टाटा समूहाने भारतात अनेक प्रसिद्ध राजवाड्यांचे रुपांतर हॉलेमध्ये केले आहे. त्यात राजस्थानमधील उदयपूर येथील लेक पॅलेस हॉटेल हे देशातील पर्यटकांचेच नाही तर परदेशातील पर्यटकांच्याही पहिल्या पसंतीत आहे. उदयपूर येथील ताज लेक पॅलेस हे ताज हॉटेल्समधील सर्वात लोकप्रिय लक्झरी हॉटेल मानले जाते. यामुळे महालात राहण्याचा आनंद पर्यटकांना घेता येतो. शिवाय राजघराण्यातील खाद्यसंस्कृतीचीही येथे ओळख करुन देण्यात येते. टाटा समुहाच्या ताज हॉटेल ग्रुपचे हे वैशिष्ट आहे. (Taj Lake Palace)
आता या ग्रुपमध्ये आणखी एका राजवाड्याचे नाव जोडले गेले आहे. भारताच्या ईशान्य सीमेवर असलेल्या त्रिपुरामधील प्रसिद्ध राजवाडा आता टाटा समुहाच्या ताब्यात आला आहे. तब्बल 100 खोल्यांच्या या महालामध्ये आता लवकरच फाईव्हस्टार दर्जाचे हॉटेल सुरु होणार आहे. त्रिपुरा येथील प्रसिद्ध पुष्पबंता राजवाड्याचे ताज हॉटेलमध्ये रुपांतर होणार आहे. देशभरातील अनेक राजवाडे आणि महल, ताज ग्रुपनं घेऊन त्यांचे 5 स्टार आणि 7 स्टार हॉटेलमध्ये रुपांतर केले आहे. यामध्ये आता पुष्पबंता राजवाड्याची भर पडली आहे. त्रिपुरा राज्याची राजधानी असलेल्या अगरतळा येथील 100 वर्षे जुना पुष्पबंता पॅलेस लवकरच 5 स्टार हॉटेलमध्ये रूपांतरित होणार आहे. (Marathi News)
यासाठी त्रिपुरा सरकारने टाटा समूहाची कंपनी इंडियन हॉटेल्स कंपनी लिमिटेड सोबत सामंजस्य करार केला आहे. या कराराअंतर्गत, माणिक्य राजवंशातील ऐतिहासिक पुष्पबंत पॅलेसचे रूपांतर 5 स्टार हेरिटेज हॉटेलमध्ये होणार आहे. सध्या त्रिपुरा राज्यात पर्यटनासाठी अनेक उपक्रम राबवण्यात येत आहेत. पर्यटनाला चालना देण्यासाठी विकासकामे करण्यात येत आहेत. त्याअतंर्गतच पुष्पबंता राजवाड्याचे हस्तांतर करण्यात आले आहे. या प्रकल्पामुळे राज्यातील पर्यटनाला चालना मिळून आर्थिक पाठबळही उपलब्ध होईल, अशी आशा व्यक्त करण्यात आली आहे. शिवाय राज्यात रोजगाराच्या संधी वाढणार आहेत. राज्यसरकारसोबत झालेल्या करारानुसार, पुष्पबंता पॅलेससह एकूण 7.78 एकर जमीन आयएचसीएलला 60 वर्षांसाठी भाडेतत्त्वावर देण्यात आली आहे. हा 60 वर्षाचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर पुन्हा 30 वर्षांसाठी हा करार वाढवण्याची तरतूदही यात आहे. (Taj Lake Palace)
पॅलेसचे हॉटेलमध्ये रुपांतर झाल्यावर त्याचे नाव ‘ताज पुष्पबंता पॅलेस’ असे ठेवण्यात येणार आहे. या ताज पुष्पबंता पॅलेसमध्ये 100 खोल्या पर्यटकांसाठी उपलब्ध असतील. त्यातील चार खास शाही शैलीतील सुइट्स असतील. हे सुइट्स मुख्य राजवाड्याच्या आत बांधले जाणार आहेत. या सुइट्समध्ये रहाणा-या पर्यटकांना माणिक्य राजवंशाच्या भव्यतेचा अनुभव घेता येणार आहे. याशिवाय अन्य खोल्यांमधूनही माणिक्य राजवंशाची माहिती उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. हा सर्व प्रकल्प पूर्ण करण्यासाठी किमान वर्षाचा कालावधी लागणार असून सुमारे 250 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. (Marathi News)
पुष्पबंता पॅलेस हा त्रिपुराचे महाराजा बिरेंद्र किशोर माणिक्य देबबरमन बहादूर यांनी बांधला आहे. 1909 ते 1923 या कालवधीत हा राजवाडा बांधण्यात आला. माणिक्य राजघराण्याच्या उज्जयंत राजवाड्याच्या उत्तरेस 1 किमी अंतरावर असलेल्या कुंजबन नावाच्या टेकडीवर हा राजवाडा विशेष कारणासाठी बांधण्यात आला. माणिक्य राजांसाठी अतिथीगृह या राजवाड्याचा उपयोग होत असे. या राजवाड्याचे सर्वात मोठे वैशिष्ट म्हणजे, येथे रवींद्रनाथ टागोर यांनीही मुक्काम केला होता. राजघराण्याशी जवळचे संबंध असलेले नोबेल पारितोषिक विजेते रवींद्रनाथ टागोर यांनी त्रिपुराला तब्बल सात वेळा भेट दिली आहे. (Taj Lake Palace)
==============
हे देखील वाचा : Miyazaki Mango : जगातला महाग आंबा होतोय बिहारमध्ये !
Raw : रॉ एजंट म्हणून काम करायचे जाणून घ्या संपूर्ण प्रोसिजर
=============
महाराजा बीर बिक्रम किशोर माणिक्य यांनी रवींद्रनाथ टागोर यांचा 80 वा वाढदिवस याच पुष्पबंता पॅलेसमध्ये साजरा केला होता. 1949 मध्ये त्रिपुरा संस्थान भारतीय संघराज्यात विलिन झाले. तेव्हा या 4.31 एकरात असलेल्या राजवाड्यात काही काळ मुख्य आयुक्तांचा मुक्काम होता. नंतर 2018 पर्यंत पुष्पबंता पॅलेस हा त्रिपुराचे राजभवन म्हणून ओळखला गेला. त्यानंततर राजभवन नवीन इमारतीत हलवण्यात आल्यावर या राजवाड्याचा दक्षिणेकडील भाग जनतेसाठी खुला करण्यात आला. भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी 14 ऑक्टोबर 2022 रोजी पुष्पबंता पॅलेस येथे डिजिटल संग्रहालयाची पायाभरणी केली. आता याच राजवाड्याचे ताज हॉटेलमध्ये रुपांतर होणार आहे. (Marathi News)
सई बने