‘गेली ३० वर्षें हाॅलिवूडच्या तज्ज्ञांना हा प्रश्न गोंधळात टाकतो आहे– नायक जास्त महत्त्वाचा की चित्रपट? यावर इतकी जीव खाऊन चर्चा झाली आहे की असा विचारदेखील आता भावनिक खळबळ निर्माण करतो. …कदाचित याला एक वैध प्रतिसाद म्हणून असे विचारता येईल :
‘आत्ता तुम्ही म्हणालात ते काय?’ अंडे आधी की कोंबडी अशासारखाच आचरट प्रश्न आहे हा.’
(‘हिंदुस्तानी सनत ए फिल्मसाज़ी पर एक नज़र’/ बाॅलीवूडने काय करायला हवे?’)
बाॅलीवूड या भारतीय चित्रपटाच्या तथाकथित परंपरेने अनेक वर्षं नायककेंद्री चित्रपट करून स्वतःचं कल्पनादारिद्र्यच सिद्ध केलं. त्यामुळे मंटोला सत्तर वर्षांपूर्वी जो प्रश्न पडला तो प्रश्न आजही कलारसिकांना अनेक वेळा पडतो. त्या सुमारास भारतीय चित्रपटनिर्मिती ही बाल्यावस्थेमध्ये होती, तरीही मंटोसारखा रसिक आणि अभ्यासू सिनेपत्रकार असा प्रश्न उपस्थित करून आपल्या लेखनामधून त्या प्रश्नाला मांडत होता, हे वाचून आश्चर्य वाटतं.
सिनेमाकडे केवळ मनोरंजनाच्या दृष्टिकोणातून न बघता सिनेमाच्या अनेकविध तांत्रिक अंगांचं परीक्षण मंटो करतो. त्याच्या या चिकित्सक नजरेचं आणि विचारांचं मूळ त्याच्या पौगंडावस्थेतील, तारुण्याच्या उमलत्या काळातील अमृतसरमधील वास्तव्यात आहे.मुंबईत राहायला येण्यापूर्वी मंटो आपल्या मोठ्या कुटुंबासह अमृतसरमध्ये राहात होता. चौदा-पंधरा वर्षांच्या नवथर वयात त्याला सिनेमा बघायचं वेड लागलं. आवडलेली फिल्म पुन्हा पुन्हा बघणं हा त्याचा आवडता उद्योग होता.
आपल्या एका लेखात तो म्हणतो, ‘ चित्रपट बघण्यासाठी मी अमृतसरहून लाहोरला जायचो….. जालंधरसुद्धा…. मला आठवतेय की माझी लाडकी नायिका असलेला एक चित्रपट बघण्यासाठी एकदा मला पार दिल्लीला जावे लागले होते.’
ही आपली आवड त्या वेळच्या माहौलनुसार आणि वयानुसार मंटोने जपली. सिनेतारकांचे फोटो जमवणं, ते फोटो आपल्या खोलीत लावणं, सिनेमासिकांचे ढीग सांभाळणं, असे त्या वयाला साजेसे छंद त्याने जोपासले होते. सिनेमासिकांच्या वाचनाची आवड भविष्यात सिनेमासिकाचं संपादन करताना त्याची मदतनीस ठरली. सिनेमा बघताना त्यामध्ये भावनिक पातळीवर न गुंतता, एक कलाकृती म्हणून त्याचं निरीक्षण करणं हळूहळू त्याला आवडू लागलं होतं.
अमृतसरमधील १९३० च्या काळातील परिस्थिती आणि मंटोच्या घरातील वातावरण बघता, मंटोने आपला हा छंद जपला, याबद्दल कौतुक वाटतं. सिनेमा क्षेत्रंही खूप मर्यादित होतं. हिंदी मूकपटांचा जमाना सुरू होऊन जेमतेम १५-१७ वर्षं झाली होती. इंग्लीश चित्रपटही अमृतसरसारख्या ठिकाणी मुंबईच्या तुलनेत तसे कमी प्रमाणातच बघायला मिळत असतील. अशा परिस्थितीत मंटो चित्रपटाकडे आकर्षित झाला आणि त्याचं तेच आकर्षण त्याला मुंबईपर्यंत घेऊन येण्या-या अनेक कारणांपैकी एक महत्त्वाचं कारण ठरलं.
