उत्तरकाशी येथील बोगद्याचे काम सुरु असतांना झालेल्या दुर्घटनेत 41 मजूर अडकले गेले आहेत. 16 दिवसांपूर्वी घटलेल्या या घटनेनं अवघा देश हळहळत आहे, सोबतच त्या मजूरांना सुरक्षितरित्या बाहेर काढण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत. देशातीलच नव्हे तर परदेशातीलही अत्यंत आधुनिक यंत्रणा या मजूरांच्या सुरक्षितेतेसाठी प्रयत्न करीत आहेत. मात्र हे प्रयत्न एकीकडे सुरु असतांना दुसरीकडे, बाबा बौखनाग यांचे नाव चर्चेत आले आहे. (Uttarkashi)
या बोगद्याचे काम जेथे सुरु आहे, त्या बोगद्याचे संपूर्ण परिसर बाबा बौखनाग यांच्या प्रभावाखाली येतो. या भागातील स्थानिक बाबा बौखनाग यांची मनोभावे पूजा करतात. त्यांची मोठी यात्राही भरते. मात्र या बांधकामामुळे बाबा बौखनाग यांचा कोप होऊन ही दुर्घटना झाली असल्याची चर्चा आता सुरु झाली आहे.
यासोबत आणखी एक चर्चा म्हणजे, बोगद्याच्या बाहेर भगवान शंकरासारखी आकृती तयार झाली आहे. बोगद्याच्या बाहेर निर्माण झालेल्या या पाण्याच्या आकृतीमुळे बौखनाग बाबांचा कोप आता कमी झाला असून प्रत्यक्ष भगवान शंकर या अडकलेल्या 41 मजूरांच्या रक्षणासाठी आल्याची चर्चा सुरु झाली आहे. परिणामी दुर्घटनस्थळी अनेक स्थानिक या पाण्यापासून तयार झालेल्या आकृतीला वंदन करण्यासाठी येत आहेत. (Uttarkashi)
उत्तरकाशीच्या सिल्कियारा बोगद्यात सुरु असलेल्या बांधकामादरम्यान दुर्घटना घडून 16 दिवस झाले आहेत. यात 41 कामगार अडकले असून त्यांच्या बचाव कार्यात भारतीय सेनाही उतरली आहे. गेल्या 16 दिवसापासून या भागात चोवीस तास मशिन्सद्वारे बोगद्याच्या आत जाण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. मात्र रात्रंदिवस मेहनत करूनही कामगारांना अद्याप बाहेर काढले नाही. आधुनिक यंत्रेही येथे फोल ठरली आहेत.
त्यामुळे हा सगळा बाबा बौखनाग देवतेचा कोप मानत आहेत. या बोगद्याच्या बांधकामामुळे बौखनाग बाबांना राग येऊन ही दुर्घटना झाल्याचा दावा स्थानिकांनी केला आहे. तसेच बौगनाग बाबांच्या नाराजीमुळे बोगद्यात अडकलेल्या कामगारांची सुटका होत नाही. शिवाय या बचाव कार्यात वारंवार अडथळे येत असल्याचे ग्रामस्थांचे मत आहे. जोपर्यंत बाबा बौखनाग यांचे मंदिर पूर्णपणे बांधले जात नाही आणि त्यांची योग्य प्रकारे पूजा होत नाही तोपर्यंत बचाव शक्य होणार नाही, असा दावाही या ग्रामस्थांनी केला आहे. (Uttarkashi)
उत्तरकाशीचा संपूर्ण भाग अनेक देवदेवतांच्या मंदिरांनी भरलेला आहे. उत्तरकाशीच्या रेडिटॉप भागात बाबा बौखनागचे मंदिर आहे. बाबा बौखनाग हे येथील परिसराचे संरक्षक मानले जातात. डोंगराच्या मधोमध बांधलेल्या या मंदिरात दरवर्षी जत्रा भरते. स्थानिक गांवकरी बाबा बौखनाख यांना आपला संरक्षक मानतात. त्यांची मनोभावे पूजा करतात. इथल्या प्रत्येक गावात बाबांचे मंदिर आहे. या गांवातील कुठल्याही घरात शुभकार्य करतांना बाबा बौखनाख यांची पूजा केली जाते. तसेच त्यांची परवानगी घेतल्याशिवाय कुठलेही कार्य करण्यात येत नाही. अशात याच भागात सुरु असलेल्या बोगद्यामुळे बाबा बौखनाथ यांचा कोप झाल्याची भावना स्थानिकांनी व्यक्त केली आहे.
बाबा बौखनाग यांना काही स्थानिक मोठ्या नागाच्या स्वरुपात पुजतात. भगवान श्रीकृष्ण या भागातील सेममुखेम येथे आले होते. त्या सेममुखेम आणि बाबा बौखनाग यांच्या मंदिरात दरवर्षी जत्रा भरते. या मंदिराची बोगद्याच्या बांधकामादरम्यान दुरवस्था झाली. या मंदिराच्या खालूनच बोगदा जात आहे. या मंदिराची पुन्हा बांधणी केल्याशिवाय बोगद्याचे काम यशस्वीरित्या पूर्ण होऊ शकत नसल्याचे आता गांवकरी सांगत आहेत.
============
हे देखील वाचा : ब्रेकअपने बदलले गेले मिथुन चक्रवर्ती यांचे आयुष्य
===========
आता याच बोगद्याच्या बाहेर पाण्यापासून एक आकृती तयार झाली आहे. ही आकृती भगवान शंकराची असल्याचा विश्वास स्थानिकांनी व्यक्त केला आहे. मात्र पाण्याच्या गळतीमुळे असा आकार तयार झाल्याचा दावाही काही लोक करत आहेत. बोगद्याबाहेर बचावकार्य सुरू असताना ही धक्कादायक घटना झाल्यामुळे स्थानिकांमध्ये नव्यानं चर्चा सुरु झाली आहे. (Uttarkashi)
उत्तरकाशीच्या सिल्कयारा बोगद्याच्या बचाव कार्याला आता 16 दिवस झाले असतांना मॅन्युअल ड्रिलिंग केले जात आहे. बोगद्याच्या वर व्हर्टिकल ड्रिलिंग देखील केले जात आहे. त्याचबरोबर बोगद्यात अडकलेल्या लोकांना सिल्क्यरा बोगद्याचे दुसरे टोक असलेल्या बरकोट टोकापासून बाहेर काढण्याचे कामही सुरू आहे. याशिवाय बोगद्याच्या माथ्यावर बोअरिंग सुरू आहे. बोअरिंगचे काम वेगाने सुरू आहे. 200 एमएम पाईप टाकण्यात येत आहे. अशा सर्व परिस्थितीत बाबा बौखनाग आणि भगवान शंकर यांच्या अस्तित्वाची चर्चा परिसरात होत आहे.
सई बने