शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव या ओळखी बरोबरच वेगळी कार्यशैली व कार्यकर्तृत्वाच्या बळावर उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या राजकारणावर स्वतंत्र ठसा उमटविला आहे. सुसंस्कृत, संयमी आणि अभ्यासू नेता अशी त्यांची सर्वसामान्य जनतेच्या मनातील छबी असून, शिवसेनेचा वारसा समर्थपणे पुढे नेण्याचे काम उद्धव ठाकरे यांनी केले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेला नवी छबी प्राप्त झाली. फोटोग्राफीचा छंद जोपासणारे उद्धव ठाकरे सुरुवातीला राजकारणापासून दूर होते. मात्र, शिवसेनाप्रमुखांनी त्यांच्या खांद्यावर शिवसेनेचे जबाबदारी सोपविली आणि पक्षाला नवी झळाळी देण्याचे काम उद्धव ठाकरे यांनी केले. २००४ मध्ये त्यांच्यावर शिवसेनेचा कार्याध्यक्ष म्हणून जबाबदारी आली.
उद्धव यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा प्रश्न, पश्चिम महाराष्ट्रातील ऊसउत्पादकांचा प्रश्न यावर शिवसेनेने तीव्र आंदोलने केली. ठाकरे यांचे या संदर्भात झालेले मेळावेही चांगलेच गाजले. माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी २००५ मध्ये शिवसेना सोडली तेव्हा शिवसेनेस मोठा धक्का बसला. शिवसेनेची आता मोठ्या प्रमाणावर पडझड होणार असे चित्र होते; पण शिवसेनेतील ही बंडाळी उद्धव ठाकरे यांनी थोपवून धरली. राणे यांना शिवसेना फारशी फोडता आली नाही. राणे यांना पक्षातून काढल्यानंतर उद्धव ठाकरे कार्याध्यक्ष म्हणून अधिक सक्रिय झाले. त्यांनी संपूर्ण राज्यभर दौरे काढून संघटनाबांधणीवर भर दिला; पण दरम्यानच्या काळात उद्धव आणि राज ठाकरे यांच्यातील विसंवाद वाढला. शिवसेनेत आपल्याला डावलले जात असल्याचा आरोप करून, राज ठाकरे यांनीही २००६ मध्ये शिवसेना सोडली. शिवसेनेला हा सर्वात मोठा झटका होता. राज ठाकरे बाहेर पडल्याने शिवसेनेत उभी फूट पडेल, असा अंदाज वर्तविण्यात येत होता. मात्र, उद्धव ठाकरे यांनी ही पडझडही रोखली. शिवसेनेतील बाळा नांदगावकर वगळता एकही आमदार, खासदार राज यांच्यासोबत गेला नाही.
नंतरच्या काळात राज आणि उद्धव यांच्यातील मतभेद अधिक तीव्र होऊन राज्यात शिवसेना विरुद्ध महाराष्ट्र नवनिर्माण सेना असे चित्र निर्माण केले. २००९ मध्ये झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली लढल्या गेल्या. या निवडणुकांमध्ये राज ठाकरे यांच्या ‘मनसे’ने शिवसेनेच्या काही जागा कमी केल्या. मात्र उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब झाले. पडझडीनंतरची शिवसेना उभी करण्याचे श्रेय उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वालाच जाते.
एक मनस्वी कलावंत ते मुरब्बी राजकारणी असा प्रवास उद्धव ठाकरेंना झेपणार नाही, अशी अनेकांनी बांधलेली अटकळ त्यांनी सहजपणे खोटी ठरवली आहे. आज कोरोनाच्या काळात दिल्लीला अत्यंत प्रभावीपणाने मुख्यमंत्री म्हणून राज्याच्या धुरा सांभाळत आहे. तर देशाच्या टॉप १० मुख्यमंत्रीच्या यादीत देखील यांचं नाव आहे. बाळासाहेब ठाकरे यांचा राजकीय वारसा आपण समर्थपणे चालवू शकतो याची चुणूक शिवसेनेत आलेल्या चढ-उतारानंतरही त्यांनी दाखवून दिली आहे.