विजय माल्या भारत देशातून गायब झाला असून परदेशात असल्याचे आपण प्रसारमाध्यमांमधून पाहत असतो. त्याला भारतात आणण्याचे अनेक प्रयत्न झाले, पण अजून तरी त्याला भारत सरकारकडे सुपूर्द करण्यात आलेले नाही. मल्याने त्याच्या आयुष्यात अनेक उद्योगधंदे केले. काही उद्योगधंद्यांमध्ये त्याला यश मिळाले, तर काहींमध्ये प्रचंड तोटा सहन करावा लागला.
माल्या कुटुंबाच्या उद्योगधंद्यांची सुरुवात खऱ्या अर्थाने त्याचे वडील विट्टल माल्या यांनी केली होती. ज्या काळी शेअर मार्केट बद्दल लोकांना काहीच माहिती नव्हती तेव्हा विट्टल माल्या यांनी शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीला सुरुवात केली. त्यांनी युनायटेड ब्रेवरी या कंपनीचे शेअर विकत घेतले होते. काही दिवसांनी त्यांच्याकडे कंपनीचे एवढे शेअर आले की, ते चेअरमन बनले.
त्यांचा या कंपनीत हळू हळू जम बसत होता. नंतर त्यांनी मग स्वतःचे उद्योगधंदे वाढवण्यास सुरुवात केली. सर्वात आधी विट्टल यांनी मॅक डोवेल्स लिमिटेड कंपनी विकत घेतली. त्यानंतर हळूहळू एक एका उद्योगात जम बसवायला सुरुवात केली. वाईन, दारू, रिअल इस्टेट, इंजिनिअरिंग, बायोटेकनॉलॉजी, आयटी आणि ॲग्रीकल्चर क्षेत्रात त्यांनी प्रवेश केला.
हळूहळू त्यांचे उद्योग धंदे वाढायला लागले होते. पण नियतीला बहुदा हे मान्य नव्हते. त्यातच अचानक एक दिवस विट्टल माल्या यांचा मृत्यू झाला आणि सगळी जबाबदारी २८ वर्षांच्या विजय माल्या यांच्या डोक्यावर येऊन पडली. कमी वयात जबाबदारी अंगावर पडल्यामुळे विजय माल्या घाबरून गेले होते, पण परिस्थितीपुढे त्यांना स्वतःला सिद्ध करून दाखवायचे होते.
विजय माल्या यांनी सर्व उद्योगसमूहाचे ओझे १९८३ ला स्वतःच्या डोक्यावर घेतले. असं एकही क्षेत्र नसेल ज्यात विजय माल्या यांनी स्वतःला आजमावून पहिले नसेल.
विजय माल्या कर्नाटक राज्यातून राज्यसभेवर खासदार म्हणून निवडून गेले. १९९७ साली तर त्यांना ‘डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी इन बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन’ या किताबाने दक्षिण कॅलिफोर्निया येथील एका विद्यापीठाने सन्मानित केले होते.
====
हे देखील वाचा: अर्थतज्ज्ञ रघुराम राजन (Raghuram Rajan) यांनी २००५ साली दिली होती भविष्यातील मंदीची सूचना!
====
हळूहळू एक एका क्षेत्रात नशीब आजमवल्यामुळे त्यांनी एअरलाईन्स क्षेत्रात नवीन सुरूवात केली. ‘किंगफिशर एअरलाईन्स’ नावाने सुरु केलेला उद्योग माल्या यांना जागतिक स्तरावर न्यायचा होता. त्यांनी जी लोक किंगफिशर एअरलाईन्सचे फर्स्ट क्लास विमानाचे तिकीट काढतील त्यांच्यासाठी दारू फुकट देण्याची घोषणा केली. त्यानंतर विमानातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढतच गेली.
विजय माल्या यांना स्वतःची एअरलाईन्स बाहेरच्या देशात न्यावी असे वाटायला लागले. पण त्यासाठी त्यांनी ५ वर्षाचा देशांतर्गत प्रवासाचा कालावधी पूर्ण न केल्यामुळे अडथळे येत होते. त्यांनी एअर डेक्कन नावाची कंपनी त्यांनी विकत घेतली आणि २००८ ला बंगलोर वरून लंडनला विमानाची पहिली फेरी यशस्वी करून दाखवली. हळूहळू किंगफिशर एअरलाईन्स आणि एअर डेक्कनने मिळून देशातील विमान वाहतुकीचा जवळपास २२.५ टक्के भाग व्यापून टाकला होता.
त्यानंतर खर्च आणि कमाईचा मेळ जमत नसल्यामुळे विमान वाहतुकीत अडचण निर्माण व्हायला लागली. मग त्यांनी बँकांकडून चक्क ९,००० कोटी रुपयांचे कर्ज घेतले. कर्ज घेतल्यानंतर पण विमान वाहतुकीवर खर्च जास्त आणि कमाई कमी अशा अडचणी उभ्या राहायला लागल्या. त्यानंतर खरी गंमत २०१२ साली आली, कारण माल्या यांना किंगफिशर एअर लाईन्स प्रचंड तोट्यामुळे चक्क बंद करावी लागली.
====
हे देखील वाचा: सुरक्षारक्षक ते स्वतंत्र व्यावसायिक – तरुणाच्या यशाचा प्रेरणादायी प्रवास! (Watchman to Entrepreneur)
====
विजय माल्या विमान वाहतुकीच्या धंद्याच्या आडून भारतातून पैसे बाहेरच्या देशांमध्ये मनी लॉन्ड्रींग करत होता. हे कळायला बँकांना खूप उशीर झाला होता. त्यानंतर गुपचूप २ मार्च २०१६ रोजी विजय माल्या भारत सोडून गुपचूप परदेशात पळून गेला. विजय मल्याने अशा काही गोष्टी केल्या होत्या की, ज्यामुळे त्याचा एअरलाईन्सचा उद्योग पूर्णतः बुडाला.
विजय मल्याने नियोजन करून उद्योग न केल्यामुळे त्याला विमान वाहतुकीचा अंदाज आला नाही. त्याने फर्स्ट क्लास, लक्जरी क्लास असे अनेक प्रकार प्रवाशांना उपलब्ध करून दिल्यामुळे ग्राहक वर्गाचे प्रवासात सातत्य राहिले नाही. नियोजन व्यवस्थित नसल्यामुळे आर्थिक फायदा झाला नाही.
२००८ मध्ये आर्थिक मंदी आली होती. त्यामुळे उद्योगावर मोठा परिणाम झाला. जास्त अपेक्षा ठेवल्यामुळे त्याला आहे ते पण गमवावे लागले. विजय मल्याने देशाशी गद्दारी केली, त्यामुळे त्याचा उद्योग रसातळाला गेला. त्यामुळे आपण जेव्हा एखादे काम किंवा उद्योग करत असू, तेव्हा देशाशी प्रामाणिक असायला हवे. त्यामुळे कायम आपण आपल्या देशाच्या ऋणात राहून सेवा करण्याची संधी मिळत असते.
– विवेक पानमंद