महाराष्ट्रातील संभाजीनगर जिल्ह्यात असलेल्या अजिंठा लेणी ही जगप्रसिद्ध आहेत. या लेण्यांमुळे महाराष्ट्राचे नाव जगभर झाले आहे. पण अशीच लेणी मध्यप्रदेशातही आहेत, याची माहिती अद्यापही फारशी नाही. मध्यप्रदेशमधील मंदसौर जिल्ह्यातील धर्मराजेश्वर हे मंदिर अजिंठा लेण्यांसारखेच अदभूत आहे. हा संपूर्ण मंदिराचा परिसर मोनोलिथिक नावाच्या खडकापासून कोरलेला आहे. हे अनोखे मंदिर (Temple) 8 व्या शतकातील वास्तुशिल्पाचा चमत्कार म्हणून ओळखले जाते. शिवाय मध्य प्रदेशचे अजिंठा – एलोरा अशीही या मंदिराची ओळख आहे. या भव्य मंदिरात आजही सूर्यांची पहिली किरणं भगवान शंकराच्या चरणाशी लीन होतात. या किरणांचा हा उत्सव पहाण्यासाठी स्थानिक मंदिरात पहाटेच्या पूजेच्यावेळी गर्दी करतात.
भारताचे ह्दय म्हणून मध्यप्रदेशची ओळख आहे. मध्यप्रदेशमध्ये अनेक पुरातन मंदिरे (Temple) आहेत. त्यात मंदसौर येथील धर्मराजेश्वर मंदिर आणि धमनार लेणी हा बहुमोल असा ऐतिहासिक वारसा लाभला आहे. मंदसौर जिल्हा पशुपतीनाथ मंदिर, शिवना नदी, चंबळ नदी आणि गांधी सागर धरणासाठी जगप्रसिद्ध आहे. त्याच मंदसौर जिल्ह्यातील स्थापत्यशास्त्राचा अदभूत नमुना असलेल्या धर्मराजेश्वर मंदिराचा इतिहास नक्कीच जाणण्यासारखा आहे. या मंदिराची आणि धमनार लेण्यांची तुलना अजिंठा लेण्यांबरोबर केली जाते. अजिंठा लेण्यांमधील कैलास मंदिरांसारखेच हे धर्मराजेश्वर मंदिरही कसे बांधले असेल हे कोडे अद्यापही उलगडले नाही. हे मंदिरही आधी कळसापासून कोरण्यास सुरु केले, असावे असा कयास अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. कैलास मंदिर हे मोनोलिथ शैलीत बांधलेले आहे. त्याचप्रमाणे बांधलेल्या धर्मराजेश्वर मंदिराला एका भव्य दगडातून कोरण्यात आले आहे. धर्मराजेश्वर मंदिर अतिशय विशाल आहे. हे मंदिर 54 मीटर लांब, 20 मीटर रुंद आणि 9 मीटर खोल खडकात कोरलेले आहे. मंदिरात द्वार-मंडप, गर्भगृह आणि शिखर हे अतिशय भव्य आहेत. या मंदिरात महामंडपाची रचना कोरलेली असून ती पिरॅमिडच्या आकाराची आहे.
या मंदिराबाबत अनेक आख्यायिका आहेत. एका पौराणिक कथेनुसार पांडवांनी वनवासाच्या काळात हे भव्य मंदिर (Temple) उभारले. हे मंदिर भीमानं कोरलं असल्याची कथा आहे. तर काही वास्तुतज्ञ आणि इतिहासकारांच्या मते, हे मंदिर सातव्या आणि आठव्या शतकाच्या आसपास प्रतिहार राजवंशाच्या काळात बांधले गेले. ब्राह्मी लिपीतील एक शिलालेख येथे प्रवेशद्वाराजवळ कोरलेला आहे. काही अभ्यासकांच्या मतानुसार प्रथम हे मंदिर भगवान विष्णूला समर्पित होते विष्णूची एक भव्य मूर्ती गर्भगृहात आहे. त्यानंतर काही काळानं मंदिरात भगवान शंकराची पिंडी स्थापन करण्यात आली.
मंदसौरच्या शामगड परिसरातील या धर्मराजेश्वर मंदिराचे (Temple) वैशिष्ट्य म्हणजे आजही सूर्य उगवताच सूर्याची पहिली किरण गर्भगृहात पोहोचून महादेवाला वंदन करतात. स्थानिकांसाठी हा किरणोत्सव अतिशय महत्त्वाचा समजला जातो. स्थानिकांच्या मते या मंदिराचे संपूर्ण कोरीव काम पांडवांनी केलेले आहे. पांडवांनी वनवासात हे मंदिर बांधले होते. युधिष्ठिराला धर्मराजा म्हटले जाते, त्याच्या नावावरुनच या मंदिराचे नाव धर्मराजेश्वर पडले असे मानले जाते. या परिसरात बौद्ध स्तूप लेणी आणि कलाकृती देखील आहेत. त्या आठव्या शतकातील असल्याचेही सांगितले जाते. या संपूर्ण मंदिरात एकही सांधा नसून ते एका पोकळ खडकात कोरले गेले आहे. या मंदिराचा सर्वात वरचा भाग, शिखर प्रथम बांधला गेला, नंतर पाया तयार झाला. चांदवासा गावाजवळील एका छोट्याशा टेकडीवर उभारलेले धर्मराजेश्वर मंदिर अनेक कारणांमुळे अनोखे ठरते. या मंदिरात (Temple) जाण्यासाठी नऊ मीटर जमिनीखाली जावे लागते. मुख्य मंदिराभोवती सात छोटी मंदिरे आहेत. मंदिराच्या खाली आणि आजूबाजूला गुहा आहेत. ज्यामध्ये बुद्धाच्या वेगवेगळ्या मुद्रांमधील मूर्ती आजही जैसे थे स्थितीत आहेत. मंदिरात जाण्यासाठी डोंगरातून 250 फूट लांबीचा रस्ता कापण्यात आला आहे. मुख्य मंदिराच्या गर्भगृहात शिवलिंग असून त्याच्या कोनाड्यात चतुर्भुज भगवान विष्णूची मूर्ती आहे. इतर लहान मंदिरांमध्ये वराह, दशावतार, शेषशायी विष्णू आणि पंचमहादेवी आदी मूर्तीही येथे पुरातन काळापासून आहेत. मंदिराच्या आवारात पिण्याच्या पाण्यासाठी एक छोटी विहीरही आहे. ही विहिर पांडवांनी खोदली असल्याची भावना मंदिरात (Temple) येणा-या भक्तांची आहे. या विहिरीतील पाणी अतिशय गोड असून मंदिरात येणारे भाविक हे पाणी तिर्थ म्हणून घरी घेऊन जातात.
==========
हे देखील वाचा : हैदराबाद मधील बालाजी मंदिराभोवती 11 फेऱ्या मारल्यानंतर मिळतो US वीजा?
==========
हा सर्व परिसर अतिशय रमणीय आहे. या धर्मराजेश्वर मंदिरात (Temple) श्रावण महिन्यात भगवना शंकराचा उत्सव साजरा केला जातो. त्यासाठी शाही मिरवणूक काढण्यात येते. यावेळी या भागात मोठी जत्रा भरते आणि लाखो भक्तांसाठी भंडा-याचे आयोजन करण्यात येते. दररोज सकाळी भगवान शंकराची श्रृंगार आणि महाआरती केली जाते. या सोहळ्यासाठी देशभरातील शिवभक्तांची गर्दी होते.
सई बने