उत्तरप्रदेशमधील बलिया जिल्हा सध्या चर्चेत आला आहे, तो तेथील तेलाच्या साठ्यामुळे. बलिया जिल्ह्यातील सागरपाली गावात कच्च्या तेलाचे प्रचंड साठे असल्याचा दावा करण्यात आला असून आता ही सर्व जमीन ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लिमिटेडने ताब्यात घेतली आहे. बलिया जिल्ह्यातील या सागरपाली गावात सध्या ओएनजीसीचे अधिकारी तळ ठोकून बसले आहेत. कारण या भागात मोठ्या प्रमाणात तेलाचे साठे आहेत, या तेलाच्या साठ्यांचा शोध लागला तर हा सर्व भाग सुजलामसुफलाम होईलच, पण भारताला तेलासाठी अरब देशांवर अवलंबून रहावे लागणार नाही. इंग्रजाच्या विरोधात लढा उभा करणारे, स्वातंत्र्यसैनिक चिट्टू पांडे यांच्या जमिनीखाली या तेलाच्या साठ्यांचा शोध घेण्यात येत आहे. (Uttar Pradesh)
त्यांच्या वारसांना ओएनजीसीनं त्याचा मोठा मोबदला दिला असून आसपासच्या अन्य जमिनीही ताब्यात घेण्याच्या विचारत ओएनजीसी आहे. त्यामुळे या भागातील जमीन मालक सुखावले असून तरुणांनाही रोजगाराच्या संधी प्राप्त झाल्या आहेत. उत्तरप्रदेशमधील बलिया जिल्ह्यातील सागरपाली गावाजवळ कच्च्या तेलाची विहीर सापडण्याची शक्यता आहे. या शोधासाठी ओएनजीसीने खोदकाम सुरू केले आहे. आजूबाजूच्या शेतकऱ्यांच्या जमीन संपादित करण्याचीही तयारी सुरु केली आहे. ज्या जमिनीत सध्या ओएनजीसी खोदकाम करीत आहे, त्यांना वार्षिक 10 लाख रुपये भाडे देण्यात येत आहे. बलिया जिल्ह्यातील सागरपाली येथील रतुचक या छोट्या गावात हे खोदकाम चालू आहे. येथे तेलाचे साठे मिळाले तर स्थानिकांना रोजगार उपलब्ध होणार असून अर्थव्यवस्थेला चालना मिळणार आहे. रतुचक गावातील ‘शेर-ए-बलिया’ म्हणून ओळखले जाणारे चिट्टू पांडे यांच्या जमिनीवर हे काम चालू आहे. स्वातंत्र्याच्या चळवळीत चिट्टू पांडे यांचे योगदान मोठे आहे. (Marathi News)
या कच्च्या तेलाच्या साठ्यासाठी ओएनजीसीचे तज्ञ गंगा खो-यात गेल्या काही महिन्यापासून सर्वेक्षण करीत होते. या संशोधनात 3000 मीटर खोलीवर तेलाचे साठे आढळून आले आहेत. त्यामुळे सहा महिन्यांपासून ओएनजीसीने येथे खोदकामाला सुरुवात केली आहे. यासाठी ओएनजीसीने येथील जमीन तीन वर्षांसाठी भाड्याने घेतली आहे. या भागात आधुनिक मशीन्सचा वापर करुन खोदकाम करण्यात येत आहे. तज्ज्ञांच्या मते, या भागात 3000 ते 5000 मीटर खोदकाम करावे लागणार आहे. त्यानंतरच तेल सापडण्याची शक्यता आहे. मात्र हे खोदकाम करतांना तज्ञांना येथे तेल उपलब्ध असल्याचा पुरावा मिळाल्याचीही माहिती आहे. (Uttar Pradesh)
शिवाय येथे खोदकामानंतर कच्च्या तेलाचे साठे सापडले नाहीत, तर ही जमीन लागवड योग्य बनवून परत केली जाईल, असे आश्वासनही ओएनजीसीने जमिन मालकाला दिले आहे. सध्या बलियामध्ये या प्रकल्पाबद्दल प्रचंड उत्सुकता असून, रतुचक येथे एखाद्या जत्रेसारखी गर्दी जमली आहे. तेलाचा साठा सापडला, अशी अधिकृत घोषणा होण्याची गावकरी वाट पाहत आहेत. ओएनजीसीने रतुचक येथील सुमारे दीड एकर जमीन भाड्याने घेतली आहे. येथे चार विहिरी खोदण्याचे काम चालू आहे. त्यासाठी विविध ठिकाणी स्फोट करण्यात येत आहेत. जेथे तेलाचा शोध चालू आहे, ते ठिकाण राष्ट्रीय महामार्ग आणि सागरपाली गावाच्या मध्यभागी आहे. म्हणजेच. भविष्यात येथे तेल सापडल्यावर मोठ्या प्रमाणात वाहतुकीच्या सुविधाही तयार होणार आहेत. उत्खननाचे काम करणा-या तज्ञांच्या मते तेलाच्या पृष्ठभागापर्यंतचे बोअरिंगचे काम एप्रिल महिन्याच्या अखेरीस पूर्ण होणार आहे. (Marathi News)
=======
हे देखील वाचा : Donald Trump : महासत्ता करणार भारताचे अनुकरण !
Hiroo Onoda : युद्ध संपलं तरी तो २९ वर्ष लढत होता!
=======
यानंतरच आसपासच्या जमीन ताब्यात घ्यायला सुरुवात होईल. शिवाय गंगा खोऱ्यातील अन्य ठिकाणीही अशाच विहिरी खोदल्या जाणार असल्याचे ओएनजीसी तज्ञांनी सांगितले आहे. ज्या बलिया जिल्ह्यात तेलाचे साठे शोधण्यात येत आहेत, तो बलिया जिल्हा भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतही पुढे होता. भारताच्या स्वातंत्र्य चळवळी दरम्यान या जिल्ह्यातील रहिवाशांच्या बंडखोर वृत्तीमुळे याला “बंडखोर बलिया” म्हटले जाते. 1942 च्या स्वातंत्र्य चळवळीत, बलियाच्या रहिवाशांनी स्थानिक ब्रिटिश सरकार उलथवून टाकले होते. या लढ्यात चिट्टू पांडे यांच्या नेतृत्वाखाली काही दिवस स्थानिक सरकारही चालवले गेले. भारताचे माजी पंतप्रधान चंद्रशेखर, महान स्वातंत्र्यसैनिक जयप्रकाश नारायण हे देखील याच जिल्ह्याचे रहिवासी होते. आता हाच बलिया जिल्हा तेलाचा जिल्हा म्हणून ओळखला जाणार आहे. (Uttar Pradesh)
सई बने