श्रावण सुरु होऊन आता एक महिना होत आला आहे. त्यामुळे आता श्रावण महिना संपण्याच्या शेवटच्या टप्प्यात आहे. जसे की सगळ्यांना माहित आहे श्रावण महिना म्हणजे सणांचा राजा. श्रावणातला प्रत्येक दिवस म्हणजे एक सणच असतो. त्यामुळे आता श्रावण संपत आला असला तरी तो संपत असताना देखील एक महत्वाचा सण येत आहे. हा म्हणजे पिठोरी अमावस्या.
प्रत्येक महिन्यात कृष्ण पक्षातील पंधराव्या तिथीला अमावस्या येते. प्रत्येक महिन्यात येणाऱ्या अमावस्या तिथीला एका विशिष्ट नावाने ओळखले जाते आणि तिचे महत्व देखील वेगवेगळे असते. अशीच श्रावण महिन्यात येणारी अमावस्या देखील विशेष आहे. या अमावस्या तिथीला पिठोरी अमावस्या असे म्हणतात. तसेच या दिवशी बैलपोळा सण देखील साजरा केला जातो.
हा दिवस श्रावण महिन्याचा शेवटचा दिवस असतो. या दिवशी महाराष्ट्रात शेतकरी त्यांचा सोबती मित्र असलेल्या बैलाची पूजा करतात त्याला गोडधोड खायला देतात. वर्षभर कष्ट करून दमलेल्या बैलाला या दिवशी आराम दिला जातो. या अमावस्येला दर्श अमावस्या असे देखील म्हटले जाते.
याशिवाय पिठोरी अमावस्येला मातृदिन देखील साजरा केला जातो. या दिवशी स्त्रिया आपल्या मुलांचे रक्षण व्हावे, त्यांना उदंड निरोगी आयुष्य मिळावे यासाठी उपवास करतात. संततीची इच्छा असणारे लोकं देखील या दिवशी व्रत-पूजा करतात. सोबतच ही तिथी पितरांना तर्पणसोबतच धनदेवतेच्या पूजेसाठीही अत्यंत लाभदायक मानली जाते.
पिठोरी अमावास्येची तारीख आणि वेळ
हिंदू पंचांगानुसार या वर्षी श्रावण महिन्यातील अमावस्या उगवत्या सूर्याने पाहिलेल्या तिथीनुसार २ सप्टेंबर २०२४ रोजी साजरी करण्यात येणार आहे. पंचांगानुसार, श्रावण महिन्याची अमावस्या ही २ सप्टेंबरला पहाटे ६ वाजून ४८ मिनिटापासून सुरू होणार असून, २ सप्टेंबरला अहोरात्र ही तिथी राहणार आहे. ही तिथी दुसऱ्या दिवशी ३ सप्टेंबर रोजी सकाळी ७ वाजून २४ मिनिटांनी संपेल.
पिठोरी अमावस्या ही श्रावणी अमावस्या म्हणून ओळखली जाते. या दिवशी पितरांना नैवेद्य अर्पण केल्याने त्यांच्या आत्म्याला शांती मिळते अशी मान्यता आहे. या दिवशी श्री हरी भगवान विष्णूची आराधना केल्याने सुद्धा अनेक समस्या दूर होऊन शांती मिळते. या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा केल्याने सर्व देवी-देवतांचे आशीर्वाद प्राप्त होते. पिठोरी अमावस्येला गंगा नदीत स्नान केल्याने पापांचे शालन होते.
पिठोरी अमावास्येचा पूजा विधी
पिठोरी अमावस्येच्या दिवशी सकाळी लवकर उठावे पाण्यात गंगाजल टाकून स्नान करावे. सूर्याला अगरबत्ती आणि दिव्यांने ओवाळा. त्यानंतर सूर्याला नमस्कार करुन सुखी जीवनासाठी प्रार्थना करा. ॐ सूर्य देवाय नम: या मंत्राचा जप करा. या दिवशी पांढरे कपडे घालावे. त्यानंतर आपल्या पितरांचे तर्पण करत त्यांचे श्राद्ध करावे. आपल्या पितरांच्या नावाने तांदूळ, डाळ, भाजी, दक्षिणा किंवा शिजवलेले अन्न दान करावे.
त्यानंतर भगवान शंकराला दूध, पाणी आणि पांढरी फूले अर्पण करावे. या दिवशी देवासमोर तीळाच्या तेलाच्या दिवा लावावा आणि शिव मंत्रांचा जप करावा. त्यानंतर जवळच्या मंदिरात जाऊन वस्तूचे दान करावे. पुन्हा संध्याकाळी शिवाची पूजा करावी. तांब्याचे दान करावे. या दिवशी तांब्याचे भांडे दान करणे अतिशय शुभ मानले जाते.
