अंतिम वर्षांच्या परीक्षा ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापासून घेतल्या जातील, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे.31 ऑक्टोबर ते 10 नोव्हेंबर दरम्यान त्याचे निकाल येतील. या परीक्षा कमी मार्काच्या असतील तसंच शक्य झाल्यास घरातून परीक्षा देण्याची मुभा विद्यार्थ्यांना दिली जाण्याची शक्यता आहे, असं उदय सामंत यांनी सांगितलं आहे.
याबाबत मुख्यमंत्री आणि राज्यापालांशी चर्चा करून येत्या 2 दिवसांमध्ये अंतिम निर्णय घेतला जाईल, तसंच काही विद्यापिठांच्या विनंतीनुसार यूजीसीकडे 31 ऑक्टोबरपर्यंतची मुदतवाढ मागितली जाईल, असंही सामंत यांनी स्पष्ट केलं आहे.अंतिम वर्षाच्या परीक्षा पुढे ढकलता येतील, पण सरसकट रद्द करता येणार नाही, परीक्षा घेतल्याशिवाय पदवी देता येणार नाही, असा निर्णय सुप्रीम कोर्टानं दिला आहे.या निर्णयाचा आदर करून महाराष्ट्रातील विद्यापीठांच्या अंतिम वर्षांतील अंतिम सत्रांच्या परीक्षा घेण्याची राज्य सरकारची तयारी आहे, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे.
कोर्टाच्या या निर्णयावर बोलताना सामंत म्हणाले होते, “सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा आम्ही आदर करतो. राज्यातील कोव्हिड-19 चा वाढता प्रादुर्भाव, विद्यार्थी, पालक यांची मानसिकता, कुलगुरू यांच्या सूचना आणि काही शैक्षणिक संघटनांचे निवेदन अशा सर्वांगीण परिस्थितीचा विचार करूनच परिक्षेसंदर्भात राज्य शासनाकडून सुप्रीम कोर्टात बाजू मांडण्यात आली होती.”