लोकशाही राजवटीत सत्ताधारी पक्षावर अंकुश ठेवण्यासाठी आणि त्याचे गैरकृत्य उघडकीस आणण्यासाठी समर्थ विरोधी पक्ष हवे असतात. चार महिन्यांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी महायुतीला राक्षसी म्हणावं असं बहुमत मिळालं, तर विरोधातील महाविकास आघाडीचा पारावार उरला नाही. अशा परिस्थितीत विरोधी पक्ष सत्ताधाऱ्यांवर कसा अंकुश ठेवणार, हा प्रश्न निर्माण झाला होता. परंतु अवघ्या तीन महिन्यात महायुतीच्या तीन मंत्र्यांवर गंभीर आरोप झाले. त्यातील एकाला तर राजीनामा द्यावा लागला. (Political News)
कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना एका जुन्या प्रकरणात न्यायालयाने दोषी ठरवलं. त्यांनी उच्च न्यायालयातून दिलासा मिळवला असला, तरी नैतिक बाजू कमकुवत झाली ती झाली. त्यानंतर बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यावा लागला. त्या प्रकरणाची शाई वाळते न् वाळते तोच महायुती सरकारचे आणखी एक मंत्री संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. ते म्हणजे जयकुमार गोरे… पण यांचा नेमका काय वाद झाला, जाणून घेऊ. (Jaykumar Gore)
सातारा जिल्ह्यातील माण-खटावचे भाजप आमदार आणि ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे (Jaykumar Gore) यांच्यावर गंभीर आरोप झाले आहेत. एका ऐतिहासिक घराण्यातील स्त्रीच्या लैंगिक छळाचा आरोप गोरे यांच्यावर झाला आहे. संबंधित महिलेला गोरे यांनी स्वत:चे नग्न फोटो पाठवून तिला त्रास दिला, त्यामुळे येत्या काही दिवसांत ही महिला विधानभवनासमोर उपोषणाला बसणार आहे, असा आरोप शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. राऊत यांच्या एकूण बोलण्याचा इतिहास लक्षात घेतला तर त्यातील गांभीर्य नेहमीच शंकास्पद असत. परंतु काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनीही या आरोपाला दुजोरा दिला आहे.
गोरे हे सध्या राज्याचे ग्रामाविकास मंत्री आहेत. आठ वर्षांपूर्वी, 2016 मध्ये , त्यांच्यावर असेच आरोप झाले होते. त्यावेळी ते काँग्रेसमध्ये होते. एका महिलेला आक्षेपार्ह फोटो पाठवल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. अटक टाळण्यासाठी गोरे यांनी सातारा जिल्हा न्यायालय आणि मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता. त्यानंतर गोरे यांना अटक होऊन दहा दिवस तुरुंगात काढावे लागले होते. (Political News)
मात्र या पीडित महिलेने राज्यपालांना लिहिलेल्या पत्रातून या प्रकरणाला पुन्हा वाचा फुटली. दोन महिन्यांपूर्वी, जानेवारी 2025 पासून अनेक व्हॉट्सअप ग्रुपवर पीडितेने 2016 मध्ये दाखल केलेली तक्रार व्हायरल करण्यात आली. त्यामुळे पीडित महिलेची ओळख उघड होऊन तिची बदनामी झाली. पीडित महिलेला 9 जानेवारी 2025 रोजी एक निनावी पत्र मिळाल. त्यात 2016 ची ही तक्रार होती आणि धमकीही देण्यात आली होती. हे पत्रही सोशल मीडियावर व्हायरल झाल व परत तिची बदनामी सुरू झाली, अस पीडितेने राज्यपालांना पाठविलेल्या पत्रात म्हटलं आहे. (Political News)
त्यामुळे नवे राजकीय वादळ उठण्याची शक्यता आहे. शरद पवारांना चॅलेंज देणारे नेते म्हणून जयकुमार गोरे (Jaykumar Gore) यांची ओळख आहे. तसेच कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना कमी वयात निवडून आलेले आमदार म्हणूनही ते ओळखले जातात. त्यांनी सलग चार वेळा निवडणूक जिंकली. सर्वप्रथम 2009 मध्ये अपक्ष म्हणून विधानसभा निवडणूक जिंकली. त्यानंतर 2014 मध्ये काँग्रेसकडून निवडणूक जिंकली, तर 2019मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करत निवडणूक लढवली.
===============
हे देखील वाचा : Dhananjay Munde : मुंडेंचा मंत्रीपदाचा राजीनामा, संतोष देशमुख यांना न्याय मिळणार ?
===============
मात्र जयकुमार गोरे आणि वाद हे जुनं समीकरण आहे, हेही तेवढच खरं. गुंडगिरी केल्याच्या कारणावरून त्यांना गावातून बाहेर काढण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांनी जिल्हा परिषदेची निवडणूक लढवली आणि सदस्य म्हणून निवडून आले. मात्र काही काळाने मृत व्यक्तीच्या नावाने बनावट कागदपत्र बनवल्याचं एक प्रकरण त्यांच्यावर दाखल झालं होतं. मायणी गावातील जमिनीबाबतचं हे प्रकरण होतं. त्यात 2022 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने जयकुमार गोरे यांना ट्रायल कोर्टासमोर शरण येण्याचे आणि जामिनासाठी अर्ज करण्याचे निर्देश दिले होते. (Jaykumar Gore)
त्यातच आता हे जुनं प्रकरण पुन्हा त्यांना भोवण्याची चिन्हे आहेत. गोरेंबद्दलचे आरोप महाराष्ट्राला काळिमा फासणारे आहेत. एका ऐतिहासिक कुटुंबातील स्त्रीचा विनयभंग करणाऱ्या मंत्र्याला आपण मंत्रीमंडळात का ठेवलं आहे, असा प्रश्न संजय राऊत यांनी उपस्थित केला. तर “राज्यातला एक पैलवान मंत्री, रोज व्यायाम करणारा, तो विवस्त्र फोटो महिलेला पाठवतो. हा मंत्री पश्चिम महाराष्ट्रातील आहे. 10 दिवस जेलची हवा खातो. त्याच्या पलीकडे जाऊन 10 हजारांचा दंड भरून न्यायालयात माफी मागतो. त्यानंतरही तो महिलेच्या मागे लागतो. विवस्त्र फोटो पाठवलेला मंत्री जर मंत्रिमंडळात असेल तर यापेक्षा लज्जास्पद, महाराष्ट्राच्या इतिहासात अशा काळ्या मंत्र्याची यादी रोज वाढत चालली आहे,” अशा शब्दांत विजय वडेट्टीवार यांनी हल्ला चढविला आहे.
एकुणात महायुती सरकारपुढील अडचणी वाढत चालल्या आहेत, हे खरे. परंतु त्यात विरोधी पक्षांचे कर्तृत्व कमी आणि सत्ताधाऱ्यांच्याच उचापती जास्त आहेत, हेही खरे.