उत्तरप्रदेश सध्या सर्वांचाच चर्चेचा विषय झाला आहे. याच उत्तरप्रदेशमधील तिर्थराज प्रयाग येथे भरलेल्या महाकुंभमध्ये जगभरातील भाविक त्रिवेणी संगमावर गर्दी करत आहेत. अशातच उत्तरप्रदेशच्या अन्य भागातही धार्मिक पर्यटनासाठी येणा-या भाविकांची गर्दी झाली आहे. अयोध्या, मधुरा, वृंदावन, काशी येथे भाविक गर्दी करत आहेत. आता उत्तरप्रदेशमधील आणखी एक जिल्हा चर्चेत आला आहे. या जिल्ह्याचे नाव बागपत असून या जिल्ह्यातून महाभारतकाळीन वस्तू मिळाल्यामुळे इतिहाससंशोधक येथे मोठ्या संख्येनं जमा झाले आहेत. यमुना नदीच्या पूर्व काठावर असलेल्या या जिल्ह्याचे महाभारतकालीन नाव व्याघ्रपथ असल्याची महिती आहे. या भागात पूर्वी घनदाट जंगल होते आणि त्यात वाघांची संख्या मोठी होती. त्यावरुनच हा भाग व्याघ्रपथ म्हणून ओळखला जात असे. कालांतरानं या नावात बदल होत, त्याचे नाव बागपत असे झाले. आता याच बागपत जिल्ह्यामध्ये महाभारतकालीन संदर्भ मिळाले आहेत. (Uttar Pradesh)
पाच पांडवांनी युद्ध नको, आम्हाला आमची पाच गावं द्या असा निरोप भगवान श्रीकृष्णाच्या मार्फत कौरवांकडे पाठवला होता. त्यामध्ये एक गाव म्हणजे, हे बागपत असल्याचीही माहिती स्पष्ट झाली आहे. याच बागपतमध्ये महाभारतकालीन बांधकाम सापडले आहे. येथे पांडवांचा किल्ला असल्याची माहिती पुढे येत आहे. त्यासाठी या भागात भारतीय पुरातत्व विभागातर्फे खोदकाम करण्यात येत आहे. आता या बागपतमध्ये सापडलेल्या वस्तुंचे संग्रहालय उभारण्याची मागणी होत आहे. यामुळे या भागात पर्यटनाचा विकास होईल, अशी येथील नागरिकांची मागणी आहे. उत्तरप्रदेशातील यमुना नदीच्या काठावर असलेला बागपत जिल्ह्यातील महाभारतकालीन खुणा शोधण्यासाठी मोठ्या प्रमाणात खोदकाम करण्यात येत आहे. (Social News)
महाभारत काळात पांडवांनी बागपत शहराची स्थापना केल्याची माहिती आहे. त्याकाळी या शहराला व्याघ्रप्रस्थ म्हणून ओळखले जात होते. सध्या या भागातील महादेव मंदिर, श्री पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर, गुफा वाले बाबा मंदिर, वाल्मिकी आश्रम, काली सिंह बाबा मंदिर येथे भाविकांची गर्दी असते. यातील काही मंदिरे महाभारतकालीन असून मंदिराच्या स्थापनेमागे कथा असल्याचे सांगण्यात येते. याच बागपतमध्ये आता एक टेकडी सापडली असून त्यात महाभारतकालीन वस्तू आणि हत्यारे असण्याची शक्यता आहे. त्याबाबत पुरातत्व विभागातर्फे संशोधन करण्यात येत आहे. (Uttar Pradesh)
महाभारत युद्ध होऊ नये, म्हणून पाच पांडवांनी जी पाच गावे दुर्योधनाकडे मागितली होती, त्यात या बागपतचा समावेश होता. आजचा दिल्लीचा जो परिसर आहे, त्याला तेव्हा इंद्रप्रस्थ नाव होते. महाभारत काळात हा भाग श्रीपत आणि खांडवप्रस्थ म्हणूनही प्रसिद्ध होता. हस्तिनापूरमधून हद्दपार झाल्यानंतर, पांडवांनी इंद्रप्रस्थला आपली राजधानी म्हणून घोषित केले होते. याशिवाय पानिपत हा भागही पांडवांनी मागितला होता. त्याला पांडुप्रस्थ असेही म्हटले जात असे. त्याच आसपास असलेले सोनीपथ हे तिसरे गाव होते. त्याला महाभारत काळात स्वर्णप्रस्थ म्हटले जात असे. त्यावेळी अतिशय संपन्न असा हा भाग होता. येथे सोन्याचे दागिने मोठ्या प्रमाणात घडवण्यात येत असत त्यामुळे त्याला स्वर्णप्रस्थ असेही नाव होते. याबरोबरच पांडवांनी तिलपाट हे गाव मागितले होते. महाभारत काळात याला तिलप्रस्थ असे म्हणतात. आज हे शहर फरीदाबाद जिल्ह्यातील यमुना नदीच्या काठावर आहे. (Social News)
================
हे देखील वाचा : Prayagraj : मस्क्युलर बाबा आणि एमटेक बाबा
Saif Ali Khan : पतौडी कुटुंबाचा शेवटचा नवाब
================
या पाच गावात व्याघ्रप्रस्थ नावाचे गाव होते. हा संपूर्ण परिसर त्याकाळी घनदाट वनांनी झाकलेला असल्याचे सांगण्यात येते. या जंगलात वाघांचीही संख्या मोठी होती. याच जंगलामध्ये कौरवांनी पांडवांसाठी लाक्षागृह बांधले होते. त्यामुळे पांडवांनी दुर्योधनाकडे मागितलेल्या पाच गावात या बागपतचाही समावेश होता. आता याच बागपतमध्ये एक रहस्यमय टेकडी आढळून आली असून येथे पांडवांची शस्त्रे असल्याची माहिती आहे. काही वर्षापूर्वी बागपत जिल्ह्यातील बरनावा गावातील स्मशानभूमीत 2018 मध्ये लाक्षागृहासारखी वास्तू मिळाली होती. ही वास्तू जेथे मिळाली, त्या कुर्डी गावात पुरातत्व विभागानं मोठ्या प्रमाणात शोध मोहीम हाती घेतली आहे. याच बागपत जिल्ह्यातील सिनौली येथेही महाभारतकालीन अनेक वस्तू सापडल्या आहेत. हा संपूर्ण जिल्हा पांडवांचे निवासस्थान मानला जातो. कुर्डी गावातील शिवमंदिरही पांडवांनी उभारल्याची माहिती आहे. या सर्वांचा नव्यानं अभ्यास करण्यात येत असून यामुळे बागपत जिल्ह्याच्या इतिहासावर अधिक प्रकाश पडेल अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे. (Uttar Pradesh)
सई बने