कुमारी मातांनी जन्माला घातलेल्या आणि समाजानं अनौरस ठरवलेल्या बालकांच्या अनेक कथा आपण वाचलेल्या असतात. पण सलीम-जावेद या जोडीनं ‘त्रिशूल’ चित्रपट लिहिताना अमिताभच्या रुपात उभा केलेला अनौरस पुत्र वेगळ्या वाटेवरचाच होता.
जिसने पच्चीस बरस अपनी माँ को थोडा, थोडा मरते देखा हो, उसे मौत से क्या डर’’ असं म्हणत लहानपणापासूनच गरिबी आणि मजुरीच्या भट्टीत रापलेला अमिताभ (Amitabh Bachchan) आपल्या अनौरस बापाला उध्वस्त करण्याच्या इराद्यानं दिल्ली गाठतो. ‘‘ मै पाच लाख का सौदा करने आया हुँ , और मेरे जेब मी पाच फुटी कौडी भी नही.’’ अशा आत्मविश्वासानं तोपर्यंत विशाल साम्राज्य निर्माण केलेल्या संजीवकुमारशी भिडतो. एक श्रीमंत, यशस्वी, ज्येष्ठ व्यावसायिकाचा रुबाब, घमेंड संजीवकुमारच्या अभिनयातून तंतोतंत झळकते. ‘शोले’च्या ठाकूर नंतर संजीवकुमारची (Sanjeev Kumar) ही उत्तम भूमिका.
आईच्या आग्रहामुळं श्रीमंतीच्या वाटेवर जाण्यासाठी संजीव कुमार गर्भवती प्रेयसी वहिदा रेहमानचा त्याग करतो. संजीवकुमारपासून दूर झालेली वहिदा त्याच्या बाळास जन्म देते आणि बाळाला शरीर आणि मनाने कणखर बनवत ‘ मेरे बर्बादिके जामीन अगर आबाद रहे, मै तुझे दुध ना बख्शुंगी तुझे याद रहे ’ अशी शपथ मुलाला देत प्राण सोडते.
संजीवकुमारचा व्यवसाय, त्याची संपत्ती, त्याचं कुटुंब असं सगळं काही बरबाद करण्याच्या एकमेव उद्देशानं झपाटलेलं विजयकुमार हे व्यक्तिमत्व दुर्दम्य आत्मविश्वासाचं प्रतीक बनून प्रेक्षकांच्या मनावर ठसतं. संजीवकुमारचा मानभंग करणे हा एकमेव उद्देश्य असूनही जेव्हा संजीवकुमारच्या कार्यालयात प्रामाणिकपणे काम करणाऱ्या राखीवर खोटे आरोप होतात, तेव्हा स्वत:चा फायदा न बघता अमिताभ मदत करणाऱ्या खऱ्या फितुराला बखोटीला धरून संजीवकुमारच्या पुढ्यात आणून उभा करतो.
‘जिंदगी मे कुछ बाते फायदे और नुकसान से उपर होती है, लेकीन ये बात कुछ लोग नही जानते’’ असे म्हणून संजीवकुमारला गोंधळात टाकतो. ‘‘ लगता है मैने आपकी किसी दुखती रग पर हात रख दिया है’’ असे म्हणत मानसिकदृष्ट्या अधिक आघात करतो.‘‘ हर वो बात, जो बिझिनेस ना हो, आप नही समज सकते.’’‘त्रिशूल’ (Trishul) चा हा नायक केवळ भेदक शब्दांतून प्रतिस्पर्ध्यास नामोहरम करतो अस नाही, तर अभिव्यक्तीचं अत्यंत धारदार साधन असलेले त्याचे डोळे अनेक प्रसंगात सलीम-जावेदच्या संवादापेक्षाही गहिरा परिणाम साधतात.
‘‘ किताबोमे छपते है चाहत के किस्से…’’ अमिताभवर चित्रित झालं होत आणि सर्वात जास्त तेच गाजलं होत. अत्यंत रुबाबदार कपडे आणि आईनं अंतिम समयी दिलेली माळ गळ्यात घट्ट बांधून फिरणाऱ्या अमिताभच्या झंझावाती अभिनयाच्या प्रवाहात त्यावेळचा प्रेक्षक अक्षरश: वाहून गेला होता. प्रेक्षकांमधील प्रत्येकाचं पडद्यावरील अमिताभशी जणृ व्यक्तिगत नातं जडलं होतं, कुठलाही तर्क त्यांच्या विश्वासाच्या आड येण अशक्यं होत. यश चोप्रांनी अमिताभ आणि प्रेक्षकांमधील हा अत्यंत खासगी अनुबंध जाणला होता.
शब्दांकन – शामल भंडारे.