२६ मे २०२५ ची रात्र, जवळपास दहा वाजले असतील. हरियाना, पंचकुलामधल्या सेक्टर २७ ला एका रिकाम्या जागेवर ग्रे कलरची ह्युंदाई ऑरा कार कडेला पार्क केलेली होती. सेक्टर २७ मधला रहिवासी पुनीत राणा आणि त्याचा भाऊ तिथेच जवळपास शतपावली करत होते. चालत असताना त्या दोघांना ही कार दिसली. त्या कारच्या खिडक्यांना टॉवेल लावलेले होते. त्या दोघांना शंका यायला लागली. म्हणून ते कार जवळ गेले. कार ड्रायवरला त्यांनी गाडी सोसायटीच्या बाहेर काढायला सांगितली. यात पुनीतला काहीतरी विचित्र जाणवायला लागलं, म्हणून त्याने ड्रायवरला बाहेर यायला सांगितलं. ड्रायवरने कारचा दरवाजा उघडला तेव्हा त्या दोघांना कार मध्ये ६ माणसं झोपलेली दिसली आणि त्यांनी एकमेकांच्या अंगावर उलट्या केल्या होत्या. तेवढ्यात ड्रायवर म्हणाला, आतमध्ये ६ मृतदेह आहेत आणि मी पण थोड्या वेळाने मरणार आहे.. आता हे नक्की काय प्रकरण आहे आणि या घटनेत पुढे काय घडलं? हे सगळंच जाणून घेऊ. (Panchkula Tragedy News)
पुनीतने लगेच पोलिसांना बोलवलं आणि त्यांना सगळ्यांना हॉस्पिटल मध्ये नेलं. जे ड्रायवर त्यात वाचले होते त्यांचा सुद्धा हॉस्पिटला पोहोचायच्या आधीच मृत्यू झाला. यानंतर पोलिस तपास सुरू झाला आणि पोलिसांना कारमधून दोन पानांची सुसाइड नोट सापडली, त्या सुसाइड नोटमध्ये जे लिहिलं होतं. त्याने या प्रकरणाला वेगळीच दिशा मिळाली आणि २०१८ बुरारी ट्रॅजडीनंतर एका कुटुंबाने एकत्र आत्महत्या केल्याची घटना पुन्हा एकदा समोर आली. बुरारी सुसाइड केस जर आठवत असेल तर एकच कुटुंबातल्या ११ लोकांनी एकाच वेळी आत्महत्या केली. त्या प्रकरणात जे सत्य समोर आलं, त्याने तर अख्खा देश हादरला होता. त्यांना तर असं वाटलं होतं की, एकत्र आत्महत्या केली तर त्यांना मोक्ष मिळेल आणि त्यांचा पुनर्जन्म होईल. (Top Stories)
आता हे पंचकुला प्रकरण सविस्तर पाहू. त्या ड्रायवरचं नाव होतं प्रवीण मित्तल आणि उरलेले सहा जणं म्हणजे त्यांची पत्नी रीना, त्यांचे वडील देशराज, आई विमला आणि त्यांची तीन मुलं – जुळ्या मुली ध्रुविका आणि दलिशा आणि मुलगा हार्दिक. पोलिसांना कारमधून जी दोन पानांची नोट सापडली, ज्यात प्रवीण यांनी लिहिलं होतं की, “मी दिवाळखोर झालो आहे आणि याला मीच जबाबदार आहे. कृपा करून माझ्या सासऱ्यांना त्रास देऊ नका. माझ्या कुटुंबाच्या अंत्यसंस्काराची जबाबदारी माझ्या चुलत भावाकडे द्या.”(Panchkula Tragedy News)
या नोटमधून या गोष्टीचा अंदाज तर लागतो की, हे आत्महत्या प्रकरण आहे आणि मित्तल कुटुंब प्रचंड कर्जाच्या ओझ्याखाली होतं म्हणून त्यांनी आत्महत्या केली असेल. तपासात असं समोर आलं की, त्यांच्यावर जवळपास १५ ते २० कोटी रुपयांचं कर्ज होतं आणि कर्जदारांकडून त्यांना सतत धमक्या मिळत होत्या. म्हणून प्रवीण यांनी आधी आपल्या कुटुंबाला आधी विष दिलं आणि मग स्वतः घेतलं, असा पोलिसांचा अंदाज आहे.
