Home » Odisha : भगवान जगन्नाथांच्या ध्वजाचे रहस्य !

Odisha : भगवान जगन्नाथांच्या ध्वजाचे रहस्य !

by Team Gajawaja
0 comment
Odisha
Share

ओडिशा राज्यातील पुरीमध्ये भगवान जगन्नाथांच्या रथयात्रेचा रथ सजवण्यात येत आहे. या यात्रेसाठी पुरीमध्ये दाखल झालेले भाविक पहिल्यांदा दर्शन घेतात, ते जगन्नाथ मंदिरावरील ध्वजाचे. श्री जगन्नाथ मंदिराबाबत अनेक रहस्य सांगण्यात येतात, त्यातील एक रहस्य या ध्वजाचेही आहे. हा ध्वज दररोज बदलण्यात येतो. हा सोहळा मंदिराच्या आवारात उभे राहून हजारो भाविक बघत असतात. त्यातही हा ध्वज हवेच्या विरुद्ध दिशेने फडकत असतो. जगन्नाथ मंदिरावरील ध्वजाचे हे रहस्य उलगडण्याचा प्रयत्न अनेक शास्त्रज्ञांनीही केला आहे, मात्र तेही अपयशी ठरले आहेत. अशावेळी हा ध्वज हवेच्या विरुद्ध दिशेनं कसा फडकतो हे एक कोडच बनून राहिलं आहे.

ओडिशातील पुरी येथील जगन्नाथ मंदिराशी संबंधीत रहस्यांची एक मोठी मालिकाच आहे. या मालिकेची सुरुवात या मंदिराच्या ध्वजापासून होते. अनेक मंदिरांवरील ध्वज हा ठराविक काळानंतर बदलला जातो. मात्र जगन्नाथ मंदिरावरील ध्वज रोज बदलण्यात येतो. यामागेही एक कथा सांगितली जाते. ज्या दिवशी मंदिरावरील ध्वज बदलला जाणार नाही, त्या दिवशी मंदिराचे दरवाजे आपोआप बंद होणार असल्याचे सांगितले जाते. त्यानंतर मंदिर 18 वर्षांसाठी बंद रहाणार आहे. यामागे जी स्थानिक कथा सांगितली जाते, त्यानुसार एकदा भगवान जगन्नाथ मंदिराच्या पुजाऱ्याच्या स्वप्नात आले आणि त्यांना मंदिराचा ध्वज जुना आणि फाटलेला असल्याचे पुजा-यांना सांगितले. दुस-या दिवशी पुजा-यांनी तो ध्वज बघितला, तेव्हा तो खरोखर जुना वाटत होता.

त्यानंतर पुजा-यांनी ध्वज बदलला. तेव्हापासून मंदिराचा ध्वज रोज बदलण्याची प्रथा सुरु झाली. याशिवाय, जगन्नाथ मंदिरावर रोज नवीन ध्वज फडकवणे हे भगवान जगन्नाथांप्रती असलेला आदर आणि भक्तीचे प्रतीक मानले जाते. शिवाय मंदिरावर रोज नवा ध्वज लावला जातो, त्यातून सकारात्मक उर्जा सर्वत्र रहाते, अशीही भावना आहे. जुना ध्वज नकारात्मक उर्जा शोषून घेतो, आणि त्याच्या जागी नवा ध्वज लावला जातो. या रोज बदलण्यात येणा-या ध्वजामुळेच मंदिरात येणा-या भाविकांना कायम मंदिराभोवती सकारात्मक उर्जा असल्याची जाणीव होते. जगन्नाथ मंदिरावरील ध्वज ज्या कापडापासून तयार होतो, ते कापडही खास असते. हा ध्वज रेशमाच्या कापडापासून तयार होतो. त्याला “पतितपावन बाण” असे म्हणतात. म्हणजेच “पतितांना शुद्ध करणारा” असा होतो. या ध्वजाचे दर्शन झाले तरी भाविक स्वतःला धन्य समजतात.

भगवान जगन्नाथांच्या दर्शनासाठी येणारे भाविक पहिल्यांदा या ध्वजाला वंदन करतात, आणि मगच मंदिरात प्रवेश करतात. मंदिरावर जो ध्वज लावण्यात येतो, त्याचा रंग आणि रचना मंदिरातील रीतिरिवाज आणि परंपरांनुसार निश्चित केली जाते. हा ध्वज मंदिराच्या शिखरावर असलेल्या सुदर्शन चक्राला बांधण्यात येतो. ध्वज रोज बदलण्याची एक प्रक्रिया आहे. रोज सकाळी नवा ध्वज तयार झाल्यावर त्याची पहिल्यांदा पूजा केली जाते. मग एक पुजारी मंदिराच्या शिखरावर चढतो आणि जुना ध्वज काढून नवीन फडकवतो. ही सगळी प्रक्रिया सहसा सकाळी लवकर केली जाते. अलिकडील काही वर्षात या ध्वज बदलण्याच्या प्रक्रियेची लोकप्रियता वाढल्यामुळे भगवान जगन्नाथांचे हजारो भक्त यावेळी मंदिर परिसरात उपस्थित असतात आणि भगवान जगन्नाथांचा जयजयकार करीत असतात. ध्वज बदलण्याचा हा सोहळा “नीलचक्र” शी जोडला गेला आहे. त्यानुसारच दररोज वेगवेगळ्या रंगाचा ध्वज फडकवला जातो. ज्या सुदर्शन चक्रावर हा ध्वज लावला जातो, त्याचे वजन सुमारे 1000 किलो आहे.

===========

हे देखील वाचा : Odisha : भगवान जगन्नाथाचे रहस्यमयी स्वयंपाकघर !

Jagannath Rathyatra : कधी आहे जग्गनाथ रथयात्रा? जाणून घ्या यात्रेची संपूर्ण माहिती

===========

या ध्वजाची आणि मंदिराच्या कळसाची सावली कधीही जमिनीवर पडत नाही. ध्वज लावल्यावर लगेच तो वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने फडकायला लागतो, यावेळी उपस्थित भाविक, भगवान जगन्नाथांच्या नामघोषात रंगून जातात. या ध्वजासोबत भविष्यातील अनेक गोष्टींची सांगडही घातली जाते. गेल्या काही दिवसांपूर्वी जगन्नाथ मंदिरावरील ध्वजासारखे कापड घेऊन मंदिराभोवती फिरणा-या गरुडाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. एरवी या मंदिराभोवती कुठलाही पक्षी दिसत नाही. मात्र गरुड, ध्वजासारखे कापड घेऊन उडतांना पाहून हा भविष्यात येणा-या संकटाची चाहूल असल्याचे काहींनी सांगितले. हा गरुड नंतर त्याच्या चोचीतील कापडासह गायब झाल्यानं या चर्चांना अधिक उधाण आले होते. अर्थात भगवान जगन्नाथांच्या मंदिराबाबत रोज अशा प्रकारच्या रहस्यमयी गोष्टी घडत असल्याचे स्थानिक सांगतात.

सई बने

 

 


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.