पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजस्थान दौ-याच्या दरम्यान चित्तोडगड येथील सणवालिया सेठ मंदिराला भेट दिली. भगवान कृष्णाला समर्पित या मंदिराला भेट देऊन पंतप्रधान मोदी यांनी सर्व जनतेसाठी समृदध जीवनाचा आशीर्वाद भगवतांकडे मागितला. मोदींच्या या मंदिर दौ-याबाबत सध्या उत्सुकता आहे. मुळात एखाद्या मंदिराचे नाव सेठ कसे असू शकते, याबाबत चर्चा रंगली आहे. चित्तोडगड येथील सणवालिया सेठ मंदिराबाबत अशी अनेक रहस्य आणि कथा आहेत, ज्यामुळे हे मंदिर फक्त भारतातच नव्हे तर परदेशातही लोकप्रिय आहे. त्यामुळेच या मंदिराची दानपेटी महिन्यातून एकवेळा जेव्हा उघडण्यात येते, तेव्हा भारतीय रुपयासोबत डॉलरचीही संख्या खूप असते. मुख्य म्हणजे, या मंदिरातील कृष्णाची मुर्ती ही मीराबाईची असल्याची माहिती आहे. या मंदिरात प्रार्थना केल्यावर उद्योगधंद्यात भरभराट होते, अशीही माहिती आहे. त्यामुळेच या मंदिरात प्रार्थना करताना भक्त आपल्या व्यवसायात थेट भगवंतालाच सोबती करतात आणि मग उद्योगात फायदा झाल्यावर त्यातील काही वाटा देवाच्या पेटीत दानरुपानं देतात. यामुळेच या कृष्ण मंदिराला सणवालिया सेठ मंदिर (Temple) म्हणण्यात येते.
राजस्थानच्या चित्तोडगड जिल्ह्यातील येथील सणवालिया सेठ मंदिर (Temple) अतिशय जागृत मंदिर म्हणून ओळखले जाते. या मंदिरातील मुर्ती या कोणी तयार केल्या नसून त्या जमिनीतून वर आल्या आहेत, असे सांगितले जाते. 1840 मध्ये भोलाराम गुर्जर नावाच्या गुराख्याला बागुंड गावातील जमिनीमधून तीन दैवी मूर्ती शोधून काढल्या. या गुराख्याला या मुर्तीं स्वप्नात दिसत असत. त्याच जागेवर खोदल्यावर भूमिगत असलेल्या मुर्ती प्रकट झाल्याचे सांगण्यात येते. या तिनही मुर्ती भगवान कृष्णाच्या होत्या. पौराणिक कथेनुसार, सणवालिया सेठ मंदिरातील भगवान कृष्णाची मुर्ती ही मीराबाईची आहे. मीराबाई या मूर्तींसोबत संत-महात्म्यांच्या समूहात फिरत असत. दयाराम नावाच्या संतांचा असाच एक गट होता ज्यांच्याकडे या मूर्ती होत्या. त्यांनी त्या मीराबाईला दिल्या. पुढे औरंगजेबाचे सैन्य या मुर्ती तोडण्यासाठी आल्यावर संत दयाराम यांनी बागुंद-भाडसौदा परिसरात एका वटवृक्षाखाली खड्डा खणून या मूर्ती ठेवल्या. त्याच मुर्ती पुढे गुराख्याला सापडल्या. त्यातील एक मूर्ती मंडपात, एक भाडसोडा आणि तिसरी बागुंड गावातील छापर येथे नेण्यात आली. या प्रत्येक ठिकाणी भगवान कृष्णाची भव्य मंदिरे बांधण्यात आली. ही तिन्ही मंदिरे एकमेकांपासून 5 किमी अंतरावर आहेत.
या तिनही कृष्ण मुर्ती सावळ्या रंगाच्या असल्यातरी अतिशय देखण्या आहेत. या कृष्णाच्या मुर्ती काळ्या पाषाणापासून बनवलेल्या आहेत. त्यामुळेच सुरुवातीला या मंदिरांना सावलिया मंदिर असे नाव पडले. या तीन मंदिरांपैकी मंडफिया मंदिर (Temple) सावलिया जी धाम म्हणजेच सावलियाचे निवासस्थान म्हणून ओळखले जाते. येथे भगवान कृष्णाचा वास असल्याची भक्तांची भावना आहे. अत्यंत जागृत असलेल्या या मंदिराची सजावटही तेवढ्याच आकर्षकरित्या करण्यात आली आहे. समस्त वैष्णवपंथीयांसाठी हे मंदिर वंदनीय आहे. वैष्णव संप्रदायाच्या अनुयायांसाठी श्री नाथद्वारानंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे हे संवलिया सेठ मंदिर आहे. या मंदिरांचे आणखी एक वैशिष्ट म्हणजे, या मंदिरात अफूही अर्पण करण्यात येतो. अफूची शेती करणारे मंदिरात अफू अर्पण करुन आपली इच्छा व्यक्त करतात. मंदिराच्या दानपेटीमधून दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा अफू मिळतो. माराबाई याच कृष्णाची मुर्तीची ‘मेरे तो गिरधर गोपाल, दूसरा ना कोई…‘ म्हणत आराधना करत असे. मिराबाईची ही कृष्णभक्ती या मंदिरांवरील भिंतींवर चित्ररुपात रेखाटण्यात आली आहे.
=========
हे देखील वाचा : भारतात नाही तर ‘या’ देशात आहेत २४० मंदिरे
=========
जागृत असलेल्या या मंदिरात (Temple) भाविक आपल्या पगारापासून ते त्यांच्या व्यवसायातील फायद्यापर्यंत, सर्वात भगवान कृष्णाला भागीदार करतात. भक्तांनी देवाच्या खजिन्यात जेवढे पैसे दिले त्यापेक्षा कितीतरी पटीने संवलिया सेठ भक्तांना परत करतात असे मानले जाते. व्यवसाय वाढवण्यासाठी अनेक व्यावसायिक देवाला आपला व्यवसाय भागीदार बनवतात. ही अनोखी प्रथा सुरु झाल्यापासून संवलिया मंदिराला संवलिया सेठ मंदिर असे म्हटले जाऊ लागले. या मंदिराचा भंडारा दर महिन्याला होतो. मंदिराची दानपेटी चतुर्दशीला उघडली जाते. तेव्हापासूनच भंडारा सुरु होतो, तो अमावस्येपर्यंत असतो. या मंदिराला परदेशातून मोठ्या प्रमाणात देणगी देण्यात येते. त्यामुळे मंदिराच्या (Temple) दानपेटीत अमेरिकन डॉलर, पौंड, दिनार, रिअल आदींसह अनेक देशांचे चलन मिळतात. या मंदिराचे सुशोभिकरण सध्या मोठ्या प्रमाणात सुरु आहे. मंदिराच्या समोर असलेल्या मैदानात संगीतमय कारंजे बसवण्यात येत आहेत. या मंदिराला भेट देण्यासाठी भारतभरातून भाविक येत असल्याने मंदिराच्या परिसरात भाविकांसाठी अनेक निवासस्थानेही उभारण्यात आली आहेत.
सई बने