ओडिशाच्या जगन्नाथ पुरी येथे होणारी रथयात्रा ही जगन्नाथ भक्तासाठी अदभूत अशीच असते. वर्षभर या यात्रेची प्रतीक्षा केली जाते. अगदी कोरोनाच्या सावटामध्येही जगन्नाथ प्रभूंची ही जगप्रसिद्ध यात्रा पार पडली होती. यावर्षीची ही जगन्नाथ यात्रा 20 जून पासून सुरु होत असून त्यासाठी अवघी जगन्नाथ पुरी सजली आहे. पुरीमध्ये मुख्य सणासारखा या यात्रेचा उत्सव साजरा होतो. या यात्रेसाठी भारतातूनच नाही तर जगभरातून भाविक दाखल होतात. यावर्षीच्या यात्रेसाठीही असेच भाविक पुरीमध्ये यायला सुरुवात झाली असून या रथयात्रेतील प्रभू जगन्नाथांची एक झलक मिळावी, यासाठी हे भाविक आतापासून यात्रामार्गावर गर्दी करत आहेत. या मार्गातील जवळपास सर्वच हॉटेलमध्ये बुकींग फुल झाले असून भाविक अन्य ठिकाणांचा शोध घेत आहेत. (Jagannath Puri)

दरवर्षी आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या दुसऱ्या तिथीला ओडिशामध्ये जगन्नाथ पुरी रथयात्रा सुरू होते. यावर्षी ही रथयात्रा 20 जून 2023 पासून सुरू होणार आहे. ही रथयात्रा शुक्ल पक्षाच्या 11 तारखेला संपणार आहे. या वीस दिवसांच्या कालावधीत या रथयात्रेला लाखो भाविक भेट देतात. अशा सर्व भाविकांना यात्रेला येण्यापूर्वी नियोजन करुन यावे, असे आवाहन करण्यात आले आहे. प्रभू जगन्नाथाच्या रथयात्रेत लाखो भाविक सहभागी होतात. भगवान श्रीकृष्ण, त्यांचा भाऊ बलराम आणि बहीण सुभद्रा यांच्या या रथयात्रेची परंपरा अनेक वर्षापासून जपण्यात येते. या रथयात्रेतील भगवान श्रीकृष्णाचे दर्शन घेतले की, मनुष्य जन्मापासून मुक्ती मिळते, अशी भाविकांची श्रद्धा आहे. अतिशय पावन अशा या यात्रेसंबंधी अशा अनेक भक्तीमय भावना भाविकांच्या मनात आहे. हिंदू धर्मात जगन्नाथ रथयात्रेला खूप महत्त्व आहे. जगन्नाथ रथयात्रेत सहभागी होऊन भगवान जगन्नाथाचे दर्शन घेतल्याने जीवनातील सर्व दुःख दूर होतात अशी लोकांची श्रद्धा आहे. (Jagannath Puri)
या यात्रेत सहभागी होऊन तिन्ही देवतांचा रथ ओढणाऱ्यांना 100 यज्ञाइतके पुण्य मिळते, असे मानले जाते. भगवान जगन्नाथ हे जगन्नाथ मंदिरात विराजमान आहेत, जे विष्णूचे अवतार भगवान कृष्णाचे रूप मानले जाते. दरवर्षी आषाढ शुक्लच्या दुसऱ्या दिवशी, जगन्नाथजी त्यांचा मोठा भाऊ बलराम आणि धाकटी बहीण सुभद्रा यांच्यासह त्यांची मावशी गुंडीचा यांच्या घरी जातात. या दिवशी त्यांना तीन वेगवेगळ्या रथांवर नेले जाते. यानंतर तिघांनाही रथयात्रेद्वारे त्यांच्या मावशीच्या घरी म्हणजेच गुंडीचा मंदिरात नेले जाते. यामागे एक कथा सांगितली जाते, एकदा भगवान श्रीकृष्णाची बहीण सुभद्रा हिने त्याच्यासोबत आणि बलरामासह शहराला भेट देण्याची इच्छा व्यक्त केली, त्यानंतर दोन्ही भाऊ आणि बहीण सुभद्रा शहराच्या भ्रमणासाठी निघाले. शहराच्या दौऱ्यादरम्यान, भगवान जगन्नाथ यांनी मावशी गुंडीचा यांच्या घरी दिली आणि तेथे 7 दिवस विश्रांती घेतली तेव्हापासून आजपर्यंत देवाची भव्य यात्रा काढण्याची परंपरा सुरू आहे. या भाविकांच्या गर्दीचे नियोजन करणे, हे प्रशासनासाठी आव्हानात्मक असते, त्यामुळेच येणा-या भाविकांना आधी काही तयारी करण्याचे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात येत आहे. (Jagannath Puri)
=========
हे देखील वाचा : संक्रांतीनंतर श्रीराम भक्तांसाठी खुशखबर
=========
जगन्नाथ रथयात्रेदरम्यान मंदिराभोवती असलेली बहुतांश सर्वच हॉटेल महिनाभर आधीच बुक हो बहुतांश ठिकाणे फुलून जातात. अशा स्थितीत हॉटेल, आश्रम किंवा धर्मशाळा आणि घरगुती निवासव्यवस्था असलेल्या ठिकाणी आधीच बुकींग करण्याचे आवाहन आहे. तसेच पुरीला येण्यासाठी बस, ट्रेन किंवा विमानांच्या टिकीटेही आधीच काढण्याचे आवाहन आहे. येण्याचे आणि जाण्याच्याही तिकिटांचे नियोजन आधीच करावे. शिवाय खाजगी गाडी असेल तर पार्कींगची सोय आहे की नाही हे आधी लक्षात घ्यावे. जगन्नाथ यात्रा मार्गादरम्यान अनेकवेळा दुकाने बंद असतात. अशावेळी आवश्यक अशा वस्तू सोबत आणण्याचेही आवाहन आहे. विशेष म्हणजे, या यात्रेला भेट देणा-यांमध्ये वयोवृद्धांचा समावेश जास्त असतो. त्यांनी आपली औषधे सोबत ठेवण्याचे आवाहन आहे. याशिवाय लाखो भाविकांचा मुक्काम असलेल्या पुरीमध्ये यात्रेदरम्यान खाद्यपदार्थांची अनेक नवीन दुकाने चालू होतात. भाविक ब-याचवेळा गर्दीमुळे खाद्यपदार्थ सेवन करतांना काळजी घेत नाहीत. त्यामुळे ज्यांना आधीच काही त्रास आहे, त्यांनी सोबत सुके खाद्यपदार्थ तसेच सुकामेवा जवळ बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे. (Jagannath Puri)
जगन्नाथ पुरीचा (Jagannath Puri) हा यात्रात्सोव जगभरात प्रसिद्ध आहे. भगवान श्रीकृष्ण म्हणजेच प्रभू जगन्नाथांचे दर्शन घेण्यासाठी येणा-या या भाविकांनी आता महिनाभर पुरी गजबजून जाणार आहे. यासाठी प्रशासन सज्ज असले तरी, भाविकांनीही काही काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात येत आहे.
सई बने