कोलकत्ता येथील दुर्गा उत्सव देश-विदेशात प्रसिद्ध आहे. या दुर्गा उत्सवाच्या काळात या शहरात करोडोंची उलाढाल होते. येथील कालीमातेचे दर्शन घेण्यासाठी आणि दुर्गा मातेचे भव्य मंडप बघण्यासाठी भाविकांची गर्दी होते. या नवरात्रोत्सवाच्या काळात कोलकत्ता शहर झोपत नाही, असे म्हणतात. कारण दिवसरात्र येथील भव्य मंडप बघण्यासाठी भाविकांची गर्दी होते. शिवाय कोलकत्याच्या हुगळी नदीकाठावर असलेल्या काली मंदिरातही भाविकांची मोठी गर्दी होते. भव्य रुप असलेली कालीमाता या नवरात्रोत्सवाच्या दिवसात अधिक तेजस्वी दिसते, असे भाविक सांगतात. मातेचे हे तेजस्वी रुप डोळ्यात साठवण्यासाठी भाविक गर्दी करतात. या मंदिरात देवीचे दर्शन घेण्यासाठी भाविक चार ते पाच तासही रांगेत उभे राहतात. या मंदिरातील ही आई भवतारिणीची मूर्ती स्थापित आहे. तिलाच माता कालीचे रूप मानले जाते. या मातेचे दर्शन घेतल्याने भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात असा विश्वास भाविकांमध्ये आहे.(Shaktipeeth)
कोलकत्यातील दुर्गा उत्सव जगप्रसिद्ध आहे. शिवाय येथील काली मातेचे मंदिर हे शक्तीपीठ म्हणून ओळखले जाते. या मंदिराला कालीघाट काली मंदिर असेही म्हणतात. हे भारतातील 51 शक्तीपीठांपैकी एक आहे. भारतातील सर्वात भव्य कालीमाता मंदिर म्हणून या मंदिराचा उल्लेख करण्यात येतो. या मंदिरात देवी कालीच्या उग्र रूपाची मूर्ती स्थापित आहे. या मूर्तीमध्ये देवी कालीने भगवान शंकराच्या छातीवर पाय ठेवलेले आहेत. कालीमातेच्या गळ्यात नरमुंडोची माळ, हातात कुऱ्हाड आणि काही नरमुंडो, काही नरमुंडो कमरेला बांधलेले आहेत. देवीची मुर्ती क्रोधीत आहे, त्यामुळे देवीची जीभ बाहेर आहे आणि रक्ताचे काही थेंबही जिभेतून टपकत आहेत. या देवीच्या मुर्तीची जीभ सोन्याची आहे. काली मातेची ही मूर्ती अप्रतिम आहे. मातेचे हे भव्य रुप बघत रहावे असेच आहे. आत्माराम ब्रह्मचारी आणि ब्रह्मानंद गिरी या दोन संतांनी ही मुर्ती तयार केल्याचे सांगण्यात येते. देवीची मुर्ती चांदीची असून देवीचे चार सोनेरी हात आणि देवीची जीभही सोन्याची आहे. (Shaktipeeth)
देवीचे हे रौद्र रुप असुरांचा संहार करण्यासाठी आल्याचे सांगण्यात येते. असूरांचा संहार केल्यावरही देवाचा राग शांत झाला नाही. देवी अशीच क्रोधीत राहीली तर सृष्टीचा नाश होईल, अशी भीती देवांना वाटू लागली. त्यामुळे त्यांनी भगवान शंकराची आराधना केली आणि देवीचा क्रोध शांत करण्याची विनंती केली. त्यामुळे देवीचा राग शांत करण्यासाठी भगवान शिव देवीच्या मार्गात आले. देवीने रागाच्या भरात भगवान शंकराच्या छातीवर पाऊल ठेवले. भगवान शंकराचा स्पर्श होताच, देवीला जाणीव झाली. तिने शंकरांना ओळखले आणि देवीचा राग शांत झाला.(Shaktipeeth)
काही पौराणिक कथांनुसार या भागात देवी सतीच्या पायाची बोटे पडली होती. त्या ठिकाणी माता कालीचे हे शक्तीपीठ (Shaktipeeth) झाल्याचे सांगण्यात येते. माता कालीचे हे मंदिर अतिशय पुरातन आहे. 15 व्या शतकातील पौराणिक ग्रंथांमध्ये माता कालीच्या या मंदिराचा उल्लेख आहे. या कालीघाट मंदिरात गुप्त वंशाची काही नाणीही सापडली आहेत. त्यावरुन गुप्त काळापासून हे मंदिर असल्याचे स्पष्ट होते.
कोलकात्याच्या कालीघाट मंदिराचे सर्वात मोठे वैशिष्ट म्हणजे, हे मंदिर मंदिर हुगळी नदीच्या काठावर होते. याच नदीचा भागीरथी नदी म्हणूनही काही ग्रंथांत उल्लेख आहे. पण कालांतराने भागीरथी नदी मंदिरापासून दूर गेली. आता हे मंदिर आदिगंगा नावाच्या कालव्याच्या काठावर वसले आहे. हा कालवा शेवटी हुगळी नदीला मिळतो. या मंदिरात भव्य असा दुर्गा पुजा उत्सव साजरा होतो. या उत्सवासाठी तमाम कोलकत्याचे निवासी येतातच शिवाय देशाच्या कानाकोप-यात राहणारे कोलकत्याचे नागरिकही आवर्जून उपस्थित राहतात. परदेशी नागरिक आणि परदेशी निवास करणारे कोलकत्याचे नागरिकही माता दुर्गेच्या या उत्सवाला आपल्या घरी येतात. विशेषतः काली मातेच्या मंदिरात अष्टमीला मोठा होम हवन होतो. या हवनाला नमस्कार करण्यासाठी आणि माता कालीचा आशीर्वाद घेण्यासाठी भाविकांची गर्दी होते. (Shaktipeeth)
=========
हे देखील वाचा : पांडवांनी स्थापन केलेले ‘हे’ माता मंदिर
=========
हे प्राचीन मंदिर वास्तुकलेसाठीही ओळखले जाते. या मंदिरात एक संग्रहालय देखील आहे ज्यामध्ये देवी कालीचा इतिहास आणि पौराणिक कथांशी संबंधित अनेक पौराणिक ग्रंथ पहावयास मिळतात. मंदिर पहाटेपासून संध्याकाळपर्यंत दर्शनासाठी खुले असते. नवरात्रीनिमित्त मंदिराची फुलांनी आणि विद्युत रोषणाईनं सजावट होते. 25 एकरात पसरलेल्या या मंदिरात सध्या देशभरातून आलेल्या हजारो भाविकांची गर्दी झालेली आहे.
सई बने