साल १९९१, महिना जून. राजीव गांधींच्या धक्कादायक हत्येच्या सावटाखाली नुकतीच लोकसभेची मध्यावधी निवडणूक पार पडली होती. काँग्रेस निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष म्हणून निवडून आला होता, पण काँग्रेस स्वबळावर बहुमत मिळवू शकला नव्हता. राजीव गांधी यांच्या हत्येनंतर नरसिंह राव काँग्रेसचे अध्यक्ष झाले होते. त्यामुळे निवडणुकीनंतर नरसिह राव हेच काँग्रेसचे पंतप्रधानपदाचे प्रबळ उमेदवार होते.
निवडणुकीपूर्वी चंद्रशेखर भारताचे प्रधानमंत्री होते. त्यांच्या काळात राजकीय अस्थिरता व कुवेतच्या युद्धामुळे भारताची अर्थव्यवस्था रसातळाला गेली होती. फक्त १५ दिवस पुरेल एवढाच परकी चलनाचा साठा भारताजवळ होता.
जागतिक बँकेनं भारताला कर्ज देण्यास नकार दिला कारण भारताचे पतमानांकन घसरले होते. इतर देश सुद्धा भारताला कर्ज देण्यास तयार नव्हते. शेवटी बँक ऑफ इंग्लंडने कर्ज देण्याची तयारी दाखवली, पण अट घातली की, त्याबदल्यात भारताने सोने गहाण ठेवावे. नाईलाजाने चंद्रशेखर यांनी सोने गहाण ठेवण्यास मंजुरी दिली. एकूण १२९ टन सोने बँक ऑफ इंग्लंडकडे गहाण ठेवले गेले.

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने भारताला, “आर्थिक सुधारणा केल्या तरच भविष्यात कर्ज देऊ”, असे सांगितले होते. नरसिंह राव यांची काँग्रेसच्या संसदीय नेतेपदी निवड झाल्यावर कॅबिनेट सेक्रेटरीने आर्थिक स्थितीबाबतचे टिपण राव यांच्यापुढे ठेवले. राव यांनी ते टिपण अत्यंत बारकाईने वाचले व ते गंभीर झाले. त्याच वेळी त्यांनी मनाशी खूणगाठ बांधली की, ही परिस्थिती सांभाळण्यासाठी एखाद्या इकॉनॉमिस्ट अर्थमंत्र्यांची गरज आहे त्यामुळे त्याचीच नेमणूक करायची. त्यांनी प्रथम रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर आई.जी.पटेल यांच्याकडे विचारणा केली. पटेल यांनी नकार दिला.
=====
हे देखील वाचा: तब्बल सात वर्षानंतर राज्याच्या राजकारणात येताहेत पुन्हा ‘आर. आर….’!
=====
त्यानंतर राव यांच्या मनात दुसरे नाव आले ते मनमोहन सिंग यांचे. नरसिंह राव यांनी कॅबिनेट सेक्रेटरीला ताबडतोब मनमोहन सिंग यांच्याशी संपर्क साधण्यास सांगितले. श्री मनमोहन सिंग त्यावेळी परदेश दौऱ्यावर होते व मध्यरात्री परत येणार होते. भल्या पहाटे सेक्रेटरीने त्यांना फोन केला त्यावेळी श्री सिंग गाढ झोपले होते. त्यांना तसेच झोपेतून उठवून निरोप दिला गेला की, त्यांनी सकाळी लवकर नरसिंह राव यांची भेट घ्यावी. पण सिंग आपल्या नेहमीच्या वेशात त्यांच्या नियोजन आयोगाच्या कार्यालयात जाऊन कामकाज पाहू लागले.

इकडे श्री. राव मनमोहनसिंग यांची वाट पाहत होते. शेवटी त्यांनी सिंग याना फोन करून विचारले की, तुम्ही तिथे काय करत आहात? रावांनी सिंग यांना तातडीने भेटायला बोलावले. श्री सिंग याना अंदाज आला व ते औपचारिक पोशाख करून राव यांना भेटायला गेले.
नरसिंह राव यांनी त्यांना थेट सांगितले की, तुम्ही आज माझ्याबरोबर देशाचे नवे अर्थमंत्री म्हणून शपथ घेणार आहात. मनमोहन सिंग याना हा सुखद धक्का होता. त्यांनी रावांना विनंती केली की, त्यांना पूर्ण स्वातंत्र्य दिले जावे. राव यांनी सिंग याना आश्वस्त केले व शपथ घेऊन कामाला लागण्याची सूचना केली.
=====
हे देखील वाचा: उत्तरप्रदेशच्या राजकारणातील नवं वादळः अपर्णा यादव
=====
मनमोहन सिंग यांची निवड हा काँग्रेस पक्षाला धक्कादायक वाटली. मनमोहन सिंग यांनी शपथ घेतली व लगेचच त्यांनी अर्थमंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर बैठक घेतली. अशा तऱ्हेने आर्थिक सुधारणांचे जनक मनमोहनसिंग भारताचे अर्थमंत्री झाले.
– रघुनंदन भागवत