प्रवीण मित्तल यांचा यापूर्वी पंचकुला येथे स्क्रॅप मटेरियलचा बिसनेस होता. २००५ ते २००८ च्या काळात त्यांचा हा बिसनेस चांगला सुरू होता आणि त्यांनी तिथेच फ्लॅट, कार आणि बद्दी इथे एक फॅक्टरी खरेदी केली होती. या बिसनेसमध्ये त्यांचं भरपूर नुकसान झालं, त्यांनी बँकांमधून लोन घेतलं होतं. ते त्यांना फेडता आलं नाही. त्यामुळे त्यांच्या फॅक्टरीवर जप्ती आली आणि त्यांचा फ्लॅट सीज झाला. त्या घटनेनंतर मित्तल कुटुंब कोणालाही न सांगता सगळं सोडून देहरादूनला गेले आणि देहरादूनला त्यांनी टूर अँड ट्रॅव्हल्सचा बिसनेस सुरू केला, तो सुद्धा काही खास चालला नाही. यानंतर त्यांनी टॅक्सी चालवायला सुरुवात केली होती. त्यांच्यावर असलेलं २० करोड इतकं कर्ज त्यांना फेडता आलंच नाही आणि या गोष्टीमुळे प्रवीण यांचं मानसिक खच्चीकरण व्हायला लागलं. काही लोकांचं असंही म्हणणं आलं की, “प्रवीण यांचे नातेवाईक तसे आर्थिक दृष्ट्या चांगले होते. पण त्यांनी मित्तल फॅमिलीला मदत केली नाही, ज्यामुळे त्यांची मानसिक स्थिती खालावली असेल.” (Social News / Updates)
तपासात आणखी एक गोष्ट समोर आली की, २६ मे च्या त्या घटनेआधी मित्तल फॅमिली पंचकुला, बागेश्वर धाम मधल्या धीरेंद्र शास्त्री यांच्या कार्यक्रमाला गेले होते. याच कार्यक्रमासाठी खास पंचकुलामध्ये आले होते आणि कार्यक्रम संपल्यानंतर ते देहरादूनला परत जाणार होते, पण देहरादूनला न जाता त्यांनी सेक्टर २७ मधील रिकाम्या जागेवर कार पार्क केली आणि विष पिऊन आत्महत्या केली.
==================
हे देखील वाचा : Hair Cut Tips : चेहऱ्याच्या आकारानुसार असा करा हेअरकट, खुलेल लूक
===================
या प्रकरणाचा पहिला साक्षीदार पुनीत याने लगेचच पोलिसांना फोन लावला आणि प्रवीण यांना लगेच हॉस्पिटल मध्ये नेलं. पुनीतचं प्रवीण यांच्याशी शेवटचं बोलणं झालं होतं. पुनीत या घटनेवर म्हणाला, “प्रवीण यांना हॉटेल मिळालं नाही, म्हणून ते कारमध्येच झोपणार होते. आत सहा मृतदेह आहेत आणि मी पण थोड्या वेळाने मरणार आहे, असं प्रवीण म्हणाले. कारमधील खिडक्यांना टॉवेल लावलेलं होतं, ज्यामुळे आत काय चाललं आहे, हे बाहेरून कोणाला दिसू नये. कारमधून आढळलेल्या उलट्यांच्या खुणा आणि दुर्गंधीवरून असं दिसलं की, त्या कुटुंबाने विष पिऊन आत्महत्या केली होती.”(Panchkula Tragedy News)
या प्रकरणाचा तपास सुरूच आहे. ही इतकी धक्कादायक घटना होती की, लोकांनी या घटनेची तुलना २०१८ साली झालेल्या बुरारी प्रकरणाशी केली. या प्रकरणात सापडलेल्या सुसाइड नोट वरून ही आत्महत्या कर्जाच्या ओझ्याखाली दबून केली असं तर दिसतंय. मात्र खरं हेच कारण का? कारण ज्या दिवशी त्यांनी आत्महत्या केली होती त्याच दिवशी ते बागेश्वर धाम इथून परतले होते.. म्हणून असाही संशय आहे की, बुरारी केस सारखी अंधश्रद्धेची किनार या प्रकरणाला आहे का? हा अजूनही प्रश्नच आहे.