मंटोने हिंदी मूकपटाला बोलपटामध्ये परिवर्तित होताना पाहिलं. कृष्ण-धवल रंगांमधून सप्तरंगी होताना पाहिलं. ‘किसान कन्या’ या भारतातील पहिल्या रंगीत चित्रपटाचा लेखक होण्याचा बहुमान त्याला मिळाला. मुंबईला सिनेमाची मायानगरी म्हणून नावारूपाला येताना त्यानं पाहिलं. पण त्याच्यातील सच्चा कलमबहाद्दर, चिकित्सक पत्रकार आणि व्यासंगी समीक्षक यांना हे मायानगरीचं भुलभुलैया असलेलं, चकचकीत रूप लवकरच भोंगळ वाटू लागलं. हळूहळू त्याच्या लेखणीतून या क्षेत्रावर सडेतोड टीका करणारं लेखन उतरू लागलं.
मागील लेखात म्हटल्याप्रमाणे, सिनेनिर्मितीचे एकेक घटक घेऊन मंटोने टीकाटिप्पणी केली. परंतु हिंदी सिनेमाचा नायक किंवा नायिका कसे असावेत याबद्दल मंटोने मांडलेला एक विचार आज काहीसा न पटण्यासारखा, पण नोंद करण्यासारखा आहे.कोलंबिया पिक्चर्सचे प्रसिद्ध दिग्दर्शक फ्रँक काप्रा यांचे मत तो नमुन्यादाखल देतो की, स्टार निर्माण होण्याकरता पात्रनिवड अचूक असावी, उदाहरणार्थ चिनी व्यक्तिरेखेचं काम चिनी माणसानंच करावं, अपंगाचं अपंगाने. काप्रा यांच्या मताला दुजोरा देत मंटो लिहितो की, अशाप्रकारे आपणच आपल्या भूमिका इतर कोणापेक्षाही चांगल्या वठवू शकतो. मंटोचं हे वक्तव्य तत्त्व म्हणून किंवा प्रयोग म्हणून योग्य वाटत असलं तरी अर्थातच व्यवहार्य नाही. प्रत्यक्षात आणणं कठीणच.

चांगले अभिनेते आणि तंत्रज्ञ असणे, हे सिनेमाकरता फार महत्त्वाचे मुद्दे आहेत असं मंटोला वाटतं. एक महत्त्वाचं विधान तो करतो, ‘ जसे घड्याळाचे सगळे भाग कितीही महागाचे असले तरी बिनचूकपणे एकत्र केल्याखेरीज ते वेळ दाखवू शकत नाही; तसेच चित्रपटाचे अगदी लहानात लहान भागसुद्धा परिपूर्ण असायला लागतात.’
(‘हिंदुस्तानी सनत ए फिल्मसाज़ी पर एक नज़र’/ बाॅलीवूडने काय करायला हवे?’)
सिनेमातील नायिकांविषयी मंटो लिहितो,
‘कुलीन स्त्रियांनी चित्रपटात काम करावे की नाही?
या व्यवसायात फक्त रस्त्यावरच्या बायाच असतात, अशी जी प्रतिमा आहे आणि तसेच संबंधही आहेत ते दूर व्हावेत असे काही सभ्य पुरुषांना वाटते. सिनेमाशी दुरन्वयानेही संबंध येणे हे केवळ अस्वस्थ करणारेच नाही तर गुन्हा वाटतो. हे नैतिकतेचे रक्षक एक गोष्ट विसरतात की जरी ते अनैतिकतेचा धब्बा एका गटाच्या चेह-यावरून पुसून टाकू
इच्छित असले, तरी तो दुस-या गटातील चेह-यांवर राहतोच.’
