Pre Marriage Advice for Son : भारतीय समाजात विवाह ही एक महत्त्वाची संस्था मानली जाते. लग्न म्हणजे केवळ दोन व्यक्तींचा नव्हे, तर दोन कुटुंबांचा मिलाफ मानला जातो. परंतु आजही अनेक कुटुंबांमध्ये लग्नाची जबाबदारी, समजुती, समायोजन याची पूर्ण अपेक्षा फक्त मुलीकडूनच ठेवली जाते. तिच्यावर संस्कार, सासरचं घर सांभाळणं, नवऱ्याला समजून घेणं, त्याच्या सवयी, त्याच्या कुटुंबाशी जुळवून घेणं अशी अनेक जबाबदाऱ्या टाकल्या जातात. पण खरे पाहता, ही जबाबदारी फक्त मुलीची नसून मुलांचीही तेवढीच असते. म्हणूनच लग्नाआधी मुलांनाही काही गोष्टी शिकवणे अत्यंत आवश्यक आहे, जेणेकरून विवाह ही संस्था खर्या अर्थाने यशस्वी होईल.
सर्वप्रथम, मुलांना स्त्रीला समान अधिकार आणि सन्मान देणे शिकवायला हवे. घरात, समाजात, किंवा वैवाहिक आयुष्यात स्त्रीला कमी लेखणे किंवा तिच्या मताला दुय्यम स्थान देणे चुकीचे आहे. पत्नी ही ‘साथीदार’ असते, सेविका नव्हे. तिच्या मताला, स्वप्नांना, गरजांना आणि करिअरला तितकाच मान दिला गेला पाहिजे. हे समजावून घेणे आवश्यक आहे की, स्त्री ही देखील स्वतःची ओळख, स्वाभिमान आणि स्वतंत्र निर्णयक्षमता असलेली व्यक्ती आहे.

Pre Marriage Advice for Son
दुसरे म्हणजे, मुलांना भावनिक समजूतदारी शिकवावी लागते. अनेकदा पुरुषांना लहानपणापासून ‘मुलं रडत नाहीत’, ‘तू मुलगा आहेस, ताठ मानेनं वाग’ असे शिकवले जाते. त्यामुळे ते आपल्या भावना व्यक्त करायला शीकत नाहीत. पण एक यशस्वी नातेसंबंध टिकवण्यासाठी संवाद आणि भावना व्यक्त करणे खूप महत्त्वाचे आहे. नवऱ्याने जर आपल्या पत्नीच्या भावना समजून घेतल्या, तिच्या बोलण्याकडे लक्ष दिले, तर नातं अधिक दृढ होतं.
तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे घरगुती कामांमध्ये सहकार्य करणे. घर हे दोघांचे असते, त्यातले कामसुद्धा दोघांचे असले पाहिजे. लग्नाआधी मुलांना स्वयंपाक, भांडी, कपडे, स्वच्छता याबाबतीत आत्मनिर्भर बनवले पाहिजे. यामुळे त्यांना केवळ वैयक्तिक जीवनातच नव्हे, तर वैवाहिक आयुष्यातही सहजीवन समजून घेता येईल. पत्नीवर सगळी घरची जबाबदारी टाकून मोकळं होणं, हे अन्यायकारक आहे.
===========
हे ही वाचा :
पावसाळ्यात कोरड्या केसांसाठी कोणते हेअर मास्क लावावेत?
केसांच्या तेलकट मूळांमुळे होऊ शकते केसगळती, वाचा कारणे आणि उपाय
=============
तसेच, स्त्रियांच्या मर्यादा समजून घेणे आणि त्यांच्यावर अवाजवी अपेक्षा न ठेवणे हेही महत्त्वाचे आहे. परंपरेच्या नावाखाली, ‘सून’ म्हणून तिनेच सगळे सोसावे, हे विचार बदलायला हवेत. मुलांनी आपल्या आई-वडिलांचे आदर ठेवावा, पण तेवढाच आदर पत्नीच्याही आई-वडिलांना असावा, हे शिकवणं आवश्यक आहे.(Latest Marathi News)
शेवटी, प्रेम, संयम आणि एकमेकांसोबत वाढण्याची मानसिकता ही मुलांनी अंगी बाणवायला हवी. लग्नानंतर संघर्ष, मतभेद हे होणारच, पण त्यातून मार्ग काढण्यासाठी दोघांनीही एकमेकांचा हात धरून चालायला हवे.(Pre Marriage Advice for Son) एकंदरीतच, मुलींना संस्कार शिकवण्याइतकेच, मुलांनाही विवाहपूर्व समज, जबाबदारी आणि माणुसकी शिकवली गेली तरच एक समतोल, सन्मानित आणि टिकाऊ नातं उभं राहू शकतं. समाजाच्या समतोल विकासासाठी ही बाब अत्यंत आवश्यक आहे.