Home » CALF लॅब, नंदिनी तूप, व तिरुपतीचे प्रसादाचे लाडू

CALF लॅब, नंदिनी तूप, व तिरुपतीचे प्रसादाचे लाडू

by Team Gajawaja
0 comment
Tirupati Balaji Temple
Share

आंध्रप्रदेशातील तिरुपती बालाजी देवस्थान हे जगभरातील तमाम हिंदूंच्या श्रद्धेचे स्थान आहे. मात्र जेव्हापासून तिरुपती बालाजींच्या प्रसादातील लाडूमधील भेसळ पुढे आली, तेव्हापासून मोठा गदारोळ उठला आहे. यासर्वात दोन नावं चर्चेत आली आहेत, त्यातील एक म्हणजे, CALF लॅब. आणि दुसरे म्हणजे, नंदिनी तूप. CALF लॅबच्या अहवालानुसार तिरुपती बालाजींच्या लाडूंमध्ये प्राण्यांची चरबी असल्याचा अहवाल देण्यात आला आहे. ही CALF लॅब कसे काम करते, आणि तिचा अहवाल एवढा विश्वासार्य का आहे, याची चर्चा सुरु आहे. यासोबत नंदिनी तुपाची चर्चा सुरु आहे, कारण गेल्या 50 वर्षांपासून तिरुपती मंदिराला नंदिनी तूप पुरवले जात असे, मात्र अचानक काहीतरी बिनसले आणि या तुपाला मिळणारी बालाजी संस्थानाची ऑर्डर रद्द झाली. या सर्वांमगा काय कारण होते, याचीही चर्चा सुरु झाली आहे. तिरुपती बालाजीला जाण्याचे स्वप्न तमाम, हिंदूंचे असते. (Tirupati Balaji Temple)

मात्र ज्यांना जाता येत नाही, ते तिरुपती बालाजीचा प्रसादाचा लाडू मिळाला तरीही समाधान व्यक्त करतात, मात्र याच लावडामध्ये प्राण्यांची चरबी असल्याचे पुढे आल्यानं तिव्र नाराजी व्यक्त होते आहे. या सर्वांमागे CALF लॅब आणि नंदिनी तुप यांची भूमिका महत्त्वाची आहे. तिरुपती बालाजींच्या प्रसादाचे लाडू तयार करण्यासाठी कॉंग्रेसच्या काळात प्राण्यांच्या चरबीचा वापर करण्यात आला असा आरोप टीडीपी अध्यक्ष आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू यांनी पत्रकार परिषद घेऊन केला. हा आरोप केल्यावर फक्त भारतातच नव्हे जगभरात खळबळ उडाली. कारण तिरुपती बालाजी संस्थान हे जगभरातील हिंदूंसाठी महत्त्वाचे आहे. या आरोपांनंतर आंध्र प्रदेशाच्या राजकारणात खळबळ उडालीच शिवाय देशातील राजकारणही ढवळून निघाले. यानंतर संपूर्ण देशाचे लक्ष CALF लॅब च्या अहवालाकडे वेधले गेले. CALF लॅब च्या अहवालात बालाजींच्या प्रसादच्या लाडवांचा नमुना फेल झाला होता. (Tirupati Balaji Temple)

देशभरातील अन्नपदार्थांची चाचणी करणारी CALF लॅब ही अत्यंत विश्वासार्ह संस्था आहे. खाद्यपदार्थांची गुणवत्ता राखण्यासाठी देशात कडक सुरक्षा मानके आहेत. भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणच्या मानकांनुसार या प्रयोगशाळा काम करतात. यामध्ये जनतेच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी ठिकठाकाणचे अन्न आणि ते तयार करण्यासाठीची साधन सामुग्रीचे नमुते तपासले जातात. अन्नातील भेसळीबाबतची मोठे प्रकरण समोर आले की ती NDDB CALF या प्रयोगशाळेत पाठवली जातात. त्यातील अहवालावर संपूर्ण देश विश्वास ठेवतो. याच CALF लॅबमध्ये तिरुपती बालाजीमधील लाडवांचीही तपासणी करण्यात आल्यावर त्यात प्राण्यांची चरबी आढळून आली आहे. CALF लॅबमध्ये दूध, तूप, लोणी, चीज, फळे, भाज्या आणि पाणी यांपासून प्रत्येक खाद्यपदार्थाची चाचणी केली जाते. (Tirupati Balaji Temple)

नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्डने 2009 मध्ये आणंद, गुजरात येथे CALF लॅबची स्थापना केली. CALF चा अर्थ वासरू आहे. जशी गाय आपल्या वासराची काळजी घेते, तशीच ही प्रयोगशाळा लोकांच्या आरोग्याची काळजी घेते हे यावरुन प्रतित होते. सुरुवातीला या लॅबमध्ये फक्त दूध आणि दुग्धजन्य पदार्थांची चाचणी आणि संशोधन केले जात असे. मात्र अलिकडे या लॅबचे आधुनिकीकरण झाले. त्यामुळे यात आता फळे, भाज्या, चरबी, तेल, मध, मीठ, साखर आणि अगदी पाण्याची चाचणी होऊ लागली आहे. तिरुपतीच्या लाडवांमधील चरबीचा मुद्दा समोर आल्यावर कर्नाटक सरकारने हिंदू धार्मिक संस्था आणि धर्मादाय देणगी विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या मंदिरांना प्रसादाची गुणवत्ता राखण्याचे निर्देश दिले आहेत. अशात मंदिरांना फक्त ‘कर्नाटक मिल्क फेडरेशन’चे नंदिनी ब्रँडचे तूप वापरण्यास सांगितले आहे. हेच तूप 50 वर्ष तिरुपती बालाजीच्या प्रसादात वापरण्यात येत होते. (Tirupati Balaji Temple)

मात्र अचानक ते का थांबले याची चर्चा सुरु झाली. गेली 5 दशके कर्नाटक सहकारी दूध महासंघ, तिरुपती ट्रस्टला शुद्ध देशी तूप पुरवत होते. पण जुलै 2023 मध्ये, कर्नाटक सहकरी दूध महासंघानं दुधाच्या दरात वाढ केली. परिणामी तूपाचेही दर वाढले. हे दर सर्वांना लागू होते. तिरुपती बालाजी संस्थानाने कमी दरानेच तुपाची मागणी केली आणि कर्नाटक सहकारी दूध महासंघायनं यासाठी विरोध केला. त्यामुळे 50 वर्षापासूनचे नंदिनी तूप आणि तिरुपती बालाजी प्रसादमचे नाते तुटले. तत्कालीन जगन मोहन रेड्डी सरकारने केएमएफचा करार संपुष्टात आणल्याची माहिती आहे. त्यानंतर सर्वात कमी बोली लावणाऱ्या पाच कंपन्यांच्या तुपाची निविदा काढण्यात आली. नवीन कंपन्यांच्या तुपाबाबत तक्रारी आल्या, पण त्याकडे दुर्लक्ष केलेच शिवाय राजकीय दबाबही मोठा होता. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये यावरून मोठा राजकीय वादही निर्माण झाला होता. ऑगस्ट 2023 मध्ये केएमएफचे अध्यक्ष भीमा नाईक यांनी मंदिर ट्रस्ट कमी दर्जाचे तूप खरेदी करत असल्याचा आरोप केला होता. (Tirupati Balaji Temple)

==============

हे देखील वाचा : तिरूपती मंदिराच्या प्रसादात वापरली जात होती प्राण्यांची चरबी ?

===============

तेव्हा तिरुमला तिरुपती देवस्थानम ट्रस्टचे तत्कालीन अधिकारी ए.व्ही. धर्मा रेड्डी यांनी हे आरोप फेटाळले होते आणि ई-निविदा प्रक्रियेचा हवाला दिला होता. तिरुपती बालाजी मंदिराचे ट्रस्ट दरवर्षी 5 लाख किलो तूप खरेदी करते. दररोज 1 ते 1.5 लाख लाडू तयार केले जातात. जुलैमध्ये या तुपाबाबत तक्रारी वाढू लागल्यावर चंद्राबाबू नायडू सरकारने 29 ऑगस्ट रोजी पुन्हा केएमएफला नंदिनी तूप पुरवण्याचे आदेश दिले. आता बालाजीचे प्रसादाचे लाडू तयार होत आहेत, ते नंदिनी तुपामध्ये तयार होत आहेत. मात्र याच लाडवांवरुन राजकीय, धार्मिक क्षेत्रात मोठे वादळ उठले आहे. (Tirupati Balaji Temple)

सई बने


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.