१९ व्या शतकाच्या शेवटी आणि २० व्या शतकाच्या सुरुवातीला हिमालयातील कुमाऊँच्या जंगलात एक नरभक्षक वाघीण थैमान घालत होती, जी चंपावत आणि आसपासच्या गावांतील लोकांची शि कार करून त्यांना खात होती. तिची दहशत नेपाळपासून भारतापर्यंत पसरली आणि तिच्या भीतीने लोकांनी घराबाहेर पडणं बंद केले. सर्वाधिक मानवी जीव घेतल्यामुळे तीचं नाव Guinness Book of world Record मध्ये सुद्धा नोंदवलं गेले होतं, कोण होती ही नरभक्षक वाघीण ? आणि तिला कसं शांत करण्यात आलं ? वाघ तसा दिसायला सुंदर पण जंगलातला सर्वात शक्तिशाली आणि हिंस्र प्राणी ! जंगलातले प्राणी खाऊन आपलं गुजराण करणाऱ्या वाघाला जर माणसाच्या रक्ताची चटक लागली तर अशीच एक भयानक घटना हिमालयात घडली होती. (Man Eating Tiger)
या वाघिणीची गोष्ट सुरू होते नेपाळच्या रूपल गावातून, जिथे बायका स्वत:च्या गाई – म्हशींसाठी चारा आणायला जंगलात जायच्या. हळू हळू जंगलात गवत आणायला जाणाऱ्या बायका गायब होऊ लागल्या आणि जंगलात जो कोणी जायचा त्याला इकडे तिकडे फक्त रक्ताचे डाग दिसायचे. ही खबर नेपाळच्या राजघराण्यापर्यंत पोहचली तेव्हा प्राण्यांची शिकार करणाऱ्या शिकारींना जंगलात पाठवण्यात आलं. पण त्यातून काहीच साध्य झालं नाही. जेव्हा या वाघीणीने २०० च्या वर लोकांना स्वत:च अन्न बनवलं, तेव्हा नेपाळी सैनिकांना म्हणजेच गोरखांना जंगलात पाठवण्यात आलं, पण तेही तिला मारू शकले नाहीत. पण ते तिला नेपाळ मधून भारतात हकलण्यात यशस्वी ठरले.
भारतात पोहचल्यानंतर तिने उत्तराखंडच्या चंपावत गावाला आपलं शिकार बनवलं. तेव्हा भारतात ब्रिटिशांची सत्ता होती. सुरवातीला ती वाघीण रात्री अंधारात शिकार करायची, पण शिकार करून करून तिची भीती नाहीशी झाली होती आणि ती आता रात्रीच्या ऐवजी दिवसा शिकार करायला लागली होती. त्यामुळे लोकांचं घराबाहेर पडणं बंद झालं होतं. तरी जनावरांसाठी चारा गोळा करायला जाणाऱ्या महिला आणि लहान मुलं गायब होऊ लागली. त्यांना शोधायला गेलेल्या लोकांना कधी त्यांच अर्ध शरीर मिळायचं तर कधी फक्त रक्ताचे डाग त्यामुळे संपूर्ण चंपावतमध्ये हाहाकार उडाला होता. जेव्हा ही गोष्ट ब्रिटिशांच्या लक्षात आली तेव्हा त्यांनी ही त्या वाघीणीला मारण्यासाठी अनेक प्रयत्न केले आणि तिला मारण्यासाठी बक्षीस सुद्धा जाहीर केलं. पण जो त्या वाघिणी समोर जायचा तो पुन्हा जीवंत परतायचाच नाही. (Man Eating Tiger)
जेव्हा वाघिणीला मारण्याचा कुठलाच प्रयत्न यशस्वी झाला नाही, तेव्हा या वाघिणीला मारण्यासाठी त्याकाळचे जिम कॉर्बेट यांना बोलवण्यात आलं. जिम कॉर्बेट हे उत्तम शिकारी होते अनेक नरभक्षक प्राण्यांची शिकार केल्यामुळे ते प्रसिद्ध झाले होते. या शिवाय त्यांना जंगलाची सुद्धा चांगली समज होती. वेळप्रसंगी प्राण्यांची शिकार ते करायचे, पण ते स्वत: प्राणी प्रेमी होते. जिम कॉर्बेट यांनी तोपर्यंत एकाही वाघाची शिकार केली नव्हती, तरी त्यांनी काही अटींवर हे बोलावणं स्वीकार केलं. त्या अटी म्हणजे सरकारने वाघिणीला मारण्यासाठी ठेवलेलं बक्षीस रद्द करावं आणि शिकारी आणि सैनिकांना परत बोलवून घ्यावं सरकारने या अटी मान्य केल्या आणि सुरू झालं या नरभक्षक वाघिणीला मारण्याचं आणखी एक मिशन.
