आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्या दाव्यानं देशभर खळबळ उडाली आहे. भारतील सर्वात श्रीमंत देवस्थान असलेल्या तिरुपती बालाजी मंदिरातील (Tirupati Temple) लाडू प्रसादाबाबत चंद्राबाबू नायडू यांनी केलेल्या दाव्यामुळे देशभरातील भाविकांना धक्का बसला आहे. तिरुपती बालाजी मंदिरात जाणा-या प्रत्येक भाविकाला हा प्रसादाचा लाडू देण्यात येतो. या लाडूची परंपरा ही जवळपास 300 हून अधिक वर्ष जुनी आहे. या लाडवांना मानांकन मिळाले आहे. याच ‘लाडू प्रसादम’मध्ये प्राण्यांची चरबी मिसळली जात होता, असा आरोप खुद्द मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी केल्यामुळे बालाजी भक्तांमध्ये संतापाची भावना आहे. मुख्यमंत्री नायडू यांनी कॉंग्रेस कालखंडात बालाजीच्या प्रसादामध्ये चरबीचा वापर होत असल्याचे जाहीरपणे सांगितले आहे. मुख्यमंत्री नायडू यांनी आंध्रप्रदेशमध्ये काही वर्षापूर्वी सत्तेवर असलेल्या वायएसआरसीपी सरकारवर हा आरोप केला आहे. वायएसआरसीपी सरकारच्या काळात तिरुपती मंदिराच्या प्रसादात प्राण्यांची चरबी वापरली जात होती. मात्र आपल्या राजवटीत आता शुद्ध तूप वापरले जात असल्याचे नायडू यांनी सांगितल्यावर एकच खळबळ उडाली. या आरोपामुळे आता आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीही सुरू झाल्या आहेत.
एनडीए विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री नायडू यांनी हा धक्कादायक दावा केला आहे. त्यांनी यासाठी वायएसआरसीपी सरकारला दोषी ठरवले आहे. या सरकारच्या काळात जगप्रसिद्ध तिरुपती मंदिरात लाडू बनवताना निकृष्ट घटकांचा वापर केला होता. शुद्ध तुपाऐवजी प्राण्यांची चरबी वापरली जात होती. आता आपण शुद्ध तुपाचा वापर सुरु केल्याची पुष्टीही त्यांनी केली आहे. चंद्राबाबू नायडू यांनी हा आरोप केल्यावर विरोधकांनी त्याच्यावर टीका सुरु केली आहे. कारण हा मोठा धार्मिक मुद्दा ठरणार आहे. तिरुपती बालाजी मंदिरात रोज हजारो लाडू संपतात. लाखो बालाजीचे भक्त हे लाडू भक्तीभावानं घेतात. त्यात प्राण्यांची चरबी होती, ही गोष्ट त्यांच्या धार्मिक भावनेला धक्का लावणारी ठरणार आहे. हा दावा चंद्राबाबू नायडू यांनी केल्यावर वायएस जगन मोहन रेड्डी यांच्या नेतृत्वाखालील पक्षाने त्याचे खंडन केले आहे. तसेच हा आरोप म्हणजे दुर्भाग्यपूर्ण असल्याचे म्हटले आहे. राजकीय फायद्यासाठी चंद्राबाबू नायडू यांनी तिरुमला मंदिराच्या पावित्र्याला आणि शेकडो कोटी हिंदूंच्या श्रद्धेला धक्का दिल्याचे विरोधी पक्षातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. (Tirupati Temple)
तिरुमला येथील भगवान व्यंकटेश्वर स्वामी मंदिर जगभरातील तिरुपती भक्तांचे श्रद्धेचे स्थान आहे. येथील ‘अन्नदानम’ म्हणजेच मोफत अन्नदान सेवेचा लाभ लाखो भाविक घेतात. यातच भेसळ असल्याची बातमी आल्यानं भाविकांच्या भावान दुखावल्या आहेत. तिरुपती येथील श्री व्यंकटेश्वर मंदिरात तिरुपती लाडूंचे विशेष महत्त्व आहे. मंदिर, तिरुमला तिरुपती देवस्थानमतर्फे चालवले जाते. या मंदिराला भेट दिल्यानंतर भाविकांना लाडूचा प्रसाद देण्यात येतो. हे लाडू बनवण्यासाठी बेसन, काजू, वेलची, तूप, साखर, साखर आणि बेदाणे यांचा वापर होतो. यासाठी प्रथम गोड बुंदी तयार केली जाते. त्यासाठी तुपाचा वापर होतो. बुंदी बनवल्यानंतर ती कन्व्हेयर बेल्टद्वारे मंदिराच्या मुख्य आवारात पाठवली जाते. नंतर त्यात त्यात काजू, सुकी द्राक्षे, कलाकंद आणि वेलची टाकली जाते. त्यानंतर पोट्टू म्हणजेच लाडू बनवणा-या स्वयंपाकघरात कामगार त्यांच्या तळहातावर तूप लावून या मिश्रणाचे लाडू तयार करतात. तिरुपती मंदिरात दररोज 8 लाख लाडू तयार करण्याची क्षमता आहे. मंदिरात दररोज 620 कर्मचारी प्रसाद बनवण्याचे काम करतात. हे तिरुपती लाडू 308 वर्षे जुने आहेत. या लाडूंना GI टॅगही मिळाला आहे. या लाडवांना श्री वारी लाडू म्हणूनही ओळखले जाते.
==============
हे देखील वाचा : अदिती राव हैदरी आणि सिद्धार्थ अडकले विवाहबंधनात
==============
श्री वारी किंवा तिरुपती लाडू बाबत एक कथा सांगितली जाते. एकेकाळी भगवान वेंकटेश्वर भगवान विष्णूच्या भक्तांच्या लग्नासाठी संपत्ती जमा करण्यासाठी पृथ्वीवर आले होते. यावेळी एका स्थानिक महिलेने त्यांना तांदळाचे पीठ आणि गूळ मिसळून बनवलेली स्वादिष्ट मिठाई भेट दिली. तिच्या या प्रेमाच्या बदल्यात, भगवान वेंकटेश्वराने तिला मंदिरात अनंतकाळ हा प्रसाद मिळेल, असा आशीर्वाद दिला. अशा प्रकारे भगवान व्यंकटेश्वराला प्रसाद म्हणून लाडू अर्पण करण्याची परंपरा सुरू झाली. (Tirupati Temple)
तिरुपती मंदिरात वेंकटेश्वराला अर्पण केलेले लाडू पहिल्यांदा 2 ऑगस्ट 1715 रोजी भक्तांमध्ये वाटण्यात आले. आता अगदी सामान्य दरात हे लाडू भक्तांना देण्यात येतात. त्यासाठी विशिष्ट टोकन देण्यात येते. सणासुदीच्या काळात तिरुपती मंदिराच्या प्रसादाची मागणीही मोठी वाढते. विशेषत: ब्रह्मोत्सवाच्या काळात या लाडूंची विक्री २४ तास सुरू राहते आणि सर्व विक्रम मोडीत काढतात. 2015 मध्ये जास्तीत जास्त 1.8 दशलक्ष लाडू विकले गेले. आता हेच तिरुपती बालाजीचे लाडू चर्चेत आले आहेत. आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी केलेल्या दाव्यामुळे बालाजी भक्तांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे.
सई बने