Home » Nepal : नेपाळची राजेशाहीकडे वाटचाल !

Nepal : नेपाळची राजेशाहीकडे वाटचाल !

by Team Gajawaja
0 comment
Nepal
Share

आपल्या शेजारी असलेल्या नेपाळमध्ये पुन्हा अस्थिरता निर्माण होण्याची चिन्हे आहेत. येथील केपी ओली सरकारच्या विरोधात जनमानसात नाराजी असल्याची चुणूक पुन्हा एकदा पहायला मिळाली आहे. ओली सरकारचा निषेध करत येथील जनतेनं नेपाळचे माजी राजे ज्ञानेंद्र शाह यांचे जोरदार स्वागत केले आहे. नेपाळचे माजी राजे ज्ञानेंद्र शाह पोखरा येथे महिनाभर राहिल्यानंतर काठमांडूला परतले. यावेळी विमानतळावर त्यांच्या समर्थकांचा मोठा जमाव जमला होता. राजे ज्ञानेंद्र त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरताच, राजेशाही समर्थक राष्ट्रीय प्रजातंत्र पक्षाच्या नेत्यांसह शेकडो समर्थकांनी जोरदार घोषणा देत राजांचे स्वागत केले. यावेळी राजे ज्ञानेंद्र यांची एक मिरवणूकच काढण्यात आली. (Nepal)

यात राजे ज्ञानेंद्र यांचे फलक घेतलेले समर्थक मोठ्या प्रमाणात होते. माजी राजे ज्ञानेंद्र यांनी फेब्रुवारी महिन्यात प्रजासत्ताक दिनानिमित्त एक निवेदन जाहीर करत आपल्या समर्थकांचा पाठिंबा मागितला होता. त्यानंतर ते पहिल्यांदाच काठमंडूमध्ये आले आहेत, त्यांचे झालेले हे स्वागत सत्ताधारी पक्षाची काळजी वाढवणारे आहे. या संपूर्ण घटनेनंतर नेपाळचे पंतप्रधान ओली यांनी ज्ञानेंद्र शाह यांना मुख्य प्रवाहाच्या राजकारणात येऊन निवडणूक लढवण्याचे आव्हान दिले आहे. तसेच नेपाळमध्ये राजेशाही परत येण्याची कुठलिही शक्यता नसल्याचे सांगितले आहे. मात्र अशी ग्वाही दिली तरी, ओली या घटनेनंतर धास्तावल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यांनी त्यांचा नियोजीत दौरा अर्धवट सोडून आपल्या पक्षाची बैठक बोलावली आहे. नेपाळमध्ये यापूर्वीही राजेशाहीच्या समर्थनार्थ नागरिकांनी आंदोलन केले आहे. नेपाळचे माजी राजे ज्ञानेंद्र शहा यांनी नेपाळच्या प्रजासत्ताकदिनी जनतेला आवाहन केले होते. यात जनतेचा राजेशाहीसाठी पाठिंबा त्यांनी मागितला होता. याला आरपीपीसह इतर पक्षांनी समर्थन दिले. (International News)

या आवाहनानंतर राजे ज्ञानेंद्र पहिल्यांदाच काठमांडूला आले, तेव्हा त्यांचे भव्य स्वागत झाले. आरपीपी ज्ञानेंद्र शहा यांचे भव्य स्वागत करत मोठी फेरीच काढली. यात, राष्ट्रीय प्रजातंत्र पार्टी-नेपाळ आणि राजेशाही समर्थक संघटनांचे सदस्य सहभागी झाले होते. आरपीपीचे अध्यक्ष राजेंद्र लिंगदेन आणि आरपीपी-नेपाळचे अध्यक्ष कमल थापा यांनी राजांचे स्वागत केल्यावर जमलेल्या समर्थकांनी, ‘आम्हाला आमचा राजा परत हवा आहे’, प्रजासत्ताक व्यवस्था संपवा, राजेशाही पुन्हा आणा, राजा आणि देश आम्हाला आमच्या जीवापेक्षा प्रिय आहेत’ असे फलक झळकवले आणि घोषणाही दिल्या. विमानतळाबाहेर रस्त्याच्या दोन्ही बाजूला ज्ञानेंद्र यांचे छायाचित्र आणि राष्ट्रध्वज घेऊन शेकडो समर्थक हजर होते. ही मिरवणूक चालू असतांना राजे ज्ञानेंद्र त्यांच्या समर्थकांसह राजवाड्यात प्रवेश करणार, अशी अफवाही पसरवण्यात आली. त्यामुळे नेपाळच्या राजघराण्याच्या नारायणहिटी पॅलेस मध्ये मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. (Nepal)

