भारतीय सणांमध्ये अक्षय्य तृतीयाच्या सणाला फार महत्व आहे. या दिवशी अत्यंत शुभ कामं केली जातात. यंदा अक्षय्य तृतीया वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षाची तृतीया म्हणजेच अक्षय्य तृतीया २२ एप्रिलला साजरी केली जाणार आहे. या दिवशी वैवाहिक आयुष्यात सफलता मिळावी म्हणून प्रार्थना केली जाते. अशातच आपण जाणून घेऊयात अक्षय्य तृतीया नक्की का साजरी केली जाते त्याबद्दल सविस्तर.(Akshaya Tritiya)
अक्षय्य तृतीया म्हणजेच आखा तीज वैखाश महिन्यातील शुक्ल पक्षाची तृतीया तिथी. अक्षय्य याचा अर्थ असा होतो की, कधीय क्षय होत नाही. म्हणजेच नाश न पावणारे. असे मानले जाते की, जे काही पुण्य केले जाते त्याचे कधीच क्षय होत नाही. हेच कारण आहे की, बहुतांश शुभ कार्यांची सुरुवात या दिवसापासून केली जाते. हिंदू धार्मिक मान्यतांनुसार या दिवशी काही प्रकारची शुभ कार्य केली जातात आणि त्याचे फळ जरुर मिळते. खरंतर प्रत्येक महिन्यात येणाऱ्या शुक्ल पक्षाची तृतीया शुभ असते. परंतु वैशाख महिन्याची तृतीया स्वयंसिद्ध मुहूर्त मानली जाते. या दिवशी पंचाग न पाहता सुद्धा शुभ काम केली जातात.
अक्षय्य तृतीयेच्या तिथीला साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभ मुहूर्त ही मानले जाते. या तिथीला नरनारायण, परशुराम आणि हयग्रीव यांचा जन्म झाला होता. म्हणून या दिवशी त्यांचा जन्मोत्सव ही साजरा करतात. तसेच या दिवसापासूनच त्रेतायुगाचा प्रारंभ झाला. (काहींच्या मते हा कृतयुगाचा व काहींच्या मते त्रेतायुगाचा प्रारंभ-दिन आहे). यासाठी ही पर्वणी मध्यान-व्यापिनी धरतात. परंतु श्रीपरशुरामाचा अवतार प्रदोषकाळी झाला होता, म्हणून जर द्वितीये दिवशीच मध्यान्हापूर्वी तृतीया लागत असेल तर त्याच दिवशी अक्षय्य तृतीया असल्याचे मानले जाते.
तर महर्षी वेदव्यास यांनी अक्षय्य तृतीयेच्या दिवसापासूनच महाभारत लिहायला सुरुवात केली होती. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी माता गंगा स्वर्गातून पृथ्वीवर अवतरली.याच दिवशी आई अन्नपूर्णाचा वाढदिवसही साजरा केला जातो. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी गरजूंना दान केल्याने पुण्य लाभते आणि दान करणे अत्यंत महत्वाचे आहे. (Akshaya Tritiya)
या व्यतिरिक्त जैन धर्माचे पहिले संस्थापक ऋषभदेव जी महाराज यांनी अनेक वर्षांच्या तपश्चर्येनंतर या दिवशी उसाच्या रसाने उपवास सोडला होता. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी उपवास आणि उपासनेलाही विशेष महत्त्व आहे. या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची पांढऱ्या कमळ किंवा पांढर्या गुलाबाच्या फुलांनी पूजा केली जाते. अक्षय्य तृतीयेच्या पूजेनंतर जव किंवा गव्हाचा सत्तू, काकडी, हरभरा डाळ यांचा प्रसाद वाटला जातो.
हेही वाचा: ऐरावतेश्वर मंदिरातील संगीतमय पाय-यांचे रहस्य….
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी लोक उपवास करून भगवान विष्णूची पूजा करतात आणि या दिवशी भगवान विष्णूला अक्षत, हळद आणि कुमकुम अर्पण केले जाते. पूजेनंतर प्रसाद वाटप आणि दान केले जाते.