दररोजच राजकीय वर्तुळात नवनवीन गोष्टी घडताना दिसतात. सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात ‘बाप’ या शब्दावरून गदारोळ झाला असून, एका नवीन वादाला तोंड फुटले आहे. नितेश राणे यांनी केलेल्या एका वक्तव्याचे मोठे पडसाद आता पडताना दिसत आहे. नितेश राणे यांनी केलेल्या एका विधानामुळे महायुतीमध्ये देखील मतभेद निर्माण झाले असून, शिवसेना ठाकरे गटाने नितेश राणे यांच्यावर निशाणा साधला आहे. नितेश यांच्या विधानावरून पोस्टरबाजी देखील पाहायला मिळत आहे. (Devendra Fadnavis)
झाले असे की, भाजपचे नेते नितेश राणे यांनी धाराशिवमध्ये एका कार्यक्रमात बोलताना म्हटले की, “काय करायचे आहे ते करा, आपला बाप सागर बंगल्यावर बसला आहे,” त्यांनी केलेल्या या विधानावरून शिवसेना शिंदे गटाने मंत्रिमंडळ बैठकीत नाराजी व्यक्त केली असल्याची माहिती आहे. एवढेच नाही तर शिंदे गटातील नेत्यांनी नितेश राणे यांच्या विधानाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार देखील केली आहे. हे प्रकरण इथेच नाही थांबले, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांने तर नितेश राणे यांना डिवचणारे बॅनर ठाण्यामध्ये झळकावले आहे. या बॅनरचे फोटो सोशल मीडियावर कमालीचे व्हायरल होताना दिसत आहे. (Marathi News)
ठाकरे गटाचे सहप्रवक्ता तुषार रसाळ यांनी ठाण्यातील मुख्य रस्त्यावर एक भलामोठा बॅनर लावला. “मी तुषार दिलीप रसाळ… दिलीप पंढरीनाथ रसाळ हे माझे जन्मदाता (बाप). देवेंद्र गंगाधर फडणवीस हे माझे बाप नाहीत”, असा मजकूर या बॅनरवर लिहला होता. हा बॅनर राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे. आता या बॅनरवर नारायण राणे, नितेश राणे यांची काय प्रतिक्रिया असेल याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. यासोबतच या बॅनरवरील लक्षवेधी बाब म्हणजे या बॅनरवरती मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा फोटो आहे. ठाण्यातील तिनं हात नका येथे ठाकरे गटाकडून हे बॅनर लावण्यात आलेले आहे. त्याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. (Top Stories)
नितेश राणे यांच्या वक्तव्यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची कानउघडणी केली असल्याचे सांगितले जाते आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे की, “कोणाचाही बाप काढणं चुकीचे आहे, मी संबंधित मंत्र्यांशी चर्चा केली आहे.” सोबतच फडणवीस यांनी नितेश राणेंच्या विधानाचा विपर्यास केला असलयाचे देखील म्हटले आहे. पुढे फडणवीस म्हणाले, “मी देखील संबंधित मंत्र्याशी चर्चा केलेली आहे. त्यांनी स्वत: सांगितलं की माझ्या बोलण्याचा तो अर्थ नव्हता. मी त्यांना सांगितलं, तुमच्या मनात काही अर्थ नसला तरी पर्सेप्शनमध्ये जो अर्थ जातो तो राजकारणात महत्त्वाचा असतो. त्यामुळे अशाप्रकारे बोलणं योग्य नाही. त्यांनीही ते मान्य केलेलं आहे,” (Todays Marathi Headline)
=========
हे देखील वाचा : Trump And Musk : अमेरिकेतील दोन मित्रांचे नाक्यावरचे भांडण !
=========
‘राज्याचे मुख्यमंत्री हे भाजपचे आहेत. कोणीही कितीही ताकद दाखवली. कोणी कितीही इकडे-तिकडे नाचले तरी शेवटी सगळ्यांचा बाप म्हणून भारतीय जनता पार्टीचा मुख्यमंत्री बसलाय हे लक्षात ठेवा’, असं वक्तव्य भाजप मंत्री नितेश राणे यांनी केले होते. तर याआधी तुळजापूरमध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या एकत्र येणार असल्याच्या चर्चांची देखील त्यांनी टिंगल उडवली होती. आम्हाला झोप लागत नाही, एकाकडे २० आमदार आणि एकाकडे शून्य यांची एवढी शक्ती आहे. या शक्तीला आम्ही घाबरलो आहोत. आम्हाला घाम फुटला आहे अशा शब्दात नितेश राणेंनी राज आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्यावर टीका केली होती. (Marathi Latest News)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics