पावसाळा सुरू झाला की ओढ लागते ती म्हणजे पंढरपूरच्या विठुरायाच्या वारीची. टाळ चिपळ्याच्या नादाची, भजनाच्या तालाची आणि विठुरायाच्या दर्शनाची. मात्र गेली दोनवर्षं कोरोनाच्या महामारीमुळे सर्वसामान्य वारकऱ्याला ही वारी साध्य झाली नाही. यावर्षी सरकारच्या नियमामुळे मोजक्या वारकऱ्यांच्यात एसटी बस मधून माऊलींच्या पादुका नेण्यात आल्या.
यावर्षी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा एक वेगळाच अंदाज सबंध जनतेला पहायला मिळाला. वाढत्या कोरोनाचे कारण देत, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी ड्रायव्हर न घेताच स्वतः गाडी चालवत पांडुरंगाच्या महापूजेचा मान मिळावायला पंढरपूर गाठले. आणि त्यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आपल्या वेगळ्या अंदाजासाठी सोशल मीडियावर प्रकाश झोतात आले.
पण वारीत राजकारण करणारे किंवा वारीचे राजकारण करणारे किस्से पंढरपुरसाठी नवीन नाहीत. आता तुम्ही म्हणाल ते कसे? तर चला मग पाहुयात पंढरपूरच्या विठोबाचे आणि राजकारण्यांचे नक्की काय आहे कनेक्शन ते.
शालिनीताईंना विठ्ठल पावला आणि वसंतदादा पुन्हा मुख्यमंत्री झाले
ज्यावेळी वसंतदादा पाटील पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले तेव्हा त्यांच्या सरकारमधील काही आमदार फुटले आणि वसंतदादांचे सरकार पडले. ही बातमी वसंतदादांच्या पत्नी शालिनीताईंना समजताच त्यांनी थेट पंढरपूरचा रस्ता धरला.
तिथे जाऊन शालिनीताईंनी आपल्या नवऱ्यासाठी रुक्मिणीकडे “माझ्या पतीला पुन्हा पद मिळू दे, मी पाच तोळ्याचे मंगळसुत्र तुझ्या पायी वाहीन.” असा नवस केला. पुढे जाऊन वसंतदादा पाटील पुन्हा मुख्यमंत्री झाले. आणि शालिनीताईंनी वसंतदादांसह पंढरपूरला जाऊन आपला नवस फेडला.

मुख्यमंत्र्यांना विठुरायाचा चमत्कार दिसला आणि वसंतदादांनी वारीचा कर रद्द केला
शालिनीताईंच्या नवसानंतर वसंतदादांना (Vasantdada Patil) पंढरपूरच्या विठुरायाचा चमत्कार दिसला. त्यामुळे वसंतदादा पुन्हा मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी वारीला पंढरपुरात येणाऱ्या यात्रेकरूवरचा कर हटवला. इतकेच नव्हे तर पंढरपूर नंतर त्यांनी आळंदी व देहू येथीलही यात्रा कर वसंतदादांनी रद्द केला.
त्या घटनेनंतर पंडित नेहरूंनी पंढरपूरचा उंबराच बदलला
सन १९५३ ला पंडित जवाहरलाल नेहरू (Jawaharlal Nehru) जेव्हा पंढरपूरात विठुरायाच्या दर्शनाला आले, तेव्हा विठ्ठलाच्या गाभाऱ्यात जाण्याअगोदर त्यांना ठेच लागली. त्यावेळी मोठ्या प्रमाणात अंधश्रद्धा असल्याने, लोकांनी याघटनेला अपशकुनाचे रूप दिले.
पण नेहरूंनी या घटनेनंतर ज्या उंबऱ्याला ठेच लागली तो उंबराच बदलून टाकला. आणि त्याऐवजी नवीन दगडी उंबरा बसवला. आणि मग कदाचित नेहरूंच्या हस्ते हा उंबरा बसवण्यात यावा अशी विठुरायाची इच्छा असेल असे सगळ्यांना वाटू लागले.

लस घेतली नाही म्हणून शास्त्रींना पंढरपूरात येऊ दिले नव्हते
सध्या कोरोनामुळे जर तुम्ही कोरोनाची लस घेतली नसेल तर, तुम्हाला काही ठिकाणी प्रवेश दिला जात नाही. काही ठिकाणी तुमच्यावर निर्बंध लादले जातात. असच काहीसं कॉलराची साथ आली होती, तेव्हाही झाले होते. तेव्हा लाल बहादूर शास्त्री पंढरपुरात विठुरायाचे दर्शन घेण्यासाठी गेले होते.
तेव्हा कॉलराची भयंकर साथ पसरली होती. त्यामुळे ज्या व्यक्तीने कॉलराची लस घेतली नाही अशा व्यक्तींना पंढरपूरात येऊ दिले जात नव्हते. त्यामुळे त्यावेळी लस न घेतल्याने लाल बहादूर शास्त्रींना पंढरपूरात येऊ दिले नव्हते. या घटनेनंतर कदाचित विठुरायाची भेट शास्त्रीजींच्या (Lal Bahadur Shastri) नशिबात नसेल असे बोलले जात होते.
पंढरपुरात येऊन इंदिरा गांधींनी केला दिवसभर उपवास
एका राजकीय सभेसाठी इंदिरा गांधी पंढरपूरात आल्या होत्या. तेव्हा इंदिरा गांधी देवाला मानत नसतानाही विठ्ठलाचे दर्शन घ्यायला गेल्या. त्यानंतर दररोजच्या सवयीप्रमाणे इंदिरा गांधींना सकाळच्या नाष्ट्यात अंडी देण्यात आली होती.

मात्र त्यादिवशी इंदिरा गांधी (Indira Gandhi) पंढरपुरात असल्याने आणि त्यादिवशी एकादशी असल्याने, तसेच त्यांच्या अवतीभोवती असलेल्या अनेक लोकांचा एकादशीनिमित्त उपवास असल्याने, त्यादिवशी इंदिरा गांधींना अंडी खाणे योग्य वाटले नाही.
त्यामुळे त्यांनी त्यादिवशी अंडी न खाता फक्त दूध पिऊन आख्खा दिवस काढला. त्यांना नकळत एकादशी दिवशी पंढरपूरात उपवास घडला. याघटनेनंतर इंदिरा गांधींच्या समर्थकांना कदाचित एकादशी दिवशी इंदिराजींना उपवास घडवणं हे विठुरायाच्या मनात असेल असे वाटले.
तर असे होते राजकारण्यांचे आणि पंढरपूरच्या विठुरायाचे कनेक्शन आणि चमत्कार. तुम्हाला हे किस्से याअगोदर माहीत होते का? हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका.
– निवास उद्धव गायकवाड