अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभेत विविध मुद्द्यांवर भाष्य केले. मुख्यमंत्र्यांनी आघाडी सरकारवर झालेल्या प्रत्येक आरोपांवर उत्तरे दिली. अगदी कोव्हिड घोटाळ्याच्या आरोपापासून ते नवाब मलिकांच्या राजीनाम्याच्या मुद्द्यापर्यंत रोखठोक भूमिका मांडतानाच विरोधकांना जोरदार फटकारेही लगावले. आज मी तळमळीने आणि मनमोकळं बोलणार आहे. मला खोटं बोलता येत नाही, अशी भाषणाची सुरुवात करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी थेट राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या अभिभाषणापासूनच सुरूवात केली. कोपरखळ्या, टोले, चिमटे काढत त्यांनी विरोधकांची पिसे काढली.
====
हे देखील वाचा: प्रताप सरनाईक यांच्यावर ईडीची कारवाई, ११.३५ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त
====
१) राज्याला मद्यराष्ट्र म्हणून बदनाम करू नका
राज्याला मद्यराष्ट्र म्हणून बदनाम करू नका, सर्वातच कमी मद्याची दुकाने महाराष्ट्रात आहेत. उत्तर प्रदेश, कर्नाटक, मध्य प्रदेशात महाराष्ट्रापेक्षा जास्त मद्याची दुकाने आहेत. त्यामुळे महाराष्ट्रला मद्यराष्ट्र म्हणणे खूप मोठी चूक आहे.
२) आता दाऊदच्या नावाने मतं मागणार का?
दाऊद आहे कुठे?आधी रामाच्या नावाने मते मागितली आता दाऊदच्या नावाने मते मागणार का? मग तो दाऊद आहे कुठे हे कुणालाच माहिती नाही. दाऊदला आम्ही फरफडत आणू असे म्हटले होते, ओसामाला मारले तसे दाऊदच्या घरात घुसून त्याला मारा, देशद्रोहाच्या विरोधात आम्ही आहोतच, त्यात दुमत नाही.
३) पहाटेचा प्रयोग यशस्वी झाला असता तर…
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, आम्ही सगळे भ्रष्टाचारी आणि दाऊदची माणसं आहोत असं विरोधक म्हणतायंत. पण पहाटेचा प्रयोग यशस्वी झाला असता तर नवाब मलिक आणि अनिल देशमुख तुमच्या मांडीला मांडी लावून बसले असते.
४) दाऊदला घरात घुसून मारा, दाखवा मर्दपणा
ओबामा यांनी ओसामाच्या नावाने मते मागितली होती का? त्यांनी निवडणुकीत त्याचा उल्लेख केला होता का? पण ते जे टॉवर्स पाडले, देशावर हल्ला आपण बोलतो पण हल्लेखोराचे काय करतो. ओबामाने कोणाची वाट नाही पाहिली, पर्वा नाही केली. पाकिस्तान काय करेल? थेट त्यांचे जवान पाठवले आणि घरात घुसून लादेनला मारलं. याला म्हणतात मर्दपणा. का नाही मारत दाऊदला? उडवा ना, मूळ उखडून काढा. जा घुसा दाऊदच्या घरात आणि त्याला मारा जसे ओबामांनी ओसामाला मारले. याला म्हणतात मर्दपणा. याला म्हणतात हिंमत.
५) मेहबूबा मुफ्तींचा त्यावेळी अफजल गुरूला फाशी देण्यास विरोध
अफजल गुरूला फाशी देण्याची वेळ आली त्यावेळी मेहबुबा मुफ्ती यांनी फाशी देऊ नका असे त्या म्हणाल्या होत्या. मग त्या मुफ्तीसोबत सत्तेत भाजप बसले. तुम्ही मलिकांचा राजीनामा मागतांय आणि तिकडे तुम्ही मुफ्तीसोबत गेलात. मेहबूबा मुफ्तींनी त्यावेळी अपजल गुरूला फाशी देण्यास विरोध केला होता. अशा लोकांसोबत तुम्ही सत्तेचा सारीपाट मांडला होता. बुऱ्हान वाणीला मारल्यानंतर त्या घरी गेल्या होत्या, विचार तेच आहे.
६) मुदस्सिर लांबे फडणवीस यांना हार घालतानाचे फोटो जगजाहीर
मुदस्सिर लांबे फडणवीस यांना हार घालतानाचे फोटो जगजाहीर आहेत. फोटो दाखवून आरोप करणं योग्य नाही. मुदस्सिर लांबेची नियुक्ती माजी मंत्री विनोद तावडे यांनी केली आहे,त्यावेळेस अफजल सरकार होते का? मुख्यमंत्र्यांचा सवाल
७) धारावी वाचवली याचं कौतुक तुम्हाला का नाही?
