हवामान बदल हा सध्याच्या घडीचा मानवी आयुष्यातला एक सगळ्यात ज्यास्त चर्चिला जाणारा विषय झाला आहे. मागच्या काही दशकांपर्यंत हवामान बदलाबद्दल इतकी जागरूकता नव्हती जितकी आज आहे. हवामान बदल, जागतिक तापमान वाढ, ओला व कोरडा दुष्काळ, हिमाच्छादित प्रदेशातला बर्फ वितळणे, अंटार्टिका आणि आर्टिक भागातले ग्लेशीयर्स वितळणे, समुद्राची पातळी वाढणे, पूर येणे, अवकाळी पाऊस येणे अशा एक ना अनेक बाबी जगभरात घडू लागल्या आहेत.
हवामान बदलाचा थेट परिणाम तर आता मानवी जीवनावर होणार आहे. थेट बोलायचं झाल्यास हवामान बदलामुळे माणसांच्या जीवन पद्धतीवरच याचा परिणाम होणार आहे. मनुष्य प्राण्याची झोप यामुळे कमी होणार आहे. (Climate change and health)
![](https://kfacts.in/wp-content/uploads/2022/06/हे-गाणं-माझं-आहे....-50-1024x576.png)
कोपनहेगन विद्यापीठातल्या केलटन मायनर यांनी या संदर्भात ६८ देशांमधल्या ४८,००० लोकांच्या झोप घेण्याबद्दलचा अभ्यास केला. यासाठी त्यांनी त्या व्यक्तींच्या हातावर म्हणजे रिस्टबँड बांधून त्याच्या झोपेबद्दलची माहिती ट्रॅक करून, त्यानुसार निष्कर्ष काढले आहेत. हे निष्कर्ष चक्रावून टाकणारे आहेत. या अभ्यासानुसार २०९९ पर्यंत एका साधारण व्यक्तीची झोप दर वर्षी ५० ते ५८ तास इतकी कमी होईल. म्हणजे दर रात्रीचा हिशोब केला तर दर रात्री १० मिनिटे या या वेगाने माणसांची झोप कमी होत जाईल. म्हणजे हवामान बदलामुळे माणसांची झोप दिवसेंदिवस कमी कमी होत जाईल.
अजून एक अचंबित करणारं निरीक्षण म्हणजे जे लोक विकसनशील देशांमध्ये राहतात त्यांच्यावर हवामान बदलामुळे प्रतिकूल परिणाम होईल आणि त्यांच्या झोपेवर इतर विकसित देशांमधल्या लोकांच्या झोपेपेक्षा ज्यास्त परिणाम होईल. (Climate change and health)
![](https://kfacts.in/wp-content/uploads/2022/06/हे-गाणं-माझं-आहे....-51-1024x576.png)
भविष्यामध्ये साधारण एक प्रौढ व्यक्ती रात्री उशिरा झोपेल आणि सकाळी लवकर उठेल, म्हणजे त्याची झोप दिवसेंदिवस कमी कमी होत जाईल. तसंच ज्या दिवशी उष्ण तापमान असेल त्या दिवशी ती प्रौढ व्यक्ती कमी वेळ झोपेल. याचं वैद्यकीय कारण थक्क करणारं आहे. माणसाला झोप लागण्यासाठी त्याच्या शरीराचं ‘कोअर टेंपरेचर’ कमी व्हावं लागतं. पण ज्या दिवशी वातावरणातलं तापमान ज्यास्त असेल त्या दिवशी ज्यास्त तापमानामुळे शरीरातलं कोअर टेंपरेचर कमी होणार नाही आणि याचा थेट परिणाम होऊन झोप कमी कमी होत जाईल. ‘वन अर्थ’ या नियतकालीकामध्ये वरील निरीक्षण मायनर यांनी मांडले आहेत. (Climate change and health)
यातलं अजून एक महत्वाचं निरीक्षण म्हणजे वेगवेगळे ऋतू, लोकसंख्या आणि वेगवेगळ्या प्रदेशातलं हवामान याचा परिणाम होऊन त्याची परिणीती कमी झोप लागण्यामध्ये होईल. हवामान बदलामुळे तर शारीरिक आणि मानसिक आरोग्यावरसुद्धा परिणाम होईल.
हवामान बदलामुळे बाकी घटकांवरसुद्धा परिणाम होणार आहे. दक्षिण आशियामध्ये मान्सूनचा पाऊस ज्या प्रमाणात पडत होता त्याची वारंवारिता बदलत चालली आहे किंवा कमी होत चालली आहे. म्हणजे समसमान प्रमाणात पाऊस पडत नाहीच. तापमान वाढीमुळे जर हिमालय वितळला, तर त्यातून उगम पावणाऱ्या नद्याना पूर येतील आणि यामुळे समुद्राची पातळी वाढेल, तसंच ओला दुष्काळ पडेल.
![](https://kfacts.in/wp-content/uploads/2022/06/हे-गाणं-माझं-आहे....-52-1024x576.png)
कदाचित दुसऱ्या भागात कोरडा दुष्काळ पडेल, पाण्यासाठी वणवण फिरावं लागेल. म्हणजे एकीकडे पूर तर दुसरीकडे पाणीच नाही, असे महाभयंकर परिणाम उद्भवतील आणि खरंच ही विचार करायला लावणारी बाब आहे. या शतकाच्या शेवटापर्यंत पृथ्वीचं तापमान हे २ डिग्री सेल्सिअस ते ६ डिग्री सेल्सिअस पर्यंत वाढण्याची शक्यता आहे. (Climate change and health)
जागतिक तापमान वाढ ही खऱ्या अर्थाने सुरू झाली ती औद्योगीक क्रांतीनंतरच. याचं कारण मानवी हस्तक्षेपामुळे हरित वायू उत्सर्जनाचं प्रमाण प्रचंड वाढलं. १९५० नंतर ते अधिक प्रमाणात वाढू लागलं. उद्योगधंद्याना, कारखान्याना काम करण्यासाठी ऊर्जेची गरज भासली. त्यामुळे कोळसा आणि तेल या दोन ऊर्जा साधनाची गरज मोठ्या प्रमाणात वाढू लागली. शिवाय वाहन उद्योगांच्या भरभराटीमुळे अतिरिक्त ताण संसाधनांवर पडू लागला. हे तेल नावाचं शस्त्र वापरुन आखाती देशांनी तर याचा पुरेपूर फायदा घेतला.
====
हे देखील वाचा – पाठ दुखीमुळे त्रस्त आहात? ‘या’ योगासनांमुळे मिळेल आराम
====
महासत्ता असणाऱ्या अमेरिकेने तर आखाती देशांकडून तेल विकत घेण्यापेक्षा आपण स्वतःच तेल उत्पादन करुयात असं ठरवलं आणि आज अमेरिका सौदी अरेबियाला मागे टाकून जगात पहिल्या क्रमांकाचा तेल उत्पादक देश बनला आहे. (Climate change and health)
मूळ मुद्यावर यायचं झाल्यास हवामान बदल आणि माणूस प्राण्याची झोप यांच्यामध्ये नक्की काय संबंध आहे, हे वरील विवेचनावरून लक्षात येईल म्हणूनच आताच मानव प्रजातीला झोपेतून जागं होण्यासाठी ही योग्य वेळ आहे. अन्यथा आपण विनाशाकडे चाललो आहोत हे आता आपल्याला लक्षात आलं असेल. गंभीर होऊन मानवाने शाश्वत उर्जेचा ध्यास घेऊन मार्गक्रमण केलं, तर कुठे सकारात्मक बदल घडून हवामान बदलाचा प्रश्न आणि त्याचे परिणाम याचा दाह कमी होईल.
सुधारण्यासाठी हीच ती वेळ आणि हाच तो क्षण आहे, मानवाने यावर विचार करावा आणि त्यापेक्षा महत्वाचं म्हणजे कृती करावी.
– निखिल कासखेडीकर