(शरीफ़ औरतें और फ़िल्मी दुनियाँ’/ चित्रपटातील शीलवान स्त्रिया)
वेश्या जन्माला येत नाहीत, तर त्या बनवल्या जातात, मागणी आहे म्हणून यांची वस्ती प्रत्येक गावात दिसते. मागणीच थांबली तर अशा वस्त्या नाहीशा होतील, असे तो ठामपणे लिहितो. अशा स्त्रिया जर पैसे मिळवण्याकरता या सिनेमाच्या दुनियेत येत असतील तर त्यात गैर काय? आणि त्यांना स्टुडिओत येण्यावर बंदी घालण्यामागे पुरुषी वर्चस्वाची वृत्तीच असल्याचे तो सांगतो. पुरुष स्वतःवर नियंत्रण ठेवायला सक्षम नाहीत का?
शीलवान स्त्रिया अभिनय क्षेत्रात हव्यात अशी मागणी पुरुष करतात मग, अभिनय करणारा पुरुष शीलवान नसला तर चालेल का? असा सवाल तो करतो. त्या काळातील सामाजिक मानसिकतेचा विचार करता, वेगळं किंवा विवादास्पद असं मत या लेखात मंटो लिहितो,
‘वस्तुस्थिती आपल्यासमोर आहे तेव्हा आपण तिच्यापासून पळ काढू शकत नाही. जर चित्रपटांच्या दर्जाविषयी आपल्याला चिंता असेल तर आपल्याला आपली दृष्टी सुधारावी लागेल. व्यक्तिमत्त्वातील दोष हे ज्या – त्या व्यक्तीपुरते असतात. त्याचा आणि व्यक्तीच्याकौशल्याचा काही संबंध नसतो. कौशल्यात आपल्याला रस असतो. आपल्या चित्रपटांनी वास्तव मांडायला हवे, मग ते मांडणा-या स्त्रिया कुलीन असोत वा भ्रष्ट!
मी एक गोष्ट स्पष्ट करतो, की वेश्याव्यवसाय चांगला असतो, असे माझे अजिबात म्हणणे नाही. वेश्यांना त्या केवळ वेश्या आहेत म्हणून स्टुडिओत प्रवेश द्यावा असे मला वाटत नाही. मला काय म्हणायचे आहे आणि मी काय म्हटले आहे ते पुरेसे स्पष्ट आहे. जर अभिनेत्रीला वेदनेचा अनुभव नसेल, दुःखाची कल्पना नसेल तर ती कधीच दर्जेदार अभिनेत्री होऊ शकणार नाही. ती वेश्यागृहातील असो अथवा मोठ्या तालेवर घरातील, माझ्या दृष्टीने अभिनेत्री ही अभिनेत्री असते.
तिची नैतिकता, किंवा तिची अनैतिकता यात मला खरेच रस नाही.
तिचे नैपुण्य आणि कला यांचा, ती एरवी कशा स्वरूपाची व्यक्ती आहे, याच्याशी काही संबंध नाही.’
(शरीफ़ औरतें और फ़िल्मी दुनियाँ’/ चित्रपटातील शीलवान स्त्रिया)
मंटोची ही वैयक्तिक मतं मुंबईतील मायानगरीत आणि अमृतसरमधील त्याच्या पूर्वायुष्यात त्याला मिळालेल्या प्रत्यक्ष अनुभवांवर, तसेच त्याच्या अभ्यासावर आधारित आहेत. मंटोच्या लेखनामधील स्त्री व्यक्तिरेखा, त्याची स्त्रियांबद्दलची मतं आणि त्याच्या वैयक्तिक आयुष्यातील त्याने लिहिलेले स्त्रीविषयक स्पष्ट-अस्पष्ट अनुभव यांबद्दल नेहमीच मंटो
चर्चेत राहिला. किंबहुना टीकेचं लक्ष्य ठरला. वर मांडलेलं त्याचं मत हे जरी विवादास्पद असलं तरी विचार करण्यासारखं आहे. वेश्यांचा चित्रपट-प्रवेश हा त्यातील मुद्दा तत्कालीन परिस्थितीचा विचार करता महत्त्वाचा आहे पण मंटोने मांडलेल्या या विवेचनात चरित्रात्मक समीक्षेचा वादाचा मुद्दा आहे.
