सध्या सर्वांचीच एक तक्रार आहे, यंदा गरमी जास्त आहे. उन्हाळा कडक आहे. वाढती उष्णता आणि अंगातून निघणा-या घामाच्या धारांनी सर्वच हैराण झाले आहेत. हे तप्त वातावरण कधी बदलणार याची प्रतीक्षा सर्वांना आहे. मात्र ही प्रतीक्षा आणखी काही दिवस लांबणार आहे. उलट हा जो उन्हाळा आहे, त्यापेक्षा कडक ऊन पुढच्या काही दिवसात पडणार आहे. याला नौताप, किंवा नवताप म्हणता. हा नौताप सुरु होणार आहे, २५ मे पासून आणि त्याची तीव्रता २ जून पर्यंत जाणवणार आहे. (Nautapa 2024)
२५ मे रोजी सूर्य रोहिणी नक्षत्रात प्रवेश करणार आहे, त्याचवेळी हा नौताप सुरु होईल. या काळात सूर्याची उष्णता अधिक कडक होते. त्यानंतर पुढचे नऊ दिवस हे तापदायक असतात. पृथ्वीला तापवणा-या या कडक उष्णतेचा माणसाला त्रास होत असला तरी हा नौताप शेतीसाठी भरभराटीचा असल्याचे सांगितले जाते. कारण जेवढा नौताप कडक तेवढाच पाऊस जास्त आणि शेतीसाठी त्याचा फायदा जास्त होतो. पाऊस सर्वदूर पडतो, आणि पाण्याचा प्रश्न सुटतो, असे मानण्यात येते.
सूर्यदेवाच्या वाढत्या उष्णतेमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. पण या उष्णतेपेक्षाही जास्त उष्णता येत्या काही दिवसांत जाणवणार असल्याची भविष्यवाणी करण्यात आली आहे. मराठी महिन्यात वैशाख महिना हा अतिउष्णतेचा मानण्यात येतो. त्यामुळेच त्याला वैशाख वणवा म्हणतात. या वैशाख वणव्यात माणसांना कितीही त्रास झाला तरी हा वैशाख वणवा शेत जमिनीची चांगली मशागत करतो. या वैशाख महिन्यानंतर ज्येष्ठ महिना सुरु होतो. दरवर्षी जेष्ठ महिन्यातील पहिले नऊ दिवस हे तीव्र उष्णतेचे असतात. त्यांना नौताप असे म्हणतात.
२ जून पर्यंत त्याची झळ सर्वानाच बसणार आहे. ज्येष्ठ महिन्याच्या सुरुवातीला सूर्यदेव कृतिका नक्षत्र सोडून रोहिणी नक्षत्रात प्रवेश करतो, त्यावेळी या नौतपाची सुरुवात होते. २५ जूनला सूर्यदेव पहाटे ३.१६ वाजता रोहिणी नक्षत्रात प्रवेश करणार आहेत. तर २ जून रोजी सूर्यदेव मृगाशिरा नक्षत्रात प्रवेश करणार आहेत. या नऊ दिवसांमध्ये सूर्यामुळे पृथ्वी तापू लागते. सूर्य जणू आग जमिनीवर टाकत आहे, अशी परिस्थिती निर्माण होते. या नौताप काळाबद्दल भारतीय पौराणिक ग्रंथांमध्येही बराच उल्लेख करण्यात आला आहे. (Nautapa 2024)
या नौतापाच्या कालावधीत जेवढा सूर्य आग बरसत असतो, तेवढा पाऊस चांगला पडतो, असेही सांगण्यात आले आहे. या पौराणिक ग्रंथांनुसार मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात सूर्य आणि पृथ्वीमधील अंतर कमी होते. त्या काळात सूर्याची किरणे थेट पृथ्वीवर पडतात, त्यामुळे या दिवसांत उष्णता सर्वाधिक असते.
या कालावधीत उष्णता वाढल्यामुळे आजारपण येण्याचीही जास्त शक्यता असते. त्यामुळे त्यासंदर्भात योग्य काळजी घेणे गरजेचे असते. या दिवसात आपल्या आहारापासून आपण घालत असलेल्या कपड्यांसंदर्भातही काळजी घ्यावी लागते. आहारात जास्तीत जास्त पातळ पदार्थांचा समावेश असावा. तसेच हे पदार्थ पचायला हलके असावेत, असे सांगण्यात आले आहे. स्कंद पुराणानुसार नौतपाच्या वेळी गरजूंना अन्न, पाणी, सत्तू, पंखा, माठ, हंगामी फळे, कपडे, छत्री अशा वस्तू दान कराव्यात असा उल्लेख आहे. (Nautapa 2024)
यावर्षी हा नौताप कसा असणार याचीही भविष्यवाणी काहींनी केली आहे. काही ज्योतिषांच्या मते, यावर्षी २०२४ मध्ये नौतपाच्या काळात शनि प्रतिगामी अवस्थेत असणार आहे. या वेळी नौतापामध्ये जोरदार वारा, चक्रीवादळ आणि पाऊस पडेल, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. नौतापाच्या शेवटच्या २ दिवसात वादळ आणि पावसाची शक्यताही सांगण्यात आली आहे.
=============
हे देखील वाचा : काश्मिरहून सुंदर असलेल्या पाकव्याप्त कश्मिरची दुर्दशा
=============
हा नौतापाचा कालावधी कसा असेल, यावर शेतक-यांचेही लक्ष असते. कारण या नऊ दिवसांत हवामानाचे निरीक्षण करून शेतकरी पावसाचा अंदाज बांधतात. नौतापामध्ये दिवस मोठा आणि रात्र लहान असते. नौतापामध्ये जेवढी उष्णता तेवढा चांगला पाऊस असे शेतकरी सांगतात. (Nautapa 2024)
मात्र नौतापामध्ये थोडा पाऊस पडला तर तो चांगला समजण्यात येत नाही. काही पौराणिक ग्रंथांत नौतापाला मान्सूनची गर्भावस्था मानतात. आता हा नौताप सुरु होण्याआधीच उष्णतेनं बेजार झालेल्या नागरिकांसाठी मात्र हा नौताप अधिक तापदायक ठरणार हे नक्की.
सई बने