Home » जहाल नेता ‘लोकमान्य टिळक’

जहाल नेता ‘लोकमान्य टिळक’

by Jyotsna Kulkarni
0 comment
Lokmanya Tilak Jayanti
Share

“स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच” अशी सिंहगर्जना टिळकांनी केली आणि भारतीय जनतेला एक स्वातंत्र्याची एक नवी आशा मिळाली. टिळकांनी दिलेला हा स्वराज्याचा मंत्र सामान्य जनतेमध्ये जाऊन पोहोचला. लोकमान्य टिळक म्हणजे एक महान स्वातंत्र्यसेनानी, उत्कृष्ट आणि परखड वक्ते, समाजसुधारक, आदर्शवादी नेते, हिंदू धर्म, खगोलशास्त्र, संस्कृत आणि गणित या विषयांचे गाढे अभ्यासक. आपल्या महाराष्ट्राचा आणि प्रत्येक मराठी माणसाचा अभिमान होते बाळ गंगाधर टिळक. (Lokmanya Tilak Jayanti)

स्पष्ट विचार, देशहित आचार, जहाल बोली, सेवाभावी गुण असलेल्या लोकमान्य टिळकांची आज १६८ वी जयंती. अतिशय महान आणि मोठे कार्य असणाऱ्या टिळकांबद्दल किती लिहावे, काय लिहावे, सुरुवात कुठून करावी तेच समजत नाही. जवळपास १५० वर्षांपूर्वी त्यांनी मांडलेले विचार आजही लोकांसाठी प्रेरणादायी ठरताना दिसत आहे.

आपल्या लोकांसाठी स्वराज्य मिळवणे आणि त्यांची ब्रिटिशांच्या जाचातून मुक्तता करणे हेच टिळकांचे एकमेव आणि अंतिम उदिष्ट होते. लोकमान्य टिळक हे अतिशय हुशार आणि मुत्सद्दी राजकारणी होते. टिळकांशिवाय भारतीय स्वातंत्र्याची लढाई निव्वळ अपूर्णच. अतिशय विचारपूरक त्यांनी ब्रिटीशांविरोधात शंख फुकले. विविध मार्गांचा अवलंब करून टिळक ब्रिटिशांना शह देण्याचा प्रयत्न करत होते. आज टिळकांच्या जयंतीचे निमित्त साधत जाणून घेऊया त्याचा जाज्वल्य प्रवास.

Lokmanya Tilak Jayanti

लोकमान्य टिळकांचा जन्म २३ जुलै १८५६ मध्ये रत्नागिरीमधील चिपळूण येथे, एका मध्यमवर्गीय आशा चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण कुटुंबात झाला. टिळकांच्या वडिलांचे नाव गंगाधर आणि आईचे नाव पार्वतीबाई होते. गंगाधरपंतांचे टिळक हे तीन मुलींनंतरचे चौथे अपत्य होते. त्यांचे खरे नाव केशव असूनही त्यांना सर्वजण बाळ या नावानेच ओळखत आणि हाक मारत असत. टिळकांचे वडील गंगाधर रामचंद्र टिळक हे प्रसिद्ध शिक्षक आणि संस्कृत पंडित होते. लहानपणापासूनच टिळक अत्यंत हुशार होते. त्यांना गणितामध्ये विशेष रुची होती.

लहानपणापासूनच टिळकांना अन्याय अत्याचार या वाईट गोष्टींबद्दल खूप राग होता. टिळक दहा वर्षाचे असताना गंगाधर टिळकांची पुण्याला बदली झाली. टिळक हे अभ्यासात खूपच हुशार होते. गणित हा त्यांचा आवडता विषय होता. पुण्यात आल्यानंतर टिळकांच्या आयुष्याला मोठी कलाटणी मिळाली. पुण्याला आल्यावर त्यांच्या आईंचे लवकरच निधन झाले. पुढे गंगाधरपंतांनी टिळकांचा विवाह तापीबाईंसोबत लावून दिला. लग्नानंतर त्यांचे नाव बदलून सत्यभामा ठेवण्यात आले. पुढे टिळक सोळा वर्षाचे असताना त्यांच्या वडिलांचे देखील निधन झाले

आई-वडिलांच्या पश्चात टिळकांच्या काकांनी अर्थात गोविंदपंत यांनी त्यांचा सांभाळ केला. गोविंदपंत स्वतः अशिक्षित होते. मात्र तरीही त्यांनी टिळकांना शिक्षणासाठी नेहमीच प्रोत्साहन दिले. टिळक १८७७ मध्ये, गणितामध्ये प्रथम वर्गात उत्तीर्ण झाले. पुढे ते बी.ए. झाले. बी.ए.ची पदवी मिळाल्यावर त्यांनी एल.एल.बी. करण्याचे ठरवले. मुंबईतील सरकारी लॉ महाविद्यालयात त्यांनी एल. एल. बी. चा अभ्यास पूर्ण केला आणि 1878 मध्ये त्यांनी कायद्याची पदवी प्राप्त केली. दोन वेळा प्रयत्न करूनही एम. ए. मात्र त्यांना पूर्ण करता आले नाही.

