एलियन नेमके कसे दिसतात. अर्थात परग्रहावर राहणारे जीव कसे दिसतात, हे मोठं कोडं आहे. मुळात परग्रहावर सजीव सृष्टी आहे की नाही, याचाच शोध लागायचा आहे. एलियन आहेत, परग्रहावर सृष्टी आहे, असे सांगितले तरी ते एलियन नेमके कसे दिसत असतील याची मात्र उकल झालेली नाही. शिवाय हे एलियन फक्त एकाच रंगरुपातील असतील असेही नाही. अगदी बारीक जीव असल्यास त्यांनाही एलियन हेच नाव देण्यात येणार आहे. असेच सुक्ष्म एलियन 50 वर्षापूर्वी सापडले होते, मात्र अमेरेकी अंतराळ संस्था, नासाच्या चुकीमुळे हे एलियन मारले गेले. नासावर हा आरोप केला आहे, बर्लिनच्या टेक्निकल युनिव्हर्सिटीच्या एका प्राध्यापकानं. हा आरोप झाल्यावर सर्वत्र खळबळ उडाली आहे. त्यात हे एलियन, म्हणजे सुक्ष्म जीव अन्य कुठल्याही ग्रहावरील नव्हे तर मंगळग्रहावरील होते. 50 वर्षापूर्वी मंगळावरील सूक्ष्मजीवांच्या रूपात एलियन्स मिळाले होते. मात्र नासाच्या एका चुकीमुळे हे सर्व सुक्ष्म जीव मारले गेले. त्या जीवांचे आता संशोधन झाले असते, तर मंगळावरील जीवसृष्टीसंदर्भात आणि मानवाला मंगळमोहीमेसंदर्भात आणखी प्रगती करता आली असती असेही या प्राध्यापकांनं स्पष्ट केलं आहे. (Alien Killed)
पृथ्वीशिवाय अन्य कुठल्या ग्रहावर सजीव सृष्टी आहे, याचा शोध जगभरातील अनेक देशातील अंतराळ संस्था घेत आहेत. अमेरिकेची अंतराळ संस्था, नासा यात आघाडीवर आहे. नासाने एका गुप्त ठिकाणी एलियन ठेवले असल्याची बातमी येते. एवढेच काय पण नासातील शास्त्रज्ञ आणि एलियन यांच्यात भेट होत असल्याचीही बातमी अमेरिकेत फिरते. हे सर्व होत असतांनाच आता बर्लिनच्या टेक्निकल युनिव्हर्सिटीचे प्राध्यापक डर्क शुल्झे-माकुच यांनी मंगळ ग्रहावर जीवसृष्टी असल्याचा दावा केला आहे. हा दावा करतांना डर्क यांनी मंगळावर सुक्ष्म जीव असल्याचे सांगितले आहे. त्यांच्या या दाव्यामुळे जगभरातील अंतराळ शास्त्रज्ञांमध्ये नवा वाद सुरु झाला आहे. प्राध्यापक डर्क यांनी यासंदर्भात दिलेल्या माहितीनुसार, एलियन्सचा (Alien Killed) शोध 50 वर्षांपूर्वी लागला होता. पण अमेरिकन अंतराळ संस्था, नासाच्या एका चुकीमुळे नकळत सर्वांचा नाश झाला. हे एलियन्स म्हणजे, मंगळ ग्रहाच्या मातीत राहणारे सुक्ष्म जीव होते. पण त्यांना योग्यप्रकारे हाताळण्यात आलं नाही. परिणामी हे महत्त्वाचे जीव मारले गेले. हे सांगतांना प्राध्यापक डर्क यांनी नासाच्या 1970 च्या मोहीमेचा उल्लेख केला आहे. (Alien Killed)
नासाने 1970 च्या मध्यात वायकिंग प्रोग्राम सुरू केला होता. याअंतर्गत दोन लँडर मंगळावर पाठवण्यात आले. या मोहीमेमुळे जगाने प्रथमच मंगळाच्या पृष्ठभागाचे चित्र पाहिले. यातून काही अभ्यासकांनी या ग्रहावर जीवसृष्टीची शक्यता तपासण्यासाठी त्यावेळी मातीही आणण्यात आली. या मातीचे विश्लेषणही करण्यात आले. या लाल ग्रहावरील माती नेमक्या कोणत्या प्रकारची आहे, तसेच ती लाल कशामुळे झाली आहे, हे पाहण्यासाठी अनेक परिक्षणे करण्यात आली. या परिक्षणात किरणोत्सर्गी वायू या मातीत असल्याचे आढळून आले. यातूनच काही जीवांचा मृत्यू झाल्याचे प्राध्यापक सांगतात. त्यांच्या मते, मंगळ ग्रहावर उपस्थित असलेल्या सूक्ष्मजीवांमध्ये पाणी हाताळण्याची ताकद नसल्यामुळे त्यांचा नाश झाला. (Alien Killed)
==========
हे देखील वाचा : इस्रोचे ‘पिता’ म्हणून ओळखले जाणारे विक्रम साराभाई
==========
वायकिंग प्रयोगांपैकी एक म्हणजे मातीच्या नमुन्यांमध्ये पाणी जोडण्यात आले. मंगळाच्या मातीत पोषक आणि किरणोत्सर्गी कार्बन असलेले पाणी मिसळले गेले. मंगळावर संभाव्य सूक्ष्मजीव असल्यास ते पोषक द्रव्ये घेतील आणि किरणोत्सर्गी कार्बन वायूच्या रूपात सोडतील असा प्रयोगामागचा उद्देश होता. मात्र यामुळे मंगळग्रहावरील सुक्ष्म जीवांचा मृत्यू झाला. कारण पाण्याबरोबर त्यांचा कधीच संबंध आला नव्हता. तेच पाणी त्यांच्या मृत्यूला कारणीभूत झाले. वाळवंटात हरवलेल्या माणसाला पाणी देण्याऐवजी समुद्रात टाकले तर त्याचे कसे होईल, हेच या मंगळ ग्रहावरील सुक्ष्म जीवांच्या बाबतीत झाले असल्याचे प्राध्यापकांनी डर्क यांनी सांगितले. तसेच मंगळग्रहाचे आताही संशोधन करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्या या दाव्यावर आता अंतराळ शास्त्रज्ञांमध्ये नव्यानं वाद सुरु झाला आहे. एलियन म्हणजे, नेमके काय, याचीही चर्चा सुरु झाली आहे.
सई बने