पिठोरी अमावस्या कथा
आटपाट नगर होतं. तिथे एक गरीब ब्राह्मण राहत होता. त्याच्या घरी श्रावणातल्या अवसेच्या दिवशी वडिलांचे श्राद्ध असे. इकडे दरवर्षी काय होई ? ज्या दिवशी श्राद्ध त्या दिवशी सकाळपासून त्याच्या सुनेचे पोट दुखू लागे व ब्राह्मण जेवायला बसण्याचे वेळेस बाळंत होऊन पोर मरून जाई. असं झालं म्हणजे ब्राह्मण तसेच उपाशी जात. असे सहा वर्षे झाले. सातव्या वर्षीही तसंच झालं, तेव्हा सासरा रागावला. ते मेलेले पोर तिच्या ओटीत घातले. तिला रानात हाकलून लावलं. पुढे जाता जाता ती एका मोठ्या अरण्यात गेली. तिथे तिला झोटिंगाची बायको भेटली. ती म्हणाली, बाई बाई, तू कोणाची कोण? इथे येण्याचे कारण काय ? आलीस तशी लौकर जा. नाही तर माझा नवरा झोटिंग येईल आणि तुला मारून खाऊन टाकील !
तेव्हा ब्राह्मणाची सून म्हणाली, तेवढ्या करताच मी इथे आले आहे. झोटिंगाची बायको म्हणाली, बाई बाई, तू इतकी जिवावर उदार का? तशी ब्राह्मणाची सून आपली हकीकत सांगू लागली. ती म्हणाली, मी एका ब्राह्मणाची सून. दरवर्षी मी श्रावणी अवसेच्या दिवशी बाळंत होते व मूल मरून जाते. त्याच दिवशी आमच्या घरी माझ्या आजेसास-याचे श्राद्ध असे. माझे असं झालं म्हणजे श्राद्धास आलेले ब्राह्मण उपाशी जात. अशी सहा बाळंतपणं माझी झाली. सातव्या खेपेलासुध्दा असंच झालं. तेव्हा मामंजीं माझा राग आला. ते मला म्हणाले, माझा बाप तुझ्या बाळंतपणामुळं सात वर्षे उपाशी राहिला, तर तू घरातून चालती हो ! असं म्हणून हे मेलेलं मूल माझ्या ओटीत घातलं आणि मला घालवून दिलं. नंतर मी इथे आले. आता जगून तरी काय करायचे आहे ? असं म्हणून रडू लागली.
तशी झोटिंगाची बायको तिला म्हणाली, बाई तू भिऊ नको, घाबरू नको. अशीच थोडी पुढं जा. तिथ तुला एक शिवलिंग दृष्टीस पडेल. बेलाचं झाड लागेल, तिथे एका झाडावर बसून राहा. रात्री नागकन्या, देवकन्या, साती अप्सरा बरोबर घेऊन तिथे पूजेला येतील. पूजा झाल्यावर खीरपुरीचा नैवेद्य दाखवतील आणि अतिथी कोण आहे म्हणून विचारतील. असे झाल्यावर मी आहे म्हणून म्हण. त्या तुला पाहतील. कोण, कोठची म्हणून चौकशी करतील. तेव्हा तू सगळी हकीकत त्यांना सांग ! ब्राह्मणाच्या सुनेने बरं म्हटलं. तिथून उठली, पुढं गेली. तो एक बेलाचे झाड पाहिलं. तिथेच उभी राहिली. इकडे तिकडे पाहू लागली. तो जवळच एक शिवलिंग दृष्टीस पडले. तशी ती शेजारच्या झाडावर बसून राहिली. इतक्यात रात्र झाली. तशी नागकन्या, देवकन्या आणि सात अप्सरांच्या स्वार्यासुद्धा आल्या. त्यांनी शिवलिंगाची पूजा केली, नैवेद्य दाखविला आणि अतिथी कोण आहे? म्हणून विचारलं.
=======
हे देखील वाचा : नंदीच्या कानात इच्छा सांगायची मग ‘हे’ वाचाच
======
त्याबरोबर ती खाली उतरली मी आहे म्हणून म्हणाली. तेव्हा सगळ्यांनी मागे पाहिलं. त्यांना आश्चर्य वाटलं. तिची कोण, कोठली म्हणून चौकशी केली. तिनं सर्व हकीकत सांगितली. नागकन्या- देवकन्यांनी तिच्या मुलांची चौकशी केली. तेव्हा अप्सरांनी ती दाखवली. पुढे त्यांना तिच्या साती मुलांना जिवंत केलं आणि तिच्या हवाली केलं. पुढे तिला हे व्रत सांगितलं. चौसष्ट योगिनींची पूजा करायला सांगितली आणि मृत्युलोकी हे व्रत प्रकट करायला सांगितलं. तशी तिने विचारलं, ह्याने काय होतं ? अप्सरांनी सांगितलं. हे व्रत केले म्हणजे मुलबाळं दगावत नाहीत, सुखासमाधानांत राहतात. पुढे ती त्यांना नमस्कार करून निघाली.
ती आपल्या गावांत आली. लोकांनी हिला पाहिलं, ब्राह्मणाला जाऊन सांगितले. भटजी भटजी, तुमची सून घरीं येते आहे. त्याला ते खोटं वाटलं. अर्ध घटकेनं पाहू लागला, तो मुलबाळं दृष्टीस पडू लागली. पाठीमागून सुनेला पाहिलं. तसा उठला, घरात गेला, मूठभर तांदूळ, तांब्याभर पाणी आणलं. तांदूळ सुनेवरून आणि मुलांवरून ओवाळून टाकून दिले. हातपाय धुऊन घरांत आला. सर्व हकीकत सुनेला विचारली. तिनं ती सारी सांगितली. पुढे सर्वांना आनंद झाला आणि मुला-बाळांसहित सुखाने ती नांदू लागली. ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण.