अयोध्येमध्ये होणा-या भव्य प्रभू राममंदिराचा सोहळा आता काही दिवसांवर आला आहे. प्रभू रामचंद्रांचे हे भव्य मंदिर होण्यासाठी गेली अनेक वर्ष लढा चालू आहे. या मंदिरासाठी हजारो रामभक्तांनी आपले बलीदान दिले आहे. 22 जानेवारी 2024 ही तारीख भारताच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिली जाणार आहे. मात्र त्यासोबत 6 डिसेंबर 1992 ही तारीखही महत्त्वाची ठरली आहे.(Sadhvi Rithambara)
याच दिवशी अयोध्येत जमा झालेल्या हजारो कारसेवकांनी इतिहास रचला आणि आजच्या भव्य श्री राममंदिराचा मार्ग मोकळा झाला. या राममंदिरासाठी जे आंदोलन झाले त्या आंदोलनाचा प्रमुख चेहरा होता तो साध्वी ऋतंभरा यांचा. साध्वी ऋतंभरा यांना दीदी मॉं असे आदराने संबोधण्यात येते. रामंदिरासाठी जे आंदोलन झाले, त्यात साध्वी ऋतंभरा यांनी अनेक सभा घेतल्या. प्रभावी वक्तृत्व कलेच्या धनी असेलेल्या साध्वी ऋतंभरा यांच्या सभेमुळे हजारो कारसेवक या आंदोलनात सहभागी झाले. राममंदिरासाठी स्वतःला वाहून घेणा-या आणि पोलीसांच्या लाढ्या खाणा-या साध्वी ऋतंभरा यांना या राममंदिराच्या लोकार्पण सोहळ्याला मानाचे आमंत्रण मिळाले आहे. राममंदिरासाठी आपले आयुष्य वाहून घेणा-या साध्वी ऋतंभरा यांना 22 जानेवारी रोजी अयोध्येत प्रभू श्रीरामांच्या अभिषेक सोहळ्यासाठी पहिले निमंत्रण पत्र देण्यात आले. राम मंदिर चळवळीच्या प्रमुख आधारस्तंभ म्हणून त्यांचा उल्लेख करण्यात येतो. (Sadhvi Rithambara)
राममंदिरासाठी उभारण्यात आलेल्या आंदोलनात प्रभावी भूमिका पार पाडणा-या साध्वी ऋतंभरा या आता उत्तरप्रदेशमधील वृंदावन येथील एका आश्रमात वास्तव्यास आहेत. वृंदावन शहराच्या बाहेर असलेल्या वात्सल्य ग्राम येथे त्यांनी हिंदू धर्मातील अनेक पौराणिक ग्रंथांचा संग्रह केला आहे. त्यांचा त्या अभ्यास करत असून आश्रमातील विद्यार्थांनाही त्या पौराणिक ग्रंथांची माहिती देत आहेत. शिवाय येथे भारतातील अनेक पुरातन लिपींचा अभ्यास केला जातो. या परिसरात साध्वी ऋतंभरा या दीदी माँ म्हणून प्रसिद्ध आहेत. अनाथ मुलांना या आश्रमात आश्रय दिला जातो. या वात्सल्य ग्रामची हेल्पलाइन सुविधा असून, त्याद्वारे कोणत्याही कारणाने जन्मानंतर निराधार झालेल्या नवजात बालकांना वात्सल्य ग्राममध्ये सामावून घेण्यात येते. वृंदावन मधील हा आश्रम चालवणा-या साध्वी ऋतंभरा यांनीच तीस वर्षापूर्वी अत्यंत आक्रमकपणे राममंदिराच्या आंदोलनाचे नेतृत्व केले होते, यावर विश्वास बसत नाही. मात्र साध्वी ऋतंभरा यांची तेव्हाची भाषणे ऐकली तरी राममंदिराचा प्रमुख आधारस्तंभ म्हणून त्यांचा का उल्लेख होतो याची जाणीव होते.
पंजाबच्या लुधियानाच्या दोराहा येथे त्यांचा जन्म झाला. त्यांचे मुळ नाव निशा आहे. लहानपणापासून अध्यात्माची आवड असलेल्या निशाने वयाच्या अवघ्या 16 व्या वर्षी भगवे वस्त्र परिधान केले. हरिद्वारचे गुरु परमानंद गिरी यांनी त्यांना दिक्षा दिली. त्यांचे नाव साध्वी ऋतंभरा झाले. अध्यात्मिक ग्रंथांचा अभ्यास आणि हिंदू धर्माप्रती असलेले कमालीचे प्रेम यामुळे साध्वी ऋंतभरा या राममंदिर आंदोलनात आल्या आणि त्यांच्या भाषणांमुळे आंदोलनाच्या त्या प्रमुख नेत्या त्यांची ओळख झाली. राममंदिर आंदोलन प्रकरणी त्यांना 11 दिवसांचा तुरुंगवासही भोगावा लागला आहे. (Sadhvi Rithambara)
सूर्य आपली प्रतिष्ठा सोडू शकतो. चंद्र आपली शीतलता सोडू शकतो. सागर आपल्या सीमांचे उल्लंघन करू शकतो, परंतु जगातील कोणतीही शक्ती रामजन्मभूमीवर मंदिराचे बांधकाम रोखू शकत नाही, अशा प्रभावी भाषणांनी राममंदिर आंदोलनता साध्वी ऋतंभरा यांनी हजारो कारसेवकांना एक प्रेरणा दिली.
=============
हे देखील वाचा : मालदीवला जाण्यापेक्षा लक्षद्विपला जाणे अधिक सुकर
============
राममंदिर आंदोलन हे त्यांच्या आयुष्याचे उद्दीष्ट बनले. त्यासाठी रात्रंदिवस साध्वी ऋतंभरा या सभा घेत असत. त्यांना पकडण्यासाठीही अनेक प्रयत्न झाले. पोलीसांच्या लाढ्या खाव्या लागल्या. पण त्यांनी प्रभू रामांचे नाव सोडले नाही. ‘हिंदू असो की मुस्लिम, या देशावर प्रेम नाही; मग त्याला या देशात राहण्याचा अधिकार नाही. या त्यांच्या स्पष्ट भूमिकेवर तत्कालीन राज्यकर्त्यंनी टिका केली. साध्वी ऋतंभरा यांना शिवीगाळही करण्यात आली. पण साध्वी ऋतंभरा आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्या. (Sadhvi Rithambara)
6 डिसेंबर 1992 रोजी बाबरी मशिदीचा पाडाव झाला तेव्हा साध्वी ऋतंबरा अयोध्येत होत्या. त्यामुळेच साध्वी ऋतंभरा यांचेही नाव लिबरहान आयोगाने बाबरी पाडल्याच्या 68 आरोपींच्या यादीत समाविष्ट केले होते. साध्वी ऋतंभरा यांनी तीक्ष्ण भाषणातून मशीद पाडण्याचे वातावरण निर्माण केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला. 11 दिवसांचा तुरुंगवास त्यांना झाला. आता याच साध्वी ऋतंभरा वृंदावन येथील आश्रमात शांततेत आयुष्य व्यतित करीत आहेत. त्यांच्यासाठी 22 जानेवारी ही तारीख सुवर्ण तारीख आहे. आपल्या आंदोलनाची अशी फलश्रुती मिळाल्यामुळे साध्वी ऋतंभरा या आनंद व्यक्त करीत आहेत.
सई बने