मंदिरांचा देश अशी ओळख असलेल्या भारतात अनेक प्रकारची, अनेक वैशिष्ट्य असलेली मंदिरं आहेत. विविधतेने भरलेल्या या देशात अध्यात्माला विशेष महत्त्व दिले जाते. याच मंदिरांमुळे आपल्या देशाची जगात एक वेगळी ओळख देखील आहे. प्रत्येक मंदिराला एक खास इतिहास, खास वैशिष्ट्य आहे. यातही जर आपण पाहिले तर दक्षिण भारतातील मंदिरं अधिक आकर्षक, वेगळे आणि खूपच सुरेख असलयाचे निदर्शनास येते. इथे असणाऱ्या प्रत्येक मंदिराची बांधणी, रंगसंगती, देवाची मूर्ती, मंदिरांचा इतिहास याला एक वेगळेच वलय आहे. या मंदिरांना बाहेरून बघून लगेच समजते की, ही मंदिरं दक्षिण भारतात आहे. (Krushna Temple)
असेच दक्षिण भारतातील एक जगप्रसिद्ध आणि लोकप्रिय मंदिर म्हणजे उडुपी श्रीकृष्ण मंदिर. अनेकांना या मंदिराबद्दल माहिती देखील असेल किंवा या मंदिराबद्दल ऐकलेले देखील असेल. आपण ज्या मंदिराबद्दल बोलत आहोत ते कर्नाटकातील उडुपीमध्ये स्थित आहे. या अद्भुत मंदिराचे नाव आहे ‘उडुपी कृष्ण मंदिर’. हे मंदिर केवळ कर्नाटकचा नाही तर संपूर्ण भारतामध्ये प्रसिद्ध आहे. या मंदिराचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे, इथे मिळणारे देवाचे दर्शन. (Marathi Top News)
उडुपीचे कृष्ण मंदिर हे कृष्ण भक्तांसाठी अगदी जिव्हाळ्याचे ठिकाण आहे. दररोज हजारो भाविक कृष्णाचे दर्शन घेण्यासाठी आणि पूजा करण्यासाठी येथे येतात. या मंदिरात भगवान श्रीकृष्ण हे बालरुपात विराजमान आहेत. मंदिरातील मूर्तीचे प्रत्यक्ष दर्शन कोणालाही करता येत नाही. येथे भगवान श्रीकृष्णाचे दर्शन दरवाजातून नाही तर नऊ छिद्रे असलेल्या छोट्या खिडकीतून करता येते. असे म्हणतात की येथे नऊ छिद्रे असलेली खिडकी नऊ ग्रहांना जोडते. दरवाजातून दर्शन घेण्यास कोणालाही परवानगी नाही. हे अनोखे मंदिर आपल्या अनेक अशा वेगळ्या आणि खास गोष्टींसाठी ओळखले जाते. (Marathi Latest News)
श्रीकृष्ण जयंती आणि जन्माष्टमीनिमित्त या मंदिरात होणारी पूजा आणि जन्मोत्सव पाहण्यासारखा असतो. या निमित्ताने मंदिर फुलांनी आणि रंगीबेरंगी दिव्यांनी सजवले जाते. या मंदिराबाबत अशी मान्यता आहे की, देवाने आपल्या एका भक्ताच्या भक्तीवर प्रसन्न होऊन प्रत्येकाला त्याचे दर्शन घेता यावे म्हणून ही खिडकी बांधली होती.