हा नारायणहिटी पॅलेस तोच आहे, जिथे 1 जून 2001 रोजी भीषण हत्याकांड घडले. युवराज दीपेंद्र यांनी राजा बिरेंद्र, राणी ऐश्वर्या आणि राजघराण्यातील नऊ सदस्यांना गोळ्या घालून ठार मारले. राजा, राणी आणि भाऊ-बहिणींसह नऊ जणांना मारल्यानंतर, राजकुमार दीपेंद्रने स्वतःवर गोळी झाडून घेतली. त्यानंतर ते 3 दिवस कोमात होते. तिथे त्यांचा राज्याभिषेकही झाला आणि त्यांना नेपाळचा राजा घोषित करण्यात आले. मात्र त्यांच्या मृत्यूनंतर, त्यांचे चुलत भाऊ ज्ञानेंद्र यांना राजा बनवण्यात आले. आता याच राजवाड्याला म्युझियम करण्यात आले आहे. (International News)

राजे ज्ञानेंद्र या राजवाड्याचा पुन्हा ताबा घेणार अशी अफवा पसरल्यामुळे दंगलविरोधी पोलिस येथे तैनात करण्यात आले होते. मात्र ज्ञानेंद्रच्या मागे येणारे त्यांचे समर्थक ज्ञानेंद्र यांचे वैयक्तिक निवासस्थान असलेल्या निर्मल निवासकडे गेल्याने कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. ज्ञानेंद्र शाह यांचे समर्थक गेल्या काही दिवसांपासून काठमांडू आणि पोखरासह देशाच्या विविध भागात रॅली काढत आहेत आणि सध्याच्या सरकारविरुद्ध घोषणाबाजी करत आहेत. 2008 मध्ये एका जनआंदोलनानंतर रद्द करण्यात आलेली राजेशाही व्यवस्था पुन्हा सुरू करण्याची मागणी ज्ञानेंद्र समर्थक करत आहेत. आता त्याला राजघराण्यातील व्यक्तींचाही पाठिंबा मिळत आहे. नेपाळच्या राजघराण्यातील बॉलीवूड अभिनेत्री मनीषा कोइराला हिनेही इंटरनेट मीडियावरील नेपाळी लोकांना माजी राजाचे स्वागत करण्यासाठी काठमांडू विमानतळावर जमण्याचे आवाहन केले होते. (Nepal)

=============

हे देखील वाचा : Vanuatu : हा वानुआतु नावाचा देश नेमका आहे तरी कुठे..

Wilhelm Rontgen यांनी X-ray चा शोध चुकून लावला होता !

=============

वास्तविक नेपाळमध्ये स्थापनेपासूनच लोकशाही स्थिर राहिलेली नाही. सध्याचे ओली सरकार नेपाळला चीनच्या ताब्यात देण्यासाठी तत्पर आहे. राजेशाहीच्या काळात भारत आणि नेपाळमधील संबंध मैत्रीपूर्ण होते. त्यामुळे नेपाळची जनता पुन्हा राजेशाहीची मागणी करत आहेत. आता माजी राजे ज्ञानेंद्रही सक्रिय झाल्यामुळे सीपीएन-माओवादीचे अध्यक्ष पुष्पकमल दहल प्रचंड यांनीही राजकीय घडामोडींवर चर्चा करण्यासाठी बैठक बोलावली. नेपाळमध्ये कुठल्याही परिस्थितीत राजेशाही परत येणार नाही, असे राजकीय पक्ष सांगत असले तरी येथील जनतेमधील असंतोष कमी करण्यात त्यांना यश आलेले नाही, हे वास्तवही नाकारता येणार नाही. (International News)

सई बने


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.