अयोध्येतील भव्य राममंदिर बघण्यासाठी रोज देशविदेशातील हजारो रामभक्त गर्दी करत आहेत. भव्य अशा या राम मंदिराची पूर्णपणे उभारणी होण्यासाठी आणखी एक वर्ष लागणार आहे. या कालावधीत मंदिर परिसरातील 8 एकर जागेवर पंचवटी बाग उभारण्यात येणार आहेत. यामध्ये फळाफुलांची हजारो झाडे लावण्यात येणार आहेत. श्री रामाचे मंदिर बघण्यासाठी येणा-या हजारो भाविकांना त्यातून श्रीराम आणि माता सीता राहत असलेली पंचवटी कशी होती, याचा अनुभव देण्यात येणार आहे. शिवाय या सर्व भागात मोठ्या संख्येनं झाडं लावल्यावर येथे नैसर्गिक थंडावाही राहणार आहे. यासोबतच श्री राम मंदिर परिसरात आंतरराष्ट्रीय राम कथा संग्रहालय देखील बांधले जात आहे. एप्रिल 2026 पर्यंत हे बांधकाम पूर्ण होईल, अशी माहिती आहे. हा सर्व परिसर पूर्ण झाल्यावर या मंदिर परिसराला बघण्यासाठी भाविकांना संपूर्ण दिवस द्यावा लागणार आहे. या दरम्यान भाविकासांठी सर्व सुख सुविधा येथे उभारण्यात येणार आहेत. (Ayodhya)
अयोध्येतील श्रीराम मंदिर उभारणीकडे देशविदेशातील श्रीराम भक्तांचे लक्ष आहे. हे मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले असले तरी येथे अजूनही विकास कामे करण्यात येत आहेत. 2026 पर्यंत ही कामे पूर्ण होतील असा अंदाज आहे. या मंदिर परिसराची जमिन 8 एकरच्या आसपास आहे. श्री राम मंदिर उभारल्यावर अनय जी 60 टक्के जमिन आहे, त्यावर श्रीराम मंदिर समिती काय करणार असा प्रश्न भाविकांना पडला होता. आता त्याच 60 टक्के जागेवर फळं आणि फुलांनी सजलेली बाग तयार करण्यात येणार आहे. भगवान रामाच्या मंदिराचे बांधकाम जवळजवळ पूर्ण झाले आहे.
डिसेंबर 2025 मध्ये राम मंदिराचे संपूर्ण बांधकाम पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. त्यानंतर मंदिर परिसरातील अन्य बांधकामेही पूर्ण कऱण्यात येणार आहेत. त्यामध्ये रामजन्मभूमी संकुलातील 60 टक्के जमिनीचाही समावेश आहे. या जमिनीवर हिरवळ विकसित केली जाणार असून ही पंचवटी बाग पिंपळ, वड, आंबा, जांभूळ अशा झाडांनी बहरणार आहे. राम मंदिर परिसरात होत असलेली ही पंचवटी बाग आठ एकर जमिनीवर करण्यात येणार आहे. यात रामायण काळातील झाडे लावण्याचा प्रयत्न होणार आहे. त्यात फळझाडांचा मोठा समावेश असेल. याच पंचवटी बागेमध्ये फिरणा-या भाविकांना अनेक सुविधा देण्यात येणार आहेत. ही बाग शरयू नदीलाही जोडण्याचा मानस आहे. त्यामुळे बागेत गेलेल्या भाविकांना शरयू नदीमध्येही नावेतून फिरता येणार आहे. (Ayodhya)
================
हे देखील वाचा : Mahabharat : महाभारतातील ‘या’ आहेत शक्तिशाली महिला
================
याशिवाय या बागेमध्ये उपहार गृहेही बांधण्यात येणार आहेत. यामध्ये सात्विक भोजनाचा आनंद भाविक घेऊ शकतात. शिवाय उत्तर प्रदेशमधील पदार्थांचा स्वाद भाविकांना घेता येईल. यासह येथे येणारे भाविक हे आपल्या पूर्वजांच्या नावानं येथे वृक्षारोपणही करु शकणार आहेत. मुख्य म्हणजे, याच पंचवटी बागेमध्ये भाविकांना रहण्यासाठी तंबूंही उभारण्यात येणार आहे. माघ महिन्यात होणा-या कल्पवाससाठीही हे तंबू उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. तसेच भारतात येणा-या परदेशी पर्यटकांमध्ये वैदिक गावांबाबत उत्सुकता असते. अशांसाठी येथे वैदिक गावाची संकल्पना विकसित करण्यात येणार आहे. पंचवटी बाग हा अयोध्येतील राम मंदिर संकुलाचा एक महत्त्वाचा भाग असणार आहे. यामुळे अधिक भाविक श्री राम मंदिराच्या भव्यतेचा अनुभव घेऊ शकणार आहेत. अयोध्येतील विमानतळाची देखभाल करणारी जीएमआर कंपनी या पंचवटी बागेची निर्मिती करत आहे. मंदिर परिसरात वापरण्यात येणारे पाणी वाया जाऊ नये, म्हणून या बागेमध्ये विशेष व्यवस्था करण्यात येणार आहे. तसेच प्रभू श्रीरामांच्या चरणी अर्पण होणा-या फुलांचा या बागेमध्ये खताच्या रुपात वापर करण्यात येणार आहे.(Ayodhya)
याशिवाय श्रीराम मंदिराचे बांधकाम अधिक भव्य करण्यात येत आहे. राम मंदिरात 42 सागवानी दरवाजे बसवले जात आहेत. या दरवाजांवर 100 किलो सोन्याचा मुलामा चढवला जाणार आहे. येथेच असलेल्या आंतरराष्ट्रीय राम कथा संग्रहालयाचे बांधकाम एप्रिल 2026 पर्यंत पूर्ण होणार आहे. या आंतरराष्ट्रीय राम कथा संग्रहालयात तंत्रज्ञानाद्वारे रामायण आणि रामचरितमानसातील घटना प्रदर्शित होणार आहेत. याशिवाय, तंत्रज्ञानाचा वापर करून एक गॅलरी बांधण्यात येत असून यामध्ये रामकथा दाखवण्यात येणार आहे.
सई बने