=======
हे देखील वाचा : China : भारताचा कट्टर वैरी असलेल्या चीनमध्ये ‘या’ मराठी माणसाची केली जाते पूजा
=======
कृष्णाचा चेहरा भिंतीकडे
कर्नाटक राज्यातील या उडुपी गावातील कृष्ण मंदिराशी संबंधित एक आख्यायिका प्रचलित आहे. असे सांगितले आहे की, पूर्वी भगवान श्रीकृष्णाचे एक महान भक्त होते. या भक्ताला या मंदिरात प्रवेश दिला जात नव्हता. मग ते या मंदिराच्या मागे जाऊन कठोर तपश्चर्या करू लागले आणि भगवान श्रीकृष्णाची प्रार्थना करून त्यांचे दर्शन मिळावे यासाठी याचना करू लागले. तेव्हा श्रीकृष्णाने त्या भक्ताला आपले दर्शन दिले. हे दर्श देताना श्रीकृष्णाने आपले डोके आपल्या प्रिय भक्ताच्या दिशने वळवले. भक्त बसून प्रार्थना करीत होते. तपश्चर्या करीत होते. तेव्हापासून आजतागायत या मंदिरात स्थापन केलेल्या मूर्तीचे डोके भिंतीकडे असून देवाच्या दर्शनासाठी इथे खिडकी आहे. या खिडकीतून येथे भगवान श्रीकृष्णाचे दर्शन होते. (Top Stories)
मंदिराबाबतची मान्यता
हे मंदिर श्री मध्वाचार्य यांनी १३व्या शतकात स्थापन केले होते आणि तेव्हापासून हे मंदिर दक्षिण भारतातील सर्वात प्रसिद्ध आणि पवित्र मंदिरांपैकी एक मानले जाते. मंदिराच्या स्थापनेबाबत एक मान्यता अशी आहे की, एकदा श्री मध्वाचार्यांनी समुद्रातील वादळात अडकलेल्या एका जहाजाला आपल्या दैवी शक्तीने वाचवले होते. जहाज किनाऱ्यावर पोहोचले तेव्हा त्यात श्रीकृष्णाची मूर्ती सापडली, जी समुद्राच्या चिखलाने मढलेली होती. माधवाचार्यांनी ती मूर्ती उडुपीला आणून मंदिरात स्थापित केली, आजही भक्त याच मूर्तीची भक्तिभावाने पूजा करतात. (Marathi Trending News)
भक्त फरशीवर करतात भोजन
या मंदिरात फरशीवर भोजन करण्याची एक प्रथा आहे. असे म्हटले जाते की ज्या भक्ताची इच्छा पूर्ण होते तो भगवान श्रीकृष्णांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि आपली भक्ती दर्शवण्यासाठी या मंदिराच्या जमिनीवर वाढलेले अन्न खातो. असे असले तरी ही प्रथा पूर्णपणे ऐच्छिक आहे. ज्यांना जमिनीवर वाढलेले जेवण जेवायचे ते जेवू शकतात बाकीच्या भक्तांना ताटामध्ये भोजन वाढले जाते. (Social News)
हे श्रीकृष्ण मंदिर पहाटे साडेचार वाजता उघडले जाते, मात्र यावेळी फक्त मठातील लोकांनाच मंदिरामध्ये प्रवेश दिला जातो. सामान्य भाविकांसाठी मंदिर पहाटे ५ वाजता उघडले जाते, तर मंदिर दररोज रात्री १० वाजता बंद होते. उत्सवाच्या काळात मंदिर उघडण्याच्या आणि बंद होण्याच्या वेळेत बदल होत असतात.
=======
हे देखील वाचा : Bhushan Gavai : महाराष्ट्राचे भूषण गवई बनले देशाचे ५२वे सरन्यायाधीश
=======
या मंदिरात विमानाने जाण्यासाठी मंदिराजवळ साधारण ६० किलोमीटर अंतरावर मंगळुरू आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. हेच या मंदिरापासून सर्वात जवळचे विमानतळ आहे. येथून तुम्ही टॅक्सीने थेट मंदिरापर्यंत जाऊ शकता. रेल्वेने जाण्यासाठी उडुपी रेल्वे स्टेशन मंदिरापासून केवळ ३.२ किमी अंतरावर आहे. याशिवाय तुम्ही तुमच्या खासगी गाडीने देखील जाऊ शकतात. (Marathi Top Stories)