आतापर्यंत या वाघिणीने ४३५ जणांचा बळी घेतला होता. चंपावत गावातले लोकं तिला राक्षस म्हणू लागले होते. कॉर्बेट यांनी वाघिणीचा पाठलाग पाली गावात सुरू केला, जिथे वाघिणीने नुकताच एक बळी घेतला होता. अनेक रात्र तिचा शोध घेतल्यानंतरही त्यांना ती वाघिण दिसली नाही. वाघिणीच्या जुन्या रेकॉर्ड नुसार ती फक्त महिला आणि लहान मुलांवरच हल्ला करायची, त्यामुळे कॉर्बेट यांना वाटलं मी पुरुष आहे म्हणून ती माझ्याजवळ येत नाही. त्यामुळे त्यांनी महिलेचा पुतळा उभा करून तिची वाट पाहिली. स्वत: साडी घालून ते तिचा शोध घेऊ लागले, पण ती वाघिण काही केल्या त्यांना सापडत नव्हती. (Man Eating Tiger)
एकीकडे कॉर्बेट तिचा शोध घेत होते आणि दुसरीकडे तिने चुलीसाठी जंगलात लाकडं गोळा करायला गेलेल्या महिलेला आपलं शिकार बनवलं. कॉर्बेट रक्ताच्या डागांचा पाठलाग करत जंगलात घुसले आणि पाहतात तर काय, समोर वाघिण. कॉर्बेट यांनी बंदूक तिच्यावर ताणली, पण निशाण चुकला आणि वाघिण पळून गेली. तिथे त्या महिलेचं शरीर तसच पडलेलं होतं. ते नेण्यासाठी वाघिण पुन्हा येईल या आशेवर कॉर्बेट यांनी एक प्लॅन बनवला . संपूर्ण गावाला त्यांनी कुऱ्हाडी चाकू सारखे हत्यार घेऊन एकत्र बोलावलं आणि त्या सोबत ढोल-ताशे सुद्धा आणले गेले.
कॉर्बेट यांचा प्लॅन असा होता की एकाबाजूने मोठा आवाज करायचा म्हणजे ती वाघीण दुसऱ्या दिशेत धावेल. जिथे कॉर्बेट स्वत: बंदूक घेऊन उभे असतील. आणि झालं तसचं मोठ्या आवाजाला घाबरून वाघीण कॉर्बेट यांच्या दिशेने धावली. कॉर्बेट यांची पहिली गोळी निशान्यावर लागली नाही, पण दुसरी आणि तिसरी गोळी लागली. तरी त्या गोळ्या वाघिणीला मारण्यासाठी पुरेशा नव्हत्या. वाघीणीला गोळ्या लागल्या मुळे ती प्रचंड चिडली आणि कॉर्बेट यांच्यावर हल्ला केला. आणि कॉर्बेट यांनी तिच्यावर शेवटचा निशाण साधला आणि वाघीण खाली कोसळली. गावकऱ्यांनी एकच जल्लोष केला. कॉर्बेट यांना पण आनंद झाला ते वाघिणी जवळ पोहोचले, पण त्यांचा चेहरा उतरला. (Man Eating Tiger)
====================
हे देखील वाचा : दोन अफ्रिकन सिंह
====================
त्या वाघिणीचा जबडा तुटलेला होता. कोणत्यातरी माणसानेच तिच्या सोबत हे केलं होतं. त्यामुळे तिला जंगली प्राण्यांची शिकार करता येतं नव्हती आणि म्हणून तिने माणसांना खायला सुरवात केली होती. कोणताच वाघ विनाकारण माणसांवर हल्ला करत नाही. पण या वाघीणीच्या शारीरिक कमजोर परिस्थितीमुळे तिला माणसं खाण्याशिवाय पर्याय नव्हता. हे जिम कॉर्बेट यांना तिला पाहताच क्षणी समजलं आणि त्यांना अतिशय दुख झालं. पण गावातल्या लोकांनी निश्वास सोडला होता. गावावर असलेलं मोठं संकट टळल होतं. गावातल्यांनी जिम कॉर्बेट यांना उचलून त्यांची मिरवणूक काढली. (Man Eating Tiger)
पण त्यानंतर कॉर्बेट यांनी शिकार करणं हळू हळू बंद केलं. जंगली प्राण्यांमुळे कोणाचं नुकसान व्हायचं तर ते जिम कॉर्बेट यांच्याकडे मदत मागायला यायचे पण कॉर्बेट बंदूक उचलून शिकारी ला न जाता, त्यांना स्वत: पैशांची मदत करत. जमिनीच्या गरजेसाठी आपण ही जंगल कापतो आणि त्यामुळे अनेक प्राणी बेघर होतात. आपल्या राहण्याची सोय होते. पण त्या मुक्या प्राण्यांचं काय ? यात चूक कोणाची त्या प्राण्यांची की आपली?