आपण सगळे वर्तमानपत्रात वाचतो किंवा टीव्हीवर बातम्यांमध्ये बघत असतो की, विजय मल्ल्या किंवा नीरव मोदी यांच्यासारखे लोक भारतात गुन्हे करतात आणि जेव्हा गुन्हे उघड होतात तेव्हा कारवाई होण्याच्या आधीच भारतातून पळून सरळ लंडन गाठतात. यावरून आपल्यासारख्या सामान्य लोकांना प्रश्न पडू शकतो की, खरंच काय आहे लंडनमध्ये? आर्थिक गुन्हा करून गुन्हेगार लंडनचाच आसरा का घेतात? असं नक्की काय आहे तिथे?
बरं, हे सगळे आरोपी लंडन गाठतात इथपर्यंत ठीक आहे, पण मग त्यांना तपास, चौकशी आणि कारवाईसाठी भारतात परत आणायचे असल्यास एवढा खटाटोप का करावा लागतो? आर्थिक गुन्हा करणार्या गुन्हेगारांना भारतात आणणं अशक्य कोटीचं काम आहे का? ही मेख नक्की काय आहे, याबद्दल थोडक्यात आणि सोप्या भाषेत समजावून घेऊया.
जेव्हा एका देशातून गुन्हेगार दुसर्या देशात पळून जातो तेव्हा त्याला पकडणं हे अशक्य होऊन जातं. याचं कारण कुठल्याही देशाची एक न्यायव्यवस्था असते. काही कायदे असतात. देशांतर्गत जर आरोपी फरार झाला असेल, तर त्याला इतर राज्यातल्या तपास यंत्रणांमार्फत शोधून अटक केली जाऊ शकते. पण आरोपी जर देश सोडून दुसर्या देशात गेला, तर तो विषय आंतरराष्ट्रीय होतो आणि मग इथे दोन देशांमधल्या कायदेशीर बाबींचा संबंध येतो. अशा परिस्थितीत दोन देशांमध्ये ‘प्रत्यार्पण करार’ झाला असेल, तर आणि तरच कारवाईसाठी प्रयत्न केले जाऊ शकतात.
प्रत्यार्पण करार म्हणजे दोन देशांमध्ये झालेला एकमेकांच्या आरोपींचं आदानप्रदान करण्यासाठी केलेला करार. कुठल्याही आरोपीने भारतात गुन्हा केला आणि तो परदेशात पळाला, तर त्याला अटक करून भारतात आणण्यासाठी दोन देशांमध्ये प्रत्यार्पण करार असणे अनिवार्य आहे.
भारत आणि ब्रिटन या दोन देशांमध्ये १९९३ साली असा प्रत्यार्पण करार झाला आहे. त्यापूर्वी मात्र भारतात गुन्हा करून ब्रिटनमध्ये पळून गेलेल्या आरोपींना भारतात आणण्यासाठी कोणतीही कायदेशीर योजना अस्तीत्वात नव्हती. पण प्रत्यार्पण करार असूनही विजय मल्ल्या, नीरव मोदी, इ. गुन्हेगारांना अजूनही भारतात परत का आणता येत नाहीये? करार असूनही गुन्हेगार लंडनला का जातात? याचं उत्तर आहे, प्रक्रिया!
प्रत्यार्पण करारानुसार भारतीय परराष्ट्र मंत्रालयाला ब्रिटनच्या परराष्ट्र मंत्रालयाला आरोपीबाबतची सर्व माहिती कागदपत्रे व पुराव्यासहित पाठवावी लागते. ब्रिटनच्या परराष्ट्र मंत्रालयाला पटलं की, संबंधित व्यक्ती आरोपी आहे, तर त्याच्यावर ब्रिटनमधल्या न्यायालयात खटला भरला जातो. जर ब्रिटनच्या न्यायालयात आरोप सिद्ध झाले, तरच भारतीय न्यायालयात खटला सुरू होतो आणि मग ‘ड्युयल क्रिमीनलीटी’ कलमाअंतर्गत आरोपीला भारतात परत आणता येते. परंतु, हे सर्व सहज सोपं नाही.
ब्रिटनमध्ये या कायद्याव्यतिरिक्तही काही कलमं आहेत. जर गुन्हा छोटा असेल तर ब्रिटनमधून आरोपीला भारतात आणले जाऊ शकत नाही. तसंच जर आरोपी म्हणाला की, भारतातले तुरुंग अस्वछ असतात, तिथे जीवाला धोका आहे किंवा तिथे टॉर्चर केलं जातं, तर अशा परिस्थितीत मानवाधिकार संघटनांकडून किंवा आयोगाकडून संबंधित आरोपीला ब्रिटनमधून भारतात आणायची परवानगी नाकारली जाते.
अजून एक गम्मतीशीर मुद्दा म्हणजे जर भारतीय आरोपीने ब्रिटनमध्येच काहीतरी मोठा, गंभीर गुन्हा केला असेल, तर त्याच्यावर ब्रिटनमध्ये खटला भरण्यात येतो आणि मग भारतात केल्या गेलेल्या गुन्ह्यांचा खटला मागे पडतो. याचा निश्चित फायदा आरोपीला मिळतो.
बरं मग प्रश्न उभा राहतो की, ब्रिटन अशा पद्धतीने परकीय आरोपींना आश्रय का देतं? याचं उत्तर आहे… अर्थातच पैसा! ब्रिटीश सरकार जगभरातील आर्थिक गुन्हे केलेल्या आरोपींना आश्रय देतं आणि त्यांना सांगतं याबदल्यात तुम्ही तुमचे पैसे आमच्या देशात गुंतवा. झालं, तर असं सगळं त्रांगडं आहे.
हे ही वाचा: ताजमहल, लाल किल्ला आणि राष्ट्रपती भवन विकणारा नटवरलाल (Natwarlal) आहे तरी कोण?
हिंदू धर्मात मृत्यूपश्चात लहान मुलांना अग्नी न देता दफन का करतात?
“गोलमाल है भाई सब गोलमाल है…” आता तुम्हाला लक्षात आलं असेल की, गुन्हा करणं आणि लंडनला जाणं यांच्यामध्ये काय कनेक्शन आहे. तर, मित्रांनो अशी सगळी गम्मत आहे… !
निखिल कासखेडीकर