मध्य प्रदेशातील माळवा जिल्ह्यातील नलखेडा तालुक्यात त्रिशक्ती बगलामुखी मातेच्या मंदिरात नवरात्री निमित्त भक्तांची गर्दी झाली आहे. तांत्रिकांची देवी अशी ओळख असलेल्या या बगलामुखी देवीचे मंदिर स्मशानाच्या बाजुला आणि नदीच्या काठावर आहे. जगात अगदी हाताच्या बोटावर मोजता येतील अशी या बगलामुखी मातेची मंदिरे आहेत. त्यापैकी हे मध्यप्रदेशमधील मंदिर त्रिशक्ती बगलामुखी माता मंदिर अत्यंत जागृत मानले जाते. या मंदिरात होम हवन करण्यासाठी भारतभरातून साधू-संत येतात. शैव आणि शाक्त पंथातील ऋषींसाठी हे एक सिद्धपिठ मानण्यात येते. या मंदिरात देशातील अनेक नेते यज्ञविधी करतात.(Temple)
त्रिशक्ती बगलामुखी मातेचे मंदिर मध्य प्रदेशातील आगर माळवा जिल्ह्यातील नळखेडा शहरात लाखंदर नदीच्या काठावर आहे. द्वापार काळातील हे मंदिर अत्यंत चमत्कारिक असल्याचे मानले जाते. या मंदिरात त्रिशक्ती माता स्वयंभू असल्याचे सांगितले जाते. नेपाळ, मध्य प्रदेशातील दतिया आणि मध्य प्रदेशातील नलखेडा या तीनच ठिकाणी त्रिशक्ती बगलामुखी मातेच्या मुर्ती आहेत. यापैकी ही नळखेडा येथील मातेचे मंदिर सिद्धपिठ असल्याचे मानले जाते. या मंदिरात सध्या नवरात्रोत्सवानिमित्त विविध धार्मिक विधी होत आहेत. नित्यनेमानं होम-हवन होत आहेत. या सर्व सोहळ्यांना भाविकांची प्रचंड गर्दी झाली आहे. यासोबत भारतभरातील अनेक साधूही मातेच्या दर्शनासाठी मंदिरात (Temple) आले आहेत.
या त्रिशक्ती बगलामुखी मातेचा महिमा अनेक पौराणिक ग्रंथात सांगितला आहे. प्राण तोशिनी हे तंत्रविद्येवर आधारित पुस्तक आहे यामध्ये माता बगलामुखीचे मूळ वर्णन केले आहे. त्यानुसार सत्ययुगात एक विनाशकारी वादळ आले होते. त्या वादळात संपूर्ण विश्वाचा नाश करण्याची क्षमता होती. हे वादळ थांबवण्यासाठी भगवान विष्णूंनी सौराष्ट्र प्रदेशातील हरिद्र सरोवराजवळ तपश्चर्या केली. त्यांच्या तपश्चर्येने प्रसन्न होऊन चतुर्दशी तिथीला त्रिशक्ती बगलामुखी माता प्रकट झाली आणि त्या विनाशकारी वादळापासून सर्वांचे रक्षण केले. मातेची त्रिशक्तीच्या रुपातील मुर्ती असणारे हे भारतातील एकमेव मंदिर आहे. मंदिरात मातेच्या स्वयंभू मूर्तीमध्ये तीन देवी आहेत. मध्यभागी माता बगलामुखी, उजव्या भागात माता लक्ष्मी आणि डाव्या भागात माता सरस्वती आहे. माता बगलामुखी ही महारुद्राची मूळ शक्ती म्हणून ओळखली जाते.(Temple)
या सिद्ध मंदिराची स्थापना पांडवांनी भगवान श्रीकृष्णाच्या आदेशानुसार केली अशी माहिती आहे. मंदिर स्थापल्यानंतर महाभारत युद्धात विजय मिळवण्यासाठी राजा युधिष्ठिरने माता बगलामुखीची पूजा केली. या मंदिरात हनुमान, भगवान श्रीकृष्ण आणि कालभैरव यांचीही मंदिरे आहेत. या मंदिर परिसरात महाराजा विक्रमादित्य यांनी दिव्य दिपमाळ उभारली आहे. ती 80 फूट आहे. याशिवाय या मंदिराच्या द्वारावर दोन सिंह आहेत. त्यांच्या भव्य प्रतिकृती बघण्यासाठीही भाविकांची गर्दी होते.
त्रिशक्ती बगलामुखी माता हे संत आणि तांत्रिकांसाठी साधनचे उत्तम स्थान मानले जाते. द्वापर काळापासून या मंदिरात ऋषी-मुनी तांत्रिक विधीसाठी येत असल्याची माहिती स्थानिक देतात. या मंदिराचे स्थान अत्यंत चमत्कारीक आहे. या मंदिराच्या चारही बाजूंनी स्मशानभूमी आहे. याशिवाय मंदिर नदीच्या काठावर असल्याने हे ठिकाण तांत्रिक साधनेसाठी योग्य मानले जाते. या मंदिराच्या आजूबाजूला आणि नदीच्या काठावर अनेक ऋषी-मुनींच्या समाधी आहेत. या मंदिराचा मिर्ची हवन हा भारतभर प्रसिद्ध आहे. हा होम सर्व प्रकारच्या संकटांपासून मुक्त होण्यासाठी आणि शत्रूंचा नाश करण्यासाठी केला जातो. मंदिराच्या मागे एक हवन स्थान आहे जिथे एकाच वेळी 25-30 हवन केले जातात. हा हवन विधी प्रत्यक्ष पाहण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी होते. त्रिशक्ती बगलामुखी मातेला पूर्वी देहरा माता या नावानंही ओळखले जायचे. मातेला पूजा करतांना हळद आणि पिवळ्या रंगातील पुजा साहित्य दिले जाते. त्रिशक्ती बगलामुखी मातेमध्ये भगवान अर्धनारीश्वर महासंभाचे रूप पाहता येते. देवीच्या कपाळावरील तिसरा डोळा आणि रत्नजडित मुकुट आणि चंद्र यावरुन देवीचे भक्त देवीला सिद्धमाता म्हणतात. देवीच्या या रुपामुळेच देवीला महारुद्राची मूळ शक्ती मानण्यात येते.
===========
हे देखील वाचा : सृष्टीच्या आरंभापासून पूजली जाणारी विंध्यवासिनी माता
==========
त्रिशक्ती बगलामुखी मातेच्या मंदिराच्या (Temple) बाहेर सोळा खांब असलेला सभामंडप आहे. हा सभामंडप 252 वर्षांपूर्वी पंडित इबुजी दक्षिणी कारागीर श्रीतुलाराम यांनी बांधल्याची माहिती आहे. मंदिरात अनेक झाडे आहेत, त्यात बिल्वपत्र, चंपा, पांढरा आकडा, आवळा, कडुलिंब आणि पिंपळ यांचा समावेश आहे. शिवाय मंदिराच्या बाजुला मोठी बागही आहे. नवरात्रोत्सवानिमित्त या सर्व परिसरात भक्तांचा मोठा मेळा भरला आहे.
सई बने