वाटाघाटी करून आम्ही किंमती कमी करून वस्तू कोविडमध्ये खरेदी केल्या. धारावीत १० बाय १० मध्ये लोक राहतात, कुठलं सोशल डिस्टंसिंग होते? आम्ही धारावी वाचवली याचे कौतुक तुम्हाला का नाही? केंद्रीय पथक म्हणायचे, साहब कुछ भी करो, धारावी बचाव…
८) नवाब मलिाकांचा राजीनामा मागतायत, पण…
“नवाब मलिक हा दाऊदचा माणूस आहे असा त्यांच्यावर आरोप केला जातोय. मग तो पाच वेळी निवडूण येतोय, मंत्री होतोय तरीही केंद्राच्या यंत्रणांना समजले नाही. त्यांना आता समजतंय की तो दाऊदचा माणूस आहे. केंद्राच्या यंत्रणा मग करताये काय?
९) कुटुंबियांना बदनाम करण्याची विकृती
आता एक अत्यंत विकृत पद्धत सुरु आहे. एकमेकांच्या कुंटुंबियांच्या आम्ही जर का तुमच्यासोबत असतो तर तुम्ही आमच्या कुटुंबियांना बदनाम केलं असतं का? ही अत्यंत निच आणि निंदनीय पद्धत, विकृत अशी गोष्ट सुरू आहे. अरे जर मर्द असशील तर मर्दासारखे अंगावर ये, मग बघून घेतो. तुमच्या सत्तेचा दुरुपयोग करुन, संस्थाचा दुरुपयोग करुन या गोष्टी केल्या जातायंत. शिखंडीच्या मागे राहून धाडी टाकायच्या याला मर्दपणा म्हणत नाहीत. तुम्ही जे माझ्या कुटुंबियांला बदनामी करायचे चाळे केले आहेत.
१०) देवेंद्रजी तुम्ही ‘रॉ’मध्ये हवं होतं
देवेंद्रजी तुम्ही रॉ, सीबीआयमध्ये जायला हवंत, तुम्ही ती माहिती त्यांना दिली. त्यांचं काम वेगाने होईल. ईडी आहे की घरगडी आहे तेच समजत नाही.
====
हे देखील वाचा: दिशा सालियन कुटुंबीयांचे राष्ट्रपतीनां पत्र, राणे पिता-पुत्रांवर केली कारवाईची मागणी
====
११) आज अघोषित आणीबाणी सुरू
नितीन गडकरी म्हणाले वाल्याचा वाल्मिकी होतो. आता भाजपने ह्युमन लॉंड्रिग सुरु केलं आहे. पण हे सगळं कुणाला माहिती नाही असं काही समजू नका. हा महाराष्ट्र आहे. इंदिरा गांधींनी आणीबाणीची घोषणा केली होती, आज अघोषित आणीबाणी सुरू आहे.
१२) राज्यपाल हे संवैधानिक पद, त्यांच महत्व विरोधकांना जास्त माहिती
राज्यपाल हे संवैधानिक पद, त्यांच महत्व विरोधकांना जास्त माहिती आहे, विरोधक केवळ तक्रारी करण्यासाठी हक्काने राज्यपालाकडे जातात असं मुख्यमंत्री म्हणाले. एखादी तक्रार राज्यपालांकडे नोंदवतो विरोध तुम्ही करु शकता मात्र त्याला काही सीमा असतात. राज्याच्या संस्कृतीला शोभणारा नव्हता.
१३) कोरोना काळातील शिवभोजन
सरकारच्या कामाच्या प्रगतीचा आढावा घेताना मुख्यमंत्री म्हणाले, कोरोना काळात शिवभोजन सुरू केले. दहा रुपयात जेवण देतो हे मोठं काम आहे. आजपर्यंत ८ कोटीपेक्षा अधिक नागरिकांनी याचा लाभ घेतला, ही अभिमानाची गोष्ट आहे. देशात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आहे. आपण त्यावर ५०० कोटी तरतूद केली आहे. त्यावर लक्ष ठेवा नाही तर त्यातही भ्रष्टाचार दिसेल. काही झाले तरी भ्रष्टाचार झाला असे म्हणायचे आरसा बघितला तरी भ्रष्टाचार करतात. पण आरश्याच्या मॅन्युफॅक्चरिंगमध्ये भ्रष्टाचार होऊ शकतो ना. पण त्यासाठी चेहरा तर आरशात पाहिला पाहिजे.