मुंबईमध्ये होणारे लोकल अपघात थांबण्याचे नावच घेत नाहीये. काही दिवस झाले की, कानावर लोकल अपघातांची बातमी पडते. ९ जून सोमवारची सकाळ सगळ्यांसाठीच खासकरून मुंबई लोकलने प्रवास करणाऱ्यांसाठी दुःखद बातमीने सुरु झाली. मुंबईमध्ये मध्य रेल्वेच्या दिवा मुंब्रा स्थानका दरम्यान लोकलमधून पडून ८ प्रवाशांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मृत्यू झालेले प्रवासी कसारा ते सीएसएमटी लोकलमधील होते. या अपघातात काही प्रवासी जखमी झाले आहेत. त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघातामध्ये एका जीआरपी कर्मचाऱ्याचा देखील मृत्यू झाला आहे. (Mumbai Local)
कसारा ते सीएसएमटी या लोकलला लटकलेले प्रवासी पुष्पक एक्स्प्रेसला घासले गेले आणि त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे. मुंब्रा स्थानकाजवळ लोकलमधून पडून या प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. कसाऱ्याकडून सीएसएमटीकडे जाणाऱ्या लोकलमधून आठ ते नऊ प्रवासी खाली पडले आणि त्यापैकी सहा जणांचा मृत्यू झाला. आज सकाळी नऊ वाजताच्या सुमारास ही घटना घडली. हे प्रवासी नेमके कसे पडले आणि नक्की काय घडले याबद्दल मध्य रेल्वेच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी माहिती दिली. ते म्हणाले, “हे सर्व प्रवासी फूटबोर्डवर उभे होते आणि गर्दीत त्यांना एकमेकांचा धक्का लागला. त्यातून त्यांचा तोल गेला आणि ते पडले. रेल्वे गार्डने या अपघाताची माहिती दिली.” (Marathi News)
या अपघातानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट केले आहे. त्यांनी लिहिले, “दिवा-मुंब्रा स्थानकादरम्यान लोकलमधून एकूण 8 प्रवासी खाली पडून झालेल्या दुर्घटनेत काही जणांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. जखमींना तातडीने शिवाजी हॉस्पिटल आणि ठाणे सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. स्थानिक प्रशासन समन्वय साधून आहे. जखमींना लवकर आराम मिळावा, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. ही घटना नेमकी कशामुळे घडली, याची चौकशी रेल्वे विभागाने सुरू केली आहे.” (Top Stories)
तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या घटनेबद्दल दुःख व्यक्त करताना म्हटले आहे की, “मध्य रेल्वेमार्गावर कसाऱ्याहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणाऱ्या उपनगरी रेल्वेगाडीतून पडून प्रवाशांचा झालेला मृत्यू दुर्दैवी, क्लेशदायक आहे. रेल्वे प्रवाशांच्या मृत्यूनं उपनगरी रेल्वेवरील गर्दी आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेचा मुद्याकडे अधिक गांभीर्यानं लक्ष देण्याची गरज अधोरेखीत झाली आहे. उपनगरीय रेल्वेसेवा अधिक प्रभावी आणि सुरक्षित करण्यासाठी रेल्वे प्रशासन लवकरात लवकर ठोस पावलं उचलेल, असा विश्वास आहे. अपघातात जखमी प्रवाशांच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा होवो, अशी प्रार्थना करतो. मृत्यू पावलेल्या प्रवाशांच्या कुटुंबियांच्या दु:खात सहभागी असून दिवंगत प्रवाशांना दु:खद अंतकरणाने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.” (Todays Top Headline)
========
हे देखील वाचा : Balloon Fest 86 : १५ लाख फुगे हवेत सोडले, मग असं काही झालं…
========
या संपूर्ण घटनेवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील त्यांची भूमिका मांडत सरकारवर जोरदार टीका केली आहे. रेल्वे अपघातामुळे झालेल्या जीवितहानीबद्दल आणि शहराच्या वाईट नियोजनाबद्दल त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. सोबतच माणसाची आपल्या देशात किंमतच नाही. असे देखील त्यांनी म्हटले आहे. दरम्यान या घटनेचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यामध्ये प्रवाशांना ट्रेनमधून पडताना दिसत आहे. (Top Marathi Headline)