चारधाम यात्रेचे हिंदू धर्मात खूप महत्त्व आहे. उत्तराखंड राज्यातील बद्रीनाथ, केदारनाथ, गंगोत्री आणि यमुनोत्री या चारधाम यात्रेसाठी जगभरातील हिंदू बांधव दरवर्षी गर्दी करतात. या भागात हिवाळ्यात मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी होत असल्यानं ही यात्राही मर्यादित महिन्यांसाठी असते. ठराविक कालावधीनंतर चारधाममधील पवित्र मंदिरे बंद करण्यात येतात. या काळात या मंदिरांमध्ये देवता प्रत्यक्ष येऊन पुजाअर्चा करतात असा समज आहे. मात्र आता इतिहासात पहिल्यांदाच शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद हिवाळी चारधाम यात्रा करणार आहेत. (Chardham Yatra)
हिवाळी चारधाम तीर्थयात्रा हा एक ऐतिहासिक उपक्रम असून इतिहासात प्रथमच शंकराचार्य अशी यात्रा करत आहेत. असे मानले जाते की, हिवाळ्याच्या सहा महिन्यांत उत्तराखंडच्या चार धामांचा ताबा देवतांकडे सोपवला जातो. त्या ठिकाणी, हिवाळ्यातील पूजास्थानांमध्ये विधी आणि उत्सवांसह पूजनीय जंगम मूर्ती स्थापित केल्या जातात. तेथे भाविकांना प्रवेश नसतो. मात्रा यावर्षीपासून इतिहासात प्रथमच शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद हिवाळी चार धाम यात्रा करणार आहेत.
उत्तराखंड सरकारनेही हिवाळ्यातही चारधाम यात्रा सुरू करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. चार धाम, म्हणजेच गंगोत्री, यमुनोत्री, केदारनाथ आणि बद्रीनाथ या मंदिरांच्या पुजाऱ्यांशी बोलल्यानंतर उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांनी हिवाळ्यातही चार धाम यात्रा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या काही वर्षापासून उत्तराखंडमध्ये पर्यटकांचा ओघ वाढला आहे. यात धार्मिक पर्यटन विकसीत होत आहे. याचा स्थानिकांना मोठा लाभ मिळत आहे. वाढत्या धार्मिक पर्यटनामुळे स्थानिकांना मोठा रोजगार उपलब्ध झाला आहे. या राज्याची अर्थव्यवस्था पर्यटनावर आधारित असल्यामुळे हिवाळ्यातही चारधाम यात्रा चालू केल्यास स्थानिकांच्या रोजगारावर परिणाम होणार नाही, हा विचार करत राज्यसरकारनं या उपक्रमासाठी मोठा हातभार लावला आहे. (Chardham Yatra)
त्याआधी ज्योतिषपीठाच्या शंकराचार्यांनी हिवाळ्याच्या काळात चार धामला भेट देण्याचे मिथक मोडीत काढण्यासाठी पुढाकार घेतला आहे. ज्योतिषपीठाधीश्वर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद 27 डिसेंबर रोजी आपल्या भक्तांसह या यात्रेचे उद्घाटन करणार आहेत. हिवाळ्याच्या सहा महिन्यांत उत्तराखंडच्या चार धामांचा ताबा देवतांकडे असल्याचे मानले जाते.
या चारही धामांमध्ये परंपरागत पुजारी नेमलेले आहे. हेच पुजारी येथे मुक्कामास असतात आणि ते पुजारी सतत सहा महिने देवतेची पूजा करतात. या देवतांच्या हिवाळी मुक्कामाच्या ठिकाणी दर्शनाची परंपरा सुरु करण्यात येत आहे. उत्तराखंडासाठी ही हिवाळी चारधाम यात्रा मोठी आर्थिक उभारी देणारी ठरणार आहे. ज्योतिषपीठाधीश्वर जगद्गुरू शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरनंद 26 रोजी श्री. हरिद्वार येथील त्यांच्या आश्रमात यानिमित्त विशेष पुजा आणि होम हवन करणार आहेत. ही हिवाळी चारधाम यात्रा 27 डिसेंबर ते 2 जानेवारी 2024 पर्यंत चालणार आहे. यामुळे यात्रेकरूंना देवतांच्या दर्शनाचा धार्मिक-आध्यात्मिक फायदा होणार आहे. शिवाय स्थानिकांना यामुळे रोजगार उपलब्ध होणार आहे. या चारही धामच्या यात्रा हिवाळ्यात बंद असल्यामुळे स्थानिक व्यवसायिक आर्थिक संकटात येतात. त्यांना ही यात्रा हातभार लावणारी ठरणार आहे. (Chardham Yatra)
शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी, भारताच्या अध्यात्मिक प्रगतीत ऋषी-मुनींचे योगदान आहे. तसेच या देशाच्या आर्थिक प्रगतीतही भारतातील संत मागे राहिलेले नाहीत. आज देशात ज्या काही धार्मिक यात्रा चालू आहेत ती आपल्या पूर्वजांची आणि ऋषीमुनींची देणगी आहे. आता हिवाळी चारधाम यात्रा सुरु करुन उत्तराखंडच्या आर्थिक प्रगतीला चालना देणार असल्याचे स्पष्ट केले आहे. 27 डिसेंबर रोजी हरिद्वार येथील श्री शंकराचार्य मठ येथून यात्रेला सुरुवात होणार आहे. 28 आणि 29 डिसेंबर रोजी उत्तरकाशी येथे, 30 डिसेंबर रोजी केदारनाथचे हिवाळी पूजास्थान उखीमठच्या ओंकारेश्वर मंदिरात, 31 डिसेंबरला बद्रिकाश्रम हिमालयात, 1 जानेवारीला ज्योतिर्मठ येथे आणि 2 जानेवारीला हरिद्वार येथे या चारधाम यात्रेचा मुक्काम आणि समारोप होईल. (Chardham Yatra)
==============
हे देखील वाचा : जटायुराजांची पहिली पूजा पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार
==============
चार धाम जेथे आहेत, ती स्थळे उंच टेकड्यांवर आहेत. येथे तुफानी बर्फवृष्टी होते. त्यामुळे या चारधाम मधील देवतांना हिवाळ्यात पूजेसाठी जवळच्या गावांमध्ये नेले जाते. केदारनाथसाठी उखीमठ, बद्रीनाथसाठी जोशीमठ, गंगोत्रीसाठी मुखबा आणि यमुनोत्रीसाठी खरसाली ही गावे निश्चित केलेली आहेत. हिवाळी चारधाम यात्रा सामान्य चारधाम यात्रेपेक्षा सोपी असणार आहे. हिवाळ्यातील चार धामसाठी, हरिद्वारपासून फक्त 7 दिवस लागतील. तर अन्य महिन्यात चार धामसाठी साधारणपणे किमान 12 दिवस लागतात. त्यामुळेच या हिवाळी चारधाम यात्रेला भाविकांचा मोठा पाठिंबा मिळेल असा विश्वासही व्यक्त करण्यात आला आहे.
सई बने