Home » अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत प्रशासनाने अधिक सतर्क राहून मदत कार्य करावे – उद्धव ठाकरे

अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत प्रशासनाने अधिक सतर्क राहून मदत कार्य करावे – उद्धव ठाकरे

by Correspondent
0 comment
Share

मुसळधार वृष्टी आणि जोरदार वारे यामुळे मुंबई, मुंबई परिसर तसेच कोकणातील जिल्हे त्याचप्रमाणे विशेषत: कोल्हापूरमध्ये उद्भवलेल्या परिस्थितीसंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सातत्याने आढावा घेत असून ते संबंधित जिल्हाधिकाऱ्यांशी व नियंत्रण कक्षांमध्ये स्वत: बोलत आहेत. कोरोनाशी मुकाबला सुरु असताना अतिवृष्टीमुळे संपूर्ण काळजी घेऊन मदत कार्य करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत. काल रात्री पंतप्रधानांना देखील त्यांनी मुंबईतील परिस्थितीबाबत माहिती दिली आहे.

मुख्यमंत्र्यांनी काल रात्री आणि आज सकाळीही मदत व पुनर्वसन सचिव किशोर राजे निंबाळकर यांच्याकडून माहिती घेतली तसेच ते कोकण विभागीय आयुक्त लोकेश चंद्र, मुंबई पालिका आयक्त इक्बाल सिंह चहल यांच्याशीही बोलले व सुचना केल्या. भारतीय हवामान विभागाचे उप महासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांच्याशी बोलून त्यांनी पुढील हवामानाचा काय अंदाज असेल व कशी तयारी करता येईल याविषयी चर्चा केली.

रेल्वे प्रवाशांची सुटका करणाऱ्या जवानांचे कौतुक

कालपासून (५ ऑगस्ट) आज सकाळी ८.३० वाजेपर्यंत सांताक्रूझ येथे १६२,३ मिमी, कुलाबा ३३१.०८ मिमी पाउस झालं. कुलाबा येथे काल सायंकाळी १०६ किमी प्रती तास इतका वाऱ्याचा वेग होता. तर इतरत्र हा वेग ७० ते ८० किमी प्रती तास होता. अतिवृष्टीमुळे रस्त्यावर पडलेली झाडे, विस्कळीत वाहतूक तसेच मदत कार्याविषयी मुख्यमंत्र्यांनी माहिती घेतली. कुर्ला येथे झाड अंगावर पडून एक व्यक्ती जखमी झाला असून ठिकठिकाणी पडलेली झाडे, व फांद्या युद्धपातळीवर दूर करण्यात आल्याचे पलिकेने सांगितले. काल मस्जिद बंदर येथे दोन उपनगरीय रेल्वेमधून २९० प्रवाशाना यशस्वीरीत्या बाहेर काढणाऱ्या रेल्वे पोलीस दलाच्या व एनडीआरएफ जवानांचे त्यांनी कौतुक केले.

पाण्याचा निचरा, पडलेली झाडे काढणे याला प्राधान्य

प्रथमच काल जेजे रुग्णालय येथे तळमजल्यावर पाणी भरले होते परंतु लगेचच यंत्रणेने त्या पाण्याचा निचरा करून रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना त्रास होऊ दिला नाही त्याचप्रमाणे मुंबईत हिंदमाता, शेख मिस्त्री दर्गा रोड, बीपीटी कॉलनी स्काय वॉक, गोल देऊळ, महर्षी कर्वे रोड, पोलीस वसाहत, भायखळा, खेतवाडी आदी ठिकाणी साचलेले पाणी पालिकेने तात्काळ यंत्रणा कार्यान्वित करून काढले याविषयीही त्यांनी समाधान व्यक्त केले.

शहरात १५ ठिकाणी घरांच्या भिंती पडण्याच्या तक्रारी आल्या आहेत. ३६१ ठिकाणी झाडे व फांद्या पडल्या होत्या ते तोडून रस्ता साफ करण्याचे काम सुरु आहे, ते काम लवकरात लवकर पूर्ण करावे असेही मुख्यमंत्री म्हणाले. पेडर रोड ते केम्स कॉर्नर या मार्गावर संरक्षक भिंत पडल्याची घटना घडली आहे त्याचीही माहिती त्यांनी घेतली.




Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.