एखाद्या कलाकाराचं कलाक्षेत्रातील स्थान हे त्याच्या कलेच्या आविष्कारानुसार, कौशल्यानुसार ठरतं. कलाकाराचं काम आणि वागणूक यांच्यामध्ये तफावत आढळली तर रसिकांना वाईट वाटतं. याउलट खलनायकी वृत्तीचं काम करणारा कलाकार त्याच्या वैयक्तिक आयुष्यात अतिशय सज्जन असल्याचं पाहून रसिकांना कमालीचं आश्चर्य वाटतं. भारतीय प्रेक्षकांची चित्रपट किंवा नाट्य क्षेत्रातील कलाकारांच्या बाबतीत एक हळवी मनोधारणा असते. तिला छेद गेला तर भारतीय रसिक ज्यांना बाॅलीवूडच्या भाषेत ‘पब्लिक’ म्हणतात ते नाराजही होतात.
भाबड्या मनोवस्थेचा असा हा भारतीय प्रेक्षकांचा एक मोठा वर्ग आहे. साकल्याने विचार करून चित्रपटबाह्य गोष्टींचा विचार न करता चित्रपट पाहणारे, अभ्यासणारे तुलनेने कमी.
साहजिकच कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य वेगळं आणि त्याची पडद्यावरची अदाकारी वेगळी असा प्रगल्भ विचार करण्याच्या बाबतीत भारतीय प्रेक्षकांची समजूत अजूनही कमी पडते.
नैतिक-अनैतिकतेच्या व्याख्या इथे निराळ्या ठरतात. ठरवल्या जातात. आज तर तंत्रज्ञानामुळे खूप वेगवेगळ्या आणि विचित्र प्रकारेही हे सगळं सामान्य रसिकापर्यंत पोहोचतंय. यामधून आणखी वेगवेगळे निष्कर्ष निघत आहेत. नैतिक-अनैतिकतेचे निकषही काही प्रमाणात बदलले आहेत.
पडद्यावर सती सावित्रीची भूमिका करणारी स्त्री मुंबईच्या वेश्यावस्तीतील आहे, हे कळल्यावर लोक आपल्या चित्रपटाकडे पाठ फिरवतील, अशी भीती त्या काळातील निर्मात्यांना वाटू लागल्याने त्यांनी अशा स्त्रियांना फिल्म स्टुडिओचे दरवाजे बंद करायला सुरुवात केली. मंटोने विचारलेला पुरुषांच्या संयमाबद्दलचा मुद्दा होताच. या सगळ्यातूनच ‘कुलीन’ स्त्रियांच्या चित्रपटप्रवेशाला सुरुवात झाली असावी.
सिनेमातील नायिकेच्या मुद्दावरून समस्त पुरुषवर्गाबद्दल मंटोने केलेलं भाष्य आजही चिंतनीय वाटतं. पुरुषप्रधान मानसिकतेला अधोरेखित करताना आणि प्रश्न विचारताना मंटोच्या लेखणीला धार येते. विशेषतः मंटो ज्या समाजात, कुटुंबात जन्माला आला, ज्या धर्माचे संस्कार घेऊन वाढला, त्या पार्श्वभूमीवर विचार केला तर त्याची विचारसरणी काळाच्या किती पुढे होती याचा प्रत्यय येतो.

तो म्हणतो,’पुरुष हा पुरुषच राहतो, मग त्याची वर्तणूक किती का गैर असेना. पण बाई एकदा जरी पुरुषांनी ठरवून दिलेल्या मार्गापेक्षा वेगळ्या मार्गाने गेली, तर लगेचच तिच्यावर वेश्या असण्याचा शिक्का बसतो.
जर दोघेही समान आहेत, तर मग बाईसाठी आपली कुंपणे राखीव का?’
विचार करायला भाग पाडणारी अशी अनेक भाष्यं सिनेमाच्या जगाबद्दल मंटोने केली आहेत. लेखक-दिग्दर्शक यांच्याबद्दल टिप्पण्या केल्या आहेत. त्याबद्दल अधिक वाचू या… पुढील लेखात.
(क्रमशः-)
(लेखातील मंटोची अवतरणे-संदर्भ –‘मी का लिहितो?’
— संपादन श्री. आकार पटेल, अनुवाद – वंदना भागवत,
परवानगीसह साभार — सकाळ प्रकाशन, पुणे, प्रथम आवृत्ती, २०१६)
– © डाॅ निर्मोही फडके.