अनुराधा भोसले (Anuradha Bhosale) यांची कामगिरी महाराष्ट्रातच नाही तर, देशाच्या कानाकोपऱ्यात पोचली ती ‘कौन बनेगा करोडपती’ या कार्यक्रमामुळे. प्रतिकूल परिस्थितही संघर्ष करून पुढे जाणाऱ्या आणि आपल्यावर जी वेळ आली ती शत्रूवरही येऊ नये, या विचाराने आपलं आयुष्य सामाजिक कार्य करण्यासाठी झोकून देणाऱ्या कोल्हापुरातील अनुराधा भोसले यांची जीवनकहाणी थक्क करणारी आहे.
अनुराधा भोसले (Anuradha Bhosale) यांचे बालपण अत्यंत बिकट परिस्थिती गेले. स्थलांतरित कामगार कुटुंबात त्यांचा जन्म झाला असल्याने रोजच्या रोजीरोटीचा प्रश्न त्यांना कायम भेडसावत असे. ज्या वयात इतर मुलं शाळेचा गणवेश घालून पाटीवर अ, आ, ई गिरवत होते, त्या वयात म्हणजे वयाच्या अवघ्या सहाव्या वर्षी अनुराधा भोसले या आपल्या आईसोबत घरोघरी जाऊन घरकाम करत असत. रोजच्या अन्नाव्यतिरिक्त आपल्या मुलीला शिक्षण देण्याची त्यांच्या आईवडिलांची ऐपत नव्हती. पण म्हणतात ना, इच्छा तिघे मार्ग हा सापडतोच!
इतर मुले ज्या प्रमाणे शाळेत जातात तसेच आपण ही शाळेत जाऊन शिकावे ही इच्छा त्यांनी एका व्यक्तीजवळ व्यक्त केली आणि त्या व्यक्तीने अनुराधा यांच्या शालेय शिक्षणाचा संपूर्ण खर्च उचलला. आणि तिथूनच मग अनुराधा यांच्या आयुष्याला वेगळे वळण मिळाले.
मिळालेल्या संधीचा परिपूर्ण लाभ घेत त्यांनी शिक्षणातील एक एक टप्पा गाठला आणि आपल्यावर आलेल्या परिस्थितिची जाणीव असल्याने त्यांनी समाज कार्यात पदव्युत्तर पदवी प्राप्त केली. शिक्षणापासून वंचित राहणे काय असते, हे त्यांनी जवळून पाहिले होते. म्हणून स्थलांतर कामगारांच्या मुलांना शिक्षणाचा हक्क मिळावा यासाठी त्यांनी अनेक प्रयत्न सुरू केले.
चौवीस वर्षांपूर्वी त्यांनी बजाज ऑटो कंपनीच्या सामाजिक विभागातून ‘अवनी’ या सामाजिक संस्थेची स्थापना केली. ही संस्था बालमजुरी, स्त्रीभ्रूणहत्या, अवैधरित्या होणारी बाल तस्करी अशा क्रूर कृत्यांविरोधात लढा देते.
१९९५ मध्ये त्यांनी बालमजुरी विरुद्ध बंड पुकारले होते. वय वर्षे ७ ते ११ वयोगटातील मुले ही वीट भट्टीवर दिवसाला २० रुपयांवर बारा तास काम करत असत घरची परिस्थिती बेताची असल्याने एकवेळच्या जेवणाची सोय करणं मुश्किल असल्यामुळे, या मुलांना शिक्षण तर लांबीचीच गोष्ट असायची. अशा मुलांकडून वीट भट्टीवरील मालक कमी पैशात जास्तीचे काम करून घ्यायचे.
घडत असलेला प्रकार अवनी संस्थेच्या लक्षात येताच त्यांनी वीटभट्टी मालकांना बालमजुरी कायद्याची जाणीव करून दिली. मात्र त्याकडे दुर्लक्ष करत वीटभट्टी मालक राजरोसपणे बालमजुरी करत असल्याने अनुराधा आणि त्यांच्या अवनी या संस्थेने केलेले आंदोलन यशस्वी झाले.
हे ही वाचा: ज्या इंग्रजांनी भारतीयांना पाण्यात पाहिले त्यांच्याच देशात ‘या’ शास्त्रज्ञाचे अविष्कार प्रचंड लोकप्रिय झाले
सोलापूरच्या ‘या’ मुलीने गाढवाच्या दुधामुळे जगात नाव गाजवले आहे
या संस्थेने वीटभट्टीवरील ११ मुलांची बालमजुरीपासून सुटका केली. या मुलांना आणि त्यांच्या कुटुंबाला दत्तक घेत त्यांना मोफत आरोग्य आणि शिक्षण उपलब्ध करून दिले. २००५ मध्ये अनाथ मुलांकरिता वसतिगृह स्थापन केले. स्थलांतर कामगारांची आर्थिक परिस्थिती बेताची असते अशा कुटुंबाचे पुनर्वसन करून त्यांना स्थिरता प्राप्त करून देण्यास अवनी एनजीओचा मोठा हातभार आहे.
हे देखील वाचा: श्रीकांत ठाकरे दीड वर्षांचे असताना अशी कोणती घटना घडली की तेव्हापासून त्यांचे संगीताशी घट्ट नाते जमले
आतापर्यंत हजारहून अधिक मुलांना शालेय शिक्षण मिळवून देण्यात ही संस्था यशस्वी झाली आहे. त्यांच्या या कार्याबद्दल अनुराधा भोसले यांना त्यांनी सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या कामगिरीसाठी महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचा ’बाया कर्वे पुरस्कार’ मिळाला आहे. गेले दोन वर्षे कोरोनाने सक्तीचे झालेल्या डिजिटल शिक्षणामुळे मुलांना लॅपटॉप, कम्प्युटर आणि स्मार्टफोन उपलब्ध करून त्यांना त्यांचे तांत्रिक शिक्षण मिळावे या करिता ही संस्था प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहे.
-निवास उद्धव गायकवाड