्या निर्मितीमागे ज्ञान, तंत्रज्ञान किंवा शिल्प आहेच. पण त्याचसोबत त्याला वास्तूशास्राची देगणी सुद्धा लाभलेली आहे. वास्तूशास्र आणि पंचमहाभूत आपले शरीर पृथ्वी, आकाश, पाणी, अग्नी आणि वायूचे बनलेले आहे. शरिराचा जेव्हा अंत होतो तेव्हा ते पंचतत्वात विलिन होते असे म्हटले जाते. याच पंचतत्वाद्वारे घराच्या निर्मिती वेळी वास्तुविज्ञान हे कार्यरत असते आणि त्यानुसारच त्याची निर्मिती होते. भौगोलिक दृष्या पहायला गेल्यास आपल्याला चार दिशा आणि चार उपदिशा आहेत. याच सर्व दिशा आपल्या वास्तूसाठी सुद्धा असतात. वास्तूशास्रात असा नियम आहे की, घरात खेळती हवा आणि प्रकाश यांचे उत्तम आगमन झालेले असावे. या व्यतिरिक्त प्रत्येक दिशेच्या स्थानाचा एक स्वामी असतो. ज्याप्रकारे आपण आपले देवघर, अग्नी, पाणी या सर्व गोष्टी आपण त्यांच्या ठिकाणी ठेवल्यास तरच वास्तू ही वास्तूशास्रानुसार परिपूर्ण होते असे म्हटले जाते. अशा वास्तूत राहणारी लोक सुद्धा सुखी जीवनाचा आनंद घेताना दिसून येतात.
हिंदू धर्मात प्रत्येक गोष्टींसाठी एक प्रधान देवता आहे. जसे की, पावसाचा वरुण, अग्नीचा अग्निदेव, वैद्यांचा धन्वंतरी तसा वास्तूसाठी वास्तूदेवाची मांडणी ही आपल्या पुरातन काळात करुन ठेवली आहे. या वास्तूदेवतेला आपण वास्तूपुरुष असे म्हणतो. वास्तूपुरुषाचे स्थान हे वास्तूच्या म्हणजेच घराच्या आग्नेय कोपऱ्यात करणे अत्यावश्यक आहे. जर तुम्ही वास्तूशांती करुन घेत असाल तर भटजींकडून वास्तूशांतीचा विधी मुहूर्त पाहूनच त्याची पूजा करावी. वास्तूशांती तुम्हाला करायची असेल तर शक्यतो ती सूर्यच्या उत्तरायणात करावी म्हणजेच डिसेंबर ते जून दरम्यान करावी. नव्या वास्तूत तुम्ही राहायला जाण्यापूर्वी त्याचे वास्तूपूजन जरुर करुन घ्यावे.(Vastu tips)
हे देखील वाचा-Numerology म्हणजे काय? आपल्या आयुष्यावर त्याचा कसा परिणाम होतो
वास्तूपूजनामध्ये सोन्याचा वास्तूपुरुष आग्नेय दिशेच्या कोपऱ्यात निक्षेपित करावा असे वास्तूशास्रात सांगितले आहे. परंतु वास्तूपुरुष जर चुकीच्या जागी निक्षेपित केल्यास त्याचे परिणाम ही विचित्रपणे अनुभवयास येतात. आणखी महत्वाची गोष्ट अशी की, वास्तू मध्ये प्रसन्नता, देवाची कृपा आपल्यावर रहावी यासाठी रोजच्या रोज दिवाबत्ती लावावी. घरात एक तरी मंगलस्तोत्र नियमित म्हणावे. ज्या वास्तूत तुम्ही राहतात त्या ठिकाणी आपली पत्नी, नवरा, मुल किंवा कोणालाही अपशब्द वापरु नये. कारण वास्तू नेहमी तुमच्या बोलण्याला तथास्तू असे म्हणत असते.
भुकेलेल्यांना अन्नदान, तहानलेल्यांना पाणी आणि गरजूंना आपल्या ऐपतीनुसार मदत करावी तर अतिथींचे आदरातिथ्य करावे. जेणेकरुन वास्तूदेवता तुमच्यावर प्रसन्न होते. वास्तू नेहमीच स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करा. दर गुरुवारी आपल्या वास्तूमध्ये धूप किंवा लोबन अथवा उद जाळावा. रामायण, महाभारताची चित्रे घरात लावू नयेत. वास्तूमध्ये तुम्हाला काही त्रास होऊ लागल्यास अमावस्येला नारळ घरात फिरवून तो उंबऱ्यावर फोडावा. तसेच करणीसारखे प्रकार होऊ नये म्हणून प्रत्येक पौर्णिमेला गोमूत्रात हळद कालवून उंबऱ्यास लावावी. तर या काही वास्तूसंदर्भातील गोष्टी लक्षात घेत त्यानुसार आपण वागण्याचा प्रयत्न करावा. जेणेकरुन आपल्या घरात नेहमीच सुख, शांती आणि प्रसन्नता कायम टिकून राहिल.