डेक्कन कॉलेजमध्ये असतांना टिळकांची मैत्री आगरकरांबरोबर झाली. दोघेही राष्ट्रप्रेमाने आणि देशहिताच्या विचारांनी भारलेले होते. शिक्षण संपल्यानंतर लोकमान्य टिळकांनी पुणे येथील एका खासगी शाळेमध्ये गणित आणि इंग्रजी या विषयाचे शिक्षक म्हणून नोकरी पत्करली. मात्र त्यांचे विचार इतर शिक्षक आणि अधिकाऱ्यांशी पटत नव्हते त्यांच्यात मोठ्या प्रमाणावर मतभेद निर्माण होऊ लागले, म्ह्णूनच त्यांनी 1880 मध्ये नोकरी सोडून दिली.

टिळकांनी ब्रिटिशांविरोधात लढा द्यायचा असेल तर सामान्य जनतेने देखील वैचारिक दृष्टीने सुदृढ होणे आवश्यक आहे, हे जाणले आणि वृत्तपत्रांची सुरुवात केली. लोकमान्य टिळक, आगरकर आणि विष्णु शास्त्री चिपळूण यांनी 1881 मध्ये आपल्या काही सहकाऱ्यांच्या मदतीने ‘केसरी’ हे मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र आणि मराठा हे इंग्रजी भाषेतील वृत्तपत्र सुरु केले. स्वदेश, स्वराज्य, बहिष्कार आणि राष्ट्रीय शिक्षा या चार गोष्टींना त्यांनी प्राधान्य दिले.

समाजात परिवर्तन करत लोकांमध्ये जनजागृती करणे आणि इंग्रजांच्या जुलमी राजवटीला प्रखर विरोध हाच या वृत्तपत्रांचा मुख्य हेतू होता. या वृत्तपत्रांमध्ये येणाऱ्या टिळकांच्या अग्रलेखांमुळे त्यांनी अनेकदा तुरुंगवास देखील भोगला. १८८२ च्या शेवटापर्यंत केसरी हे भारतातील सर्वाधिक खप असलेले प्रादेशिक वर्तमानपत्र बनले.

पुढे टिळकांनी राजकारणात प्रवेश केला. 1890 मध्ये बाळ गंगाधर टिळक यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये प्रवेश केला. ब्रिटिशांविरुद्ध लोकांना उकसवण्यासाठी लेख टिळकांनी लिहिले. सोबतच चापेकर बंधूना देखील पाठिंबा दिला.

=======

हे देखील वाचा : जाणून घ्या मंगळसूत्राबद्दलची खास माहिती

======

पुढे ब्रिटिशांनी लोकमान्य टिळकांवर देशद्रोहाचा खटला चालवला. असंतोषाचे जनक अशी पदवी देत टिळकांना 6 वर्षे हद्दपार करण्यात आले. बर्माच्या मांडले तुरूंगात टिळकांना सहा वर्ष पाठविण्यात आले आणि तिथे त्यांनी ‘गीता रहस्य’ हा ग्रंथ लिहिला. टिळकांनी लोकांमध्ये एकतेची भावना निर्माण व्हावी या उद्देशाने सार्वजनिक गणेशोत्सव आणि शिवजयंती उत्सवाला सुरूवात केली. 1885 मध्ये त्यांनी पुणे येथे फर्ग्युसन महाविद्यालय सुरू केले. सोबतच 1916 मध्ये डॉ. अँनी बेझंट यांच्या सहकार्याने ‘होमरूल लीग’ या संघटनेची स्थापना लोकमान्य टिळकांनी केली.

लोकमान्य टिळक हे त्यांच्या कार्याने, कर्तृत्वाने आणि त्यांच्या व्यक्तिमत्त्वाने एवढे मोठे झाले की, त्यांचे नाव महाराष्ट्र नाही तर देशात होऊ लागले. त्यांच्या विचारांनी देशातील लोकं देखील प्रेरित होऊन स्वातंत्र्याच्या या लढ्यात आपले योगदान देऊ लागले. हीच त्यांच्या कामाची पोचपावती होती. लोकमान्य टिळक हे भारतीय इतिहासात एक अविस्मरणीय व्यक्तिमत्त्व आजही आहेत. त्यांच्या कार्यांमुळे भारताच्या स्वातंत्र्यलढ्याला आणि सामाजिक सुधारणांना मोठी गती मिळाली. लोकांनी स्वीकारलेला नेता म्ह्णून त्यांना ‘लोकमान्य’ ही पदवी तर मिळाली सोबतच ‘हिंदू राष्ट्रवादाचे जनक’ म्हणून देखील ते ओळखले जातात. अशा या महान नेत्याचा १ ऑगस्ट १९२० रोजी मृत्यू झाला. (Lokmanya Tilak Jayanti)


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.