या गावातच श्री गणेशाने महाभारत लिहिलं, या गावातून पांडव स्वर्गाकडे गेले. याचं गावात लुप्त झालेल्या सरस्वती नदीचा उगम होतो. भारतातलं सर्वात शेवटचं गाव हे गाव म्हणजे उत्तराखंड मधलं माणा गाव! जिथे अनके पौराणिक रहस्य दडलेली आहेत. काय आहे या गावाचा इतिहास? आणि तिथल्या रंजक गोष्टी हे सगळं जाणून घेऊ. (The Story of Mana Village)
तर, माना गाव आहे उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यात आहे, हे गाव भारत-तिबेट सीमेजवळ आहे. म्हणूनच याला कधीकाळी “भारताचं शेवटचं गाव” म्हणायचे. पण आता भारताने तिबेट सीमेपर्यंत रस्ते बांधलेत, त्यामुळे माना आता “भारताचं पहिलं गाव” म्हणूनही ओळखलं जातं. पण हे गाव फक्त त्याच्या स्थानामुळे नाही, तर त्याच्या पौराणिक कथांमुळे आणि रहस्यमयी गोष्टींमुळे सगळ्यांचं लक्ष वेधतं. सर्वात पहिली गोष्ट म्हणजे या गावाचा संबंध थेट महाभारताशी आहे!
असं म्हणतात की, माना गावातूनच पांडव स्वर्गाकडे गेले. याच गावात एक दगडी पूल आहे, ज्याला “भीम पूल” म्हणतात. आख्यायिकेनुसार, पांडव स्वर्गारोहणासाठी निघाले तेव्हा त्यांच्या मार्गात एक नदी आली. नदीने त्यांना रस्ता दिला नाही, तेव्हा भीमाने दोन मोठे दगड उचलून नदीवर ठेवले आणि पुढे जाण्यासाठी रास्ता तयार केला.याच रस्त्यावरून ते स्वर्गात गेले. हा पूल आजही इथे आहे ज्याला भीम पूल असं नाव पडलं आहे, या पूलावर २० फूट उंच पायाच्या आकाराची खूणही आहे, जी भीमाचं पाऊल म्हणून ओळखली जाते. (The Story of Mana Village)
आता आणखी एक रंजक गोष्ट माना गावात आहे एक “व्यास गुहा”. ही तीच जागा आहे, जिथे महर्षी व्यासांनी चार वेदांचं संकलन केलं आणि गणपती बाप्पाने ते लिहून काढलं, असं मानलं जातं. या गुहेची रचना पाहिली तर तुम्हाला वाटेल की, जणू काही दगडाची पानं एकमेकांवर रचून ठेवली आहेत. यामागेही एक कथा आहे. असं म्हणतात की, महर्षी व्यासांनी श्री गणेशाला काही खास श्लोक लिहायला सांगितले, पण ते श्लोक महाकाव्यात सामील झाले नाहीत. म्हणून त्यांनी त्या पानांचं दगडात रूपांतर केलं. हीच रचना आज “व्यास पोथी” म्हणून प्रसिद्ध आहे. पण त्या पानांवर नेमकं काय लिहिलं होतं? हे आजही एक रहस्य आहे.
==============
हे देखील वाचा :Blaise Metreweli : ब्रिटनची गुप्तचर यंत्रणा कुठल्या महिलेच्या हातात !
==============
व्यास गुहेजवळच आणखी एक गुहा आहे “गणेश गुहा”. असं सांगितलं जातं की, जेव्हा महर्षी व्यास श्री गणेशाला महाभारत लिहायला सांगत होते तेव्हा ते इथेच बसून महाभारत लिहीत होते. पण तेव्हा सरस्वती नदीचा प्रवाह इतका जोरात होता की, त्याचा आवाज गणपतीला त्रास द्यायचा. बाप्पाने नदीला आवाज कमी करायला सांगितलं, पण नदीने ऐकलं नाही. शेवटी चिडून बाप्पाने नदीला शाप दिला की, तू लुप्त होशील! आणि तेव्हापासून सरस्वती नदी इथे नाहीशी झाली, या आख्यायिकांमध्ये कितपत तथ्य आहे माहित नाही पण इथे असलेला हा भीम पूल आणि व्यास गुहा त्याकाळच्या इतिहासाची साक्ष देतात एवढं मात्र नक्की. (The Story of Mana Village)
या गावातली आणखी एक मजेशीर गोष्ट म्हणजे इथली दुकानं! काही दुकानांवर “भारतातलं शेवटचं चहाचं दुकान” किंवा “शेवटचं मिठाईचं दुकान” अशी पाटी लावलेली दिसते. पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी ही युक्ती आहे, पण त्यामुळे गावाला एक वेगळीच ओळख मिळाली आहे. तुम्हाला भारताच्या शेवटच्या गावाबद्दल सॉरी पहिल्या गावाबद्दलची ही माहिती कशी वाटली आम्हाला कोममेंट्समध्ये नक्की सांगा!