1 जून 2001 ही तारीख नेपाळच्या इतिहासात काळ्या अक्षरांनी लिहिली गेली आहे. या तारखेला नेपाळचा युवराज दीपेंद्र वीर विक्रम शाहने, राजा बिरेंद्र आणि आई राणी ऐश्वर्या यांच्यासह कुटुंबातील नऊ जणांवर गोळीबार केला. या हत्याकांडामुळे अवघे नेपाळ नाही तर जग हादरले. या हत्याकांडाचे दूरगामी परिणाम नेपाळच्या राजकारणावर झाले. नेपाळमध्ये (Nepal) राजेशाही संपूष्ठात आली.
त्यानंतर कायम अस्थिर अशा राजकारणाला या देशाला तोंड द्यावे लागले. या घटनेला आता 22 वर्ष होत आली असली तरी, नेपाळमधील (Nepal) जनता हा काळा दिवस विसरलेली नाही. तसेच राजेशाहीलाही नेपाळी जनता विसरली नाही. त्यामुळेच आता 22 वर्षानंतर पुन्हा नेपाळमध्ये राजेशाही स्थापन व्हावी यासाठी जनतेनं आंदोलन सुरु केले आहे. यासाठी गेल्या काही दिवसांपासून नेपाळभर निदर्शने करण्यात येत आहेत.
22 वर्षांपूर्वी नेपाळच्या राजघराण्यात हृदयद्रावक हत्याकांड झाले. यानंतर नेपाळची राजेशाही संपूष्ठात आली. मात्र आता नव्यानं नेपाळमध्ये नागरिकांनी राजेशाही लागू करण्यासाठी निदर्शने सुरू केली आहेत. झापा या छोट्या गावातून त्याची सुरुवात झाली. माजी राजा ज्ञानेंद्र शाह हे दिवंगत राजा पृथ्वी नारायण शाह यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यासाठी या गावी आले होते. त्यावेळी आपल्या माजी राजाला बघून नागरिकांनी पुन्हा राजेशाही हवी असा हट्टच धरला आहे. नेपाळची (Nepal) राजधानी काठमांडूपासून ते औद्योगिक राजधानी विराटनगरपर्यंत ही आंदलने सुरु आहेत.
नेपाळचे (Nepal) नागरिक या मागणीसाठी रस्त्वर उतरले आहेत. आंदोलनादरम्यान काठमांडूमध्ये हिंसाचाराच्या घटना घडल्या आहेत. काही आंदोलकांनी झापा गावात धरणे सुरु केले आहे. या गावात आलेले माजी राजे ज्ञानेंद्र शाह यांचे मोठी मिरवणूक काढून स्वागत करण्यात आले. या आंदोलकांची आक्रमकता पाहून काठमांडू येथील राजेशाही समर्थक नेत्या दुर्गा परसाई यांची नजरकैद संपुष्टात आणण्यात आली आहे.
त्यामुळे आंदोलकांचा राग कमी होईल, असा पोलीसांचा कयास होता. मात्र त्यानंतर राजेशाहीच्या समर्थनार्थ हजारो नागरिकांनी राजधानीच्या मध्यभागी मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला. समर्थकांना रोखण्यासाठी लाठीमार आणि अश्रुधुराचा वापर करण्यात आला. आंदोलकांना पोलिसांनी मारहाण केली. यावेळी हे आंदोलक राजेशाही परत आणा, प्रजासत्ताक संपवा, अशा घोषणा देत होते. राजेशाही समर्थकांनी केंद्र सरकार राज्यघटनेच्या विरोधात काम करत असल्याचा आरोप केला आहे.
हे सगळे होत असतांना काही नागरिक प्रजातंत्राच्या बाजुनेही बोलत आहेत. त्यांनी 1 जून 2001 रोजी झालेल्या हत्याकांडाचा उल्लेख करत, यातील गुढ राजघराण्यानं वाढवल्याचा आरोप केला आहे. कारण 22 वर्षांनंतरही या हत्याकांडाचे गुढ उकलण्यात आले नाही. 1 जून 2001 रोजी नारायणहिटी पॅलेसमध्ये कौटुंबिक सोहळ्यात दारुच्या नशेत आलेल्या युवराज दीपेंद्र वीर विक्रम शाहने गोळीबार केला.
यात त्याचे वडील, राजा बिरेंद्र, आई राणी ऐश्वर्या यांच्यासह कुटुंबातील नऊ जण ठार झाले. हत्याकांडानंतर दीपेंद्र वीर विक्रम शाहने स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून घेतली. गोळी लागल्याने ते कोमात गेले. दीपेंद्र वीर तीन वर्षे कोमात होता. तीन वर्षांनंतर दीपेंद्रला ब्रेन डेड घोषित केल्यानंतर त्याचे काका ज्ञानेंद्र हे नेपाळचे राजा झाले.
या हत्याकांडामुळे फक्त नेपाळच (Nepal) नाही तर सर्व जग हादरले. पहिला प्रश्न आला की, युवराज दीपेंद्रनं एवढं टोकाचं पाऊल का उचललं. त्यानंतर देवयानी राणा हे नाव पुढे आले. भारतातील राजघराण्याशी संबंधित असलेली देवयानी ही एका नेपाळी अधिका-याची मुलगी होती. देवयानी आणि दिपेंद्र यांची परदेशात शिक्षण एकत्र घेतांना ओळख झाली आणि त्याचे प्रेमात रुपांतर झाले. दोघांनाही लग्न करायचे होते. मात्र राणी ऐश्वर्या यांचा याला तिव्र विरोध होता. त्यांना दीपेंद्रचे लग्न आपल्या नात्यातील मुलीबरोबर करुन द्यायचे होते. या कौटुंबिक वादाल कंटाळून युवराज दीपेंद्र यांनी आपल्याच कुटुंबाला संपवले. पण तरीही या हत्याकांडानंतर अनेक गुढ प्रश्न निर्माण झाले.
=============
हे देखील वाचा : तुम्हाला लोणचं खाण्याची सवय असेल तर आधी हे वाचा
=============
शिवाय यात भारतीय गुप्तहेर संघटना रॉचेही नाव पुढे आले. हत्याकांड झाले त्यादिवशी राजघराण्याचे वैयक्तिक सुरक्षा रक्षक नसल्याचे नंतर स्पष्ट झाले. अमेरिकेची सीआयए या संघटनेनं हा सर्व कट आखल्याचा आरोप झाला. शिवाय ज्ञानेंद्र आणि त्यांचे कुटुंब कसे वाचले याबाबतही अनेक प्रश्न विचारण्यात आले. नेपाळी माओवादी पक्षाचे अध्यक्ष पुष्प कमल दहल प्रचंड यांनी या हत्याकांडाला भारताला दोषी ठरवले होते. या हत्याकांडावर अनेक पुस्तकेही आली. आता पुन्हा 22 वर्षांनी नेपाळचे राजघराणे प्रकाशझोतात आले आहे. नेपाळमध्ये (Nepal) चालू असलेल्या आंदोलकांनी नेपाळ आणि राजघराणे यांचा संबंध कोणीही तोडू शकणार नाही, हे स्पष्ट केले आहे. आता या आंदोलनाचा काय परिणाम होतो हे लवकरच स्पष्ट